शनिवार, 14 सितंबर 2013

तुळजा भवानी स्तोत्र



 तुळजाभवानी स्तोत्र

सर्वांरंभी मुळारंभी | वंदिजे गणनायकू |
विद्या सुबुधी देता हे | सर्वत्र तो भूमंडळी || १ ||
चतुर्भुजा वेदमाता | वीणापुस्तकधारिणी |
वंदिता अंतरी वाढे | स्फुर्तीरूपे प्रकाशते || २ ||
मुळीची मूळमाया ते | आदिशक्ती परमेश्वरी |
आमुची कुळदैव्या ते | म्हैसासुरासी मर्दिनी || ३ ||
शक्तिरूपे जगन्माता | वर्तते जगदांतरी |
त्रिलोकी जितुके  प्राणी | शक्तीवीर वृथा वृथा || ४ ||
प्रसिध तुळजामाता | श्रीराम वरदायिनी |
कुळासी पाळिले मुळी | आतां आम्हासी पाळिते || ५ ||
चुकता शक्ती नेता हे | सामर्थ्ये ते कैचे पुढे |
कृपाळू जन्ननी वोळे | तत्काळ मनकामना || ६ ||
बहुतांचे कुळी आहे |  पाहा प्रचीती रोकडी |
कृपेने रंक ते राजे | सामर्थ्ये वर्तती जनी || ७ ||
चुकता क्षोभते नेटे | राजे रंक करी पून्हा |
आरोग्या रोग लाविता | फोडी सर्वांग खांडके || ८ ||
धबधबा गळती काया | वोल्या कुष्टेंचि नासती |
शुभ्र सर्वांग होता हे | नायटे फुटती बळे || ९ ||
हात जाती पाय जाती | जींव्हां जाती फुटोनिया |
बोलता तुळजा माता | पुन्हां सर्वांग नेटके || १० ||
श्रोत्र जाती नेत्र जाती | वाचा जाती न बोलवे |
उदंड रोग व्याधी त्या | किती म्हणोनी सांगणे || ११ ||
धडासी विघडी रागे | दयेने नीट होतसे |
संपन्न मागती भिक्षा | चालेना तिज वेगळे || १२ ||
बोलिले चुकती प्राणी | त्यासी दंड परोपरी |
पिशाच्ये खेळती अंगी | फेंफरे भरती बळे || १३ ||
प्रचीत ये चमत्कारे | तोषतां टे  जगदेश्वरी |
नेसते निबार किती | यती टे लोटांगणी || १४ |
बगाडे खेळती निसें | जिव्हा कापून वाहाती |
कुलुपे घालती तोंडी | येक ते सिर वाहाती || १५ ||
पून्हा ते लागती सीरे | जिव्हा येती करांगुळ्या |
सामर्थ्ये जागते मोठे | जागती जगज्योती हे || १६ ||
 सर्वात आरंभी मुळारंभ करताना गणनायकाला वंदन करू . गण म्हणाजे माया ,प्रकृती शारदा ,तिला चेतवणारा तो गणेश .शिवगणांचा किंवा ईंद्रियगणांचा अधिष , परब्रह्मा मध्ये निर्माण झालेला प्रथम संकल्प म्हणाजे मूळमाया . मूळमायेचा प्रथम प्रारंभ झाला ,तेथून जगदरचनेचा प्रारंभ झाला म्हणून त्याला मुळारंभ म्हणतात .असा हा गणेश सर्वांना विद्या ,सुविद्या देतो .मूळमाया म्हणजे गणेश आणि शारदा .
शारदा चतुर्भुज रूपात असते . ती वेदांची माता म्हणजेच वेदांची उत्पती  करणारी ,वेद निर्माण करणारी आहे .तिने वीणा पुस्तक धारण केलेले असते . तिला वंदन केले की परमार्थाची साधना करणा-या साधकाला आत्मचिंतनाची कला शिकवते .तिच्या कर्तुत्वानेच परा ,पश्यंती ,मध्यमा या तीन वाणीं मध्ये जे स्फुरण पावते ते वैखरीच्या सहाय्याने शब्दात प्रगट होते .तीन लोक असलेले हे विश्व तीच निर्माण करते व  तीच मोडून ही टाकते .शारदा ईश्वराची निवांत ,निश्चळ ,निर्मळ अवस्था आहे .त्यामुळेच ती योग्यांना ध्यान लावायला मदत करते .तिच्या मदती शिवाय भगवंताचे स्तवन ,भजन  ,भक्ती करता येत नाही .ती सतरावी जीवनकला आहे त्यामुळे तिच्या कृपेने स्फूर्ती प्राप्त होते .
मुळारंभ झाला तेव्हा मूळमाया म्हणजेच शारदा तीच तुळजाभवानी ! तीच आमच्या कुलाची कुलदेवता आहे .तीच आदिशक्ती आहे ,तीच परमेश्वरी आहे .तीच
महिशासुरमर्दिनी आहे .
तीच शक्तीरुपिनी आहे .जगन्माता आहे .तीच या जगात राहते .तीच विचारवंताला विचार करायला लावते .ती अखंड स्फूर्ती देते .योग्यांना ध्यान करण्याची ,साधकांना अनुसंधानात राहण्याची ,सिध्दांना समाधीत स्थिर राहण्याची शक्ती तिच्यापासूनच मिळते .ती जगातील सौंदर्याचे मूळ आहे अशी शारदा जगाचे पालन करते .
तुळजामाता प्रसिध्द आहे .तीनेच श्रीरामांना वरदान दिले आहे ,म्हणूनच तिला रामवरदायिनी म्हणतात .तिने आमच्या कुलाचे पालन केले आहे .आता ती आमचे पालन करत आहे असे समर्थ म्हणतात .
चुकले तर शक्ती मिळत नाही ,सामर्थ्य ही मिळत नाही . पण तुळजा भवानी आई प्रेमळ आहे .ती आपल्या ईच्छा पूर्ण करते .ती पुष्कळ कुलांची कुलदेवता आहे .तिच्या कृपेने भिकारी राजे झालेले आहेत याची प्रत्यक्ष प्रचीती येते .पण तिचे करण्यात चूक झाली तर राजेही भिकारी झालेले पहायला मिळतात .निरोगी माणसाच्या अंगावर गळू उठतात .ओला कुष्ट रोग होतो .अंगातून ,कुष्ट थबथबा गळायला लागते . अंग शुभ्र होते .अंगावर नायटे उठतात . हात ,पाय जातात ,जीभ फुटतात .पण तुळजामातेला नवस बोलले तर सर्वांग नीट होते . कान जातात ,डोळे जातात .बोलता येत नाही .अनेक रोग ,व्याधी होतात .
तिच्या रागाने चांगले चालू असेल तर ते बिघडते .तिच्या दयेने मात्र सर्व चांगले होते .तिच्या दारी भिक्षा मागावीच लागते . संपन्न ,श्रीमंत माणूसही भिक्षा मागतो .
तिला लोक नवस बोलतात पण तो फेडत नाहीत ,त्यांना ती दंड करते .ती अंगात पिशाच्च खेळवते ,अंगात फेफरे येतात .
लिंबाचा पाला नेसून ,किंवा लोटांगणे घालत तिच्या दर्शन घेतले तर तिला आनंद होतो .काही लोक तिला विचित्र नवस बोलतात .खांबाला टांगून हेलकावे घेतात ,जीभ कापून देतात ,तोंडाला कुलूप लावतात ,कोणी डोके कापून वाहतात .पण तिचे सामर्थ्य असे की डोके पून्हा जागेवर बसते ,जिभेला करंगळ्या फुटतात .तिचे सामर्थ्य असे जागृत आणि मोठे आहे


















शुक्रवार, 23 अगस्त 2013

तुळजाकुमारीचे रूप



तुळजा कुमारी चे रूप | अथवा बायकांचे रूप |
नाना प्रकारी स्वरूप भक्तालागी दावितो || १ ||
भक्ता प्रसंन्नचि होतो | अथवा ख्यानाची लावितो
प्रचीत रोकडी दावितो | भक्तीभावे सारिखी || २ ||
दास म्हणे चुको नये | देवापाशी उणे काये |
 तूते आपाये उपाये | दोनी सित्ध असती || ३  ||
तुळजा कुमारी स्वत:चे रूप कुमारी रूपात किंवा बायकांच्या रूपात दाखवते . अनेक रूपात ती  भक्तांना भेटते .भक्तांना प्रसन्न होते आणि अभक्तांची ,तिच्यावर विश्वास  नसणा-या अभक्तांची हानी करते ही रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रचीती येते .समर्थ रामदास स्वामी म्हणतात की देवीची भक्ती करण्यास चुकू नये .कारण देवाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते .देवीची कृपा आणी तिची अवकृपा दोन्ही सिध्दच आहे .






तुकाई यमाई  नमूं चेडाबाई
जाखाई जोखाई सखाई ते ||१||
सखाई जगदंबा आदिशक्ती अंबा |
तुम्ही त्या स्वयंभा दाखवावे || २ ||
दाखवावे तुम्हां सर्वां पैलीकडे |
देखतांच घडे मोक्षपद || ३ ||
मोक्षपद घडे मोक्षासी पाहतां |
तद्रूपचि होता दास म्हणे || ४ ||
तुकाई यमाई चंडी जाखाई जोखाई सखाई जगदंबा आदिशक्ती अंबा या सर्व एकाच शक्तीची अनेक रूपे ,ती स्वयंभू रूपे मला दाखवावी असे समर्थ म्हणतात .तुमच्या पलीकडे ही असलेले स्वस्वरूप मला दाखवा अशी समर्थ विनंती करतात .स्वस्वरूप दर्शनाने मोक्षपद मिळेल. मोक्षपद मिळण्यासाठी त्या स्वस्वरुपाशी एकरूप मात्र व्हावे लागते ,तरच मोक्ष मिळतो त्यासाठी भक्ती करावी लागते .भक्ती अशी की कोणत्याही कारणाने भक्त विभक्त होणार नाही .
    



रविवार, 21 जुलाई 2013

जगज्जोती जगदेश्वरी | धन्य लीला परमेश्वरी || धृ ||



जगज्जोती जगदेश्वरी | धन्य लीला परमेश्वरी || धृ ||
गावत नाचत बिकट बीराजत | बाज्जत गाज्जत धमक चाले |
सुरत पाख गुनी गन पाख | अकल पाख भली ||२ ||
परब्र्ह्मात जे स्फुरण झाले ,तीच मूळमाया .परब्रह्माच्या निश्चळ स्वरूपातील हालचाल म्हणजे वायू .वायूतील शुध्द जाणीव म्हणजे जगज्योती . वायू ,जाणीव ,जगज्योती यांच्या मेळ्याला मूळमाया म्हणतात .पुरुष आणि प्रकृती ही मूळमायेची नावे .वायूला प्रकृती आणि जगज्योती ला म्हणतात पुरुष .जाणीवेने म्हणजेच जगज्योतीने सजीव देहाचे रक्षण करतात .आपल्यावरचे संकट ओळखतात .आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात . म्हणूनच तिला जगदेश्वरी म्हणतात .त्या परमेश्वरीची लीळा अगाध आहे . अशा ह्या जगज्योतीला ह्या परमेश्वरीला वाजत गाजत घेऊन चला सुंदर अशा पाळण्यात तिला बसवा .





वोळली जगन्माता | काय उणे रे आता |
वैभव जात जाता | भक्त हाणती लाता || धृ ||
बोलले भूमंडळ | परिपूर्ण पाहतां |
राम आणि वरदायिनी | दोन्ही एकची पाहतां || १ ||
मनामाजी कळो आले | तेणे तुटली चिंता |
रामरूप त्रिभुवनी | चाले सर्वही सत्ता || २ ||
रामदास म्हणे माझे | जीणे सार्थक जाले |
देवोदेवी ओळखीता | रूप प्रत्यया आले || ३ ||
जगन्माता प्रसन्न झाली मग आता काय कमी आहे ? वैभव नाहीसे झाले ,इतरांनी ठोकरले ,तरी आता जगन्माता प्रसन्न झाल्यावर काय कमी ? सर्व भूमंडळातील लोक सर्व दृष्टीने विचार करून म्हणतात की राम आणि वरदायिनी एकच आहेत पुरुष आणि प्रकृती एकाच मूळमायेची दोन अंगे आहेत त्यांनाच गणेश आणि शारदा म्हणतात .गणेश ज्ञानमय तर शारदा शक्तिरूप आहे पण शेवटी ती परमेश्वराचीच शक्ती आहे . वरदायिनी त्या आदिमायेचेच रूप  आहे .म्हणूनच राम आणि वरदायिनी एकरूपच आहेत .  ईश्वर आणि शक्ती एकच असल्याचे ज्ञान झाले ,शंका नाहीशा झाल्या . मग आता कोणतीही रुखरुख .शंका नाही .हे सर्व मनाला पटले आहे त्यामुळे सर्व चिंता संपली आहे . त्या राम रुपाचीच सर्व सत्ता आहे या त्रिभुवनात श्रीरामांचीच सत्ता आहे .
श्री समर्थ रामदास म्हणतात माझ्या जीवनाचे सार्थक झाले .देव देवी यांचे स्वरूप ओळखताना पटले की दोन्ही एकच आहेत त्यांचे खरे स्वरूप प्रत्ययाला आले आहे नि:संदेह ज्ञान झाले .रामवरदायिनी ने माझ्यावर कृपा केल्याने माझा जन्म सार्थकी लागला असे समर्थ म्हणतात .

कथा कथनी वंदिली सरस्वती |



कथा कथनी वंदिली सरस्वती |
कथा कथनी वंदिली ||धृ ||
हंसवदनी वेदमाता |
चातुरानानाची दुहिता || १ ||
शब्दब्रह्माची निजलता |
कल्पतरू वाग्देवता || २ ||
ब्रह्मविद्येची निजाखाणी |
रामदासाची जननी || ३ ||
कथा सांगताना सरस्वतीला वंदन केले कारण सरस्वतीचे कृपा आशीर्वादाने मुकाही बोलायला लागतो ,माणसाच्या अंत:करणात परा ,पश्यंती ,मध्यमा या तीन वाणींनि जे स्फुरते ते प्रत्यक्ष शब्दात वैखरीने प्रगट होते . तीच शब्दांचे अंतरंग म्हणजे अर्थ स्पष्ट करून सांगते .शब्दांनेचे कथा सांगता येते म्हणून सगळे कर्तुत्व शारदेचे म्हणजे सरस्वतीचे असते .शारदा चतुराननाची कन्या म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या आहे ती वेदांची जननी आहे शारदा ही परमार्थाचे मूळ आहे .ती केवळ आत्मविद्या आहे ,ईश्वराची निवांत ,निर्मळ निश्चळ अवस्था आहे .
श्री समर्थांनी वर्णन केलेल्या चौदा ब्रह्मापैकी शब्द ब्रहम शारदा आहे परमात्म रुपाला मी आहे अशी जी शुध्द जाणीव झाली ती शारदा आहे .
शारदेचे स्वरूप  आकलन झाले की निर्गुणाची ओळखण होते व स्वस्वरूपाचा अनुभव येतो भगवंताच्या भक्तांची भक्ती ,अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणा-या ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिती ,जीवन मुक्तांची सायुज्यमुक्ती शारदा आहे म्हणून ती ब्रहमविद्येची निजाखाणी आहे .
अशी ही शारदा श्रीसमर्थांनी स्वत:ची जननी आहे असे म्हटले आहे .




तुळजामाता येऊ पाहते घरा
तुळजामाता येऊ पाहते घरा |
चौक भरा मोते फुलोरा |
शुध्द भावे दंडवत करा || धृ  ||
जाई जुई चंपक अंबई नाना पुष्पे ढीग ठाई ठाई |
सिंहासनी सुंदर तुकाई | | १ ||
केशर कस्तुरी चुवा चंदन |
गव्हेले कचोरे अगर बावन |
उद् गुलाल नरव रातांजन || २ ||
नाड्या पुड्या कुंकुम अबीर | जवादी पांच शुध्द कर्पूर |
सिलारस उदबत्या थोर || ३ ||
पाने फुले सुगंध तेले |
गर्द माजे एकत्र आले |
सुवास घेता चित्त निवाले || ४ ||
दवणा मोरुवा कुसुंबा कुंवा |
पूजिली अंबा अंबा जगदंबा |
पुष्प माला लंबा कदंबा || ५ ||
सांगोपांगे यंग उपांग |
चटक्या चंग चंग मृदांग |
माज रंग रंग सुरंग || ६ ||
आंतर्येक शरीर दोनी |
दास म्हणे धन्य भोवानी |
निजपद देते भक्तालागून || ७ ||
तुळजामाता घरी येत आहे .तिचं स्वागत करा .घराच्या अंगणात रांगोळ्या काढा [चौक भरा ] मोत्यांनी ,फुलांनी त्या रांगोळ्या सजवा ,फुलांच्या हारांनी सर्व सुशोभित करा .शुध्द भावांनी दंडवत घाला ,नमस्कार करा .जाई ,जुई ,चाफा ,अंबई [एक फुल ] या फुलांनी तिचं सिंहासन सजवा .सिंहासनी तुकाई विराजमान करा
केशर ,कस्तुरी ,चुवा [चंदनाच्या लाकडापासून केलेला सुगंधी पदार्थ ] ,चंदन अशा सुगंधी द्रव्यांचा लेप तिला द्या .गव्हले ,कचोरे ,अगर [सुगंधी पदार्थ ] , बावन [उत्तम चंदन ] उद् ,गुलाल ,सुगंधी पदार्थ लावा .
नाड्या [अबीर ,गुलाल ,बुक्का ई . ची रंगीत दो-याने बांधलेली पुडी ],पांच धान्ये ,शुध्द कापूर ,सिलारस [एक औषधी पदार्थ ] ,उदबत्या ,पाने ,फुले ,सुगंधी तेले ,ह्या सगळ्याचा एकत्र सुवास आला .सुवास घेतल्यावर मन निवते .
दवणा ,मोरुवा ,कुसुंबा [सुगंधी वनस्पती ], कुंवा [एक सुगंधी वृक्ष ] या सर्व सुगंधी पदार्थांनी वातावरण सुगंधी होऊन जाईल .अशा सुगंधी अवस्थेत अंबेला ,जगदंबेला पूजले पुष्पमाळा लावल्या कदंबाच्या फांद्या लावल्या
समग्र तयारी केली .चटक्या [चंग वाद्य वाजवणारा ], चंग [बासरी सारखे वाद्य ] ,मृदुंग वाद्य वाजवली की खूप आनंद मिळतो .दोन्ही शरीरे ,माझे ,देवीचे जरी भिन्न असली तरी अंतरे एकच आहेत ,समर्थ म्हणतात भवानी धन्य आहे .भक्ताला निजपद देते .भवानी मला तिच्या जवळ जागा देते .



शनिवार, 13 जुलाई 2013

tulajaabhavaanee



आदिशक्तीचा लागला लो


लो लो लागला लो | आदिशक्तीचा लागला लो |
अंतरी लो बाहेरी लो | जिकडे तिकडे लागला लो || १ ||
अंडज लो जारज लो | स्वेदज लो उद्भिज लो |
देवा लो दानवा लो | सिद्ध साधका लागला लो || २ ||
दास म्हणे तोचि जाणे | सद्गुरू वचने सुख बाणे || ३||

लो म्हणजे लळा लागला आदिशक्तीचा लळा लागला . आदिशक्ती म्हणजे परब्रह्माची शक्ती .परब्रह्माच्या ठिकाणी जो संकल्प उठला एको हं बहुस्याम | मी एक आहे अनेक व्हावे .तो संकल्प दोन शक्तीनी प्रकट होतो ज्ञान शक्ती व क्रियाशक्ती ती क्रियाशक्ती म्हणजेच आदिशक्ती .अंतरात ,बाहेरील गोष्टीत लळा लागाला . अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर येणारे , जन्माला येणारे , घामातून निर्माण होणारे ,या सर्व प्रकारच्या प्राण्यांना लळा लागला . देवांना ,दानवांना ,सिद्ध साधक सर्वांना लळा लागला .दास म्हणजे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सद्गुरू वचनांनी सुख मिळते .



ब्रह्मकुमारी शारदा वरदा | ब्रह्मकुमारी शारदा ||धृ ||
साधकाचे अभ्यंतरी | चतुर्विद्या वागेश्वरी || १ ||
स्फुर्तीरूपे प्रकाशली | वाचारूप अनुवादली || २ ||
रामदासी कार्यसिद्धी | चित्ती सहज समाधी || ३ ||

शारदा ब्रह्माच्या स्फुरणाचे म्हणजे मूळमायेचे शक्ती रूप अंग .ती वेदांची आई ,ब्रह्मदेवाची कन्या ,नादाचे जन्मस्थान ,वाणींची स्वामिनी ,वागेश्वरी म्हणजे परा ,पश्यंती ,मध्यमा व वैखरी या चारही वाणींची उगमस्थान असलेली आहे ती स्फूर्ती रुपाने माझ्यामध्ये प्रकाशली ,माझ्यामध्ये वाचेला स्फुरण चढले आणि माझ्याकडून लिहून घेतला गेला . रामदासाचे कार्य सिद्धी ला जाईल रामदास स्वामीनीं हाती घेतलेले जनजागृतीचे ,धर्मसंरक्षण करण्याचे कार्य सिद्धीस गेले .चित्तात सहजसमाधी चे समाधान प्राप्त झाले .सहज समाधी म्हणजे काय ते सांगताना समर्थ म्हणतात :
वस्तू जे का निरोधावी | तेचि सहजसमाधी | जेणे तुटे आधीव्याधी | भवदु:खाची ||  ७-४-४५ ||
असोन माईक उपाधी | तेचि सहजसमाधी | श्रवणे वळावी बुद्धी | निश्चयाची || ११-१-४४ ||
उपाधी शून्य सद्वस्तु स्वत: बनणे म्हणजे सहजसमाधी .या समाधीची प्राप्ती झाली की संसारातील दु:ख देणा-या सर्व आधिव्याधी गळून पडतात .मायामय दृश्याची उपाधी भोवती असूनही निर्गुणाशी अनन्यता टिकून राहिली की सहजसमाधी म्हणतात .अशी सहजसमाधी समर्थांना साधली होती .



रविवार, 7 जुलाई 2013

आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे



आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे
आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे |
सर्व काही हे तुझी करणी रे |
कळो आली तत्व विवरणी रे |
त्रिगुणी हे अवतार मांडणी र्रे |
शक्तिवीण कोणाची काया चाले रे |
शक्तिवीण शरीर कैसे हाले रे |
शक्तिवीण वाचन कोण बोले रे |
शक्तिवीण सकळ थोर जाले रे || १ ||
परा पश्यंती मध्यमा वैखरी रे |
जयाचेनी उठती वाचा चारी रे |
शक्तिवीण बापुडा देहधारी रे |
शक्तिवीण तो कांहीच न करी रे || २ ||
मुळारंभी तयेचा उदो जाला रे |
संत साधू विचारी प्रवर्तली रे |
रात्रंदिवस मायेचा ळो लागला रे |
सदानंदी आनंद मोठा जाला रे || ३  ||
सर्व शक्ती आहे विस्तारली रे |
देव दैत्य उदंड ख्याती जाली रे |
संत साधू विचारी प्रवर्तली रे |
मूलाकडे पाहतां गुप्त जाली रे || ४||
दास म्हणे हे तिचे चि करणे रे |
काही येक चालेना तिजवीण रे |
प्रचीतीने पाहावे निरुपण रे |
लोक व्यर्थ बुडताती मीपणे रे ||५||
हे आदिशक्ती ,तू त्या परब्रह्मा तून उत्पन्न झालेल्या मूळ संकल्पाचे शक्तीमय रूप आहेस ,तूच या सृष्टीची निर्माती ,पालनकर्ती ,संहारककर्ती आहेस .तूच नारायणी ,परमेश्वरी आहेस .तुझ्यातूनच त्रिगुण [सत्व ,रज ,तम ]निर्माण झाले .त्या त्रिगुणांचे स्वामी विष्णू ,ब्रह्मा ,आणि महेश निर्माण केलेस . रजो गुणाचे स्वामी ब्रह्मदेव ,त्यांच्याकडून तू सृष्टी रचना घडवून घेतलीस . भगवान विष्णू जे सत्व गुणांचे स्वामी आहेत ते या सृष्टीचे पालन करतात .महेश म्हणजे शिव प्रलय काळी या सृष्टीचा संहार करतात . तूच तत्वांची स्वामिनी आहेस तुझ्या कृपेनेच तत्व विवरण करता येते साधक तत्वांचा निरास करून शेवटी परम वस्तूची प्राप्ती करवून घेतात .
तू शक्तिरूप आहेस तुझ्यामुळेच ही काया ,हे शरीर चालते ,अनेक क्रिया करते ,तूच या देहाला बोलण्याची शक्ती देतेस ,शक्ती असेल ,म्हणजेच तू असशील तर या देहाचे सार्थक होते .ध्येय गाठता येते .
तूच परा ,पश्यंती ,मध्यमा आणि वैखरी या चार वाचांच्या रूपात या शरीरात वास करतेस .पण तू नसलीस तर हा देह बापुडा ,हीन दीन होतो .तो काहीही करू शकत नाही .त्याला दैन्यवाणे ,पराधीन जिणे जगावे लागते .
परब्र्ह्मात उत्पन्न झालेला मूळ संकल्प म्हणजे मूळमाया .त्या मूळमायेची दोन अंगे ज्ञानरूप व शक्तिरूप .तू शक्तिरूप अंग .तुझ्यातूनच सत्व ,रज तम हे त्रिगुण निर्माण झाले तामोगुणातून पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते व त्रिगुण या अष्टधा प्रकृतीतून  सृष्टी ची निर्मिती झाली .रात्रंदिवस तुझा ,या शक्तीचा ,मायेचा लळा लागला .तुझे स्वरूप कळल्यामुळे मोठा आनंद झाला .
सर्वत्र तूच विस्तारिली आहेस .तूच सर्व करते आहेस .देव ,दैत्य ,सर्व तुझेच गुणगान गातात .तुलाच मिळवण्याचा प्रयत्न करतात .संत साधूंना तू विचाराने भेटतेस ,पण ते जेव्हा ते मूळ स्वरूपा कडे लीन होतात तेव्हा तू गुप्त झालेली असतेस तू त्या परब्रह्मात विलीन झालेली असतेस .
समर्थ म्हणतात हे सर्व तिचेच करणे आहे .तिच्याशिवाय कोणाचे ही काहीही चालत नाही .तीच सर्व घडवते ,तीच मोडते ,तीच संहार करते .तीच आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी आपल्या कडून घडवते .पण माणसाला मी कर्ता असा अभिमान असतो ,अहंकार असतो .त्यामुळे माणूस वाया जातो   




शुक्रवार, 5 जुलाई 2013

तुळजाभवानी स्तोत्र



अनंत युगाची जननी |
तुळजा रामवरदायिनी ||
तिचे स्वरूप उमजोनी |
राहे तो ज्ञाता || धृ ||
शक्तिवीण कोण आहे |
हे तो विचारोनी पाहे |
शक्ती विरहित न राहे |
येश कीर्ती प्रताप ||१ ||
शिवशक्तीचा विचारू |
अर्धनारी नटेश्वरू |
दास म्हणे हा विचारू |
तत्वज्ञानी जाणती || २ ||
तुळजा देवी ही अनंत युगांची जननी आहे .अनंत युगे तिने निर्माण केली आहेत .निर्गुण निराकार परब्रह्माला एकदा मी एकटा आहे ,अनेक व्हावे अशी ईच्छा झाली ,हा संकल्प निर्माण झाला . तो संकल्प म्हणजे मूळमाया असे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात .त्या मूळ मायेची दोन अंगे एक ज्ञानमय ,दुसरे शक्तीमय .म्हणजेच गणेश आणि शारदा .त्या शक्तीमय अंगांची विविध रूपे कोल्हापूर ची अंबाबाई ,सप्तशृंगी ,रेणुकामाता ,तुळजा माता ई .
या तुळजाभवानी ला रामवरदायिनी का म्हणतात त्याची एक गोष्ट आहे ,श्रीराम सीतामाईला शोधत असताना शोक करत होते ,विलाप करत होते ,तेव्हा शंकर व सती [ दक्ष कन्या ]तेथून जात असताना शंकरांनी श्रीरामांना वंदन केले .तेव्हा सतीला आश्चर्य वाटले .ह्याला शंकर का वंदन करत आहेत असे तिला वाटले .हा कसला देव असे तिला वाटले .तिने श्रीरामांची परीक्षा घ्यायचे ठरवले .ती सीतेचा वेश घेऊन रामांसमोर आली पण श्रीरामांनी तिला ओळखले .व हात जोडून विचारले देवी आपण येथे कशा ? आणि आमचे आराध्य शंकर महाराज कोठे आहेत ?
तेव्हा  सतीचा भ्रमनिरास झाला .तिने रामांना आशीर्वाद दिला .तू रावणाचा वध करशील असा आशीर्वाद दिला .तू  ळ जा तू तळ जा असे सांगितले म्हणजे दक्षिणे कडे जा असे सांगितले . म्हणून तुळजा भवानी .अशी ही रामवरदायिनी  तुळजाभवानी श्री समर्थ रामदासांची आराध्य देवता होती समर्थ म्हणतात :
सर्वांचे मूळ हे माया | मूळमाया म्हणोनिया |
सृष्टीची आदिशक्ती हे | आदिशक्ती म्हणोनिया ||
तुळजाभवानी आदिशक्ती आहे कारण तिने सृष्टी निर्माण केली .


शुक्रवार, 21 जून 2013

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||

कोंदणा माजी ते सोने | तैसा अर्थ प्रचितीचा ||
स्नान संध्या टीळे माळा | अंतर्निष्ठ उपासना |
नित्यानित्य विवेकाने |धन्य संसार होतसे || १ ||
मर्यादा न्यायनीतीची | अन्याय न घडे कदा |
सन्मार्ग योग देवाचा | धन्य संसार होतसे || २ ||
देवालये सिखरे रम्ये | धर्मशाळा परोपरी |
परत्र साधकां लोकां | धन्य संसार होतसे || ३ ||
आन्नोदक वस्त्रे दाने | धन्य धन्य ब्राह्मणी भजे |
उदास वृत्तीने लोकी | धन्य संसार होतसे || ४ ||
बावी सरोवरे टांकी | मठ वृक्ष परोपरी |
उपकार समस्ती लोका | धन्य संसार होतसे || ५ ||
पराचे जीवीचे जाणे | अस्ती नास्ति विचारणा |
आत्यंत सर्व भूतांसी | धन्य संसार होतसे || ६ ||
होम याग पुरश्चरणे | निरुपणे हरिकथा |
ब्रहम संतर्पणे यात्रा | धन्य संसार होतसे || ७ ||
वेद पारायणे चर्चा | पुराणे माहात्मे शुभे |
नित्य उछाव देवाचा | धन्य संसार होतसे ||८ ||
नवविधा भक्ती देवाची | मुख्य कोण विचारणे |
आध्यात्म शोधिता सर्वे | धन्य संसार होतसे || ९ ||
पंचीकरणे माहांवाक्ये | श्रवणे मनने सदा |
सत्संगे निसंग होता | धन्य संसार होतसे || १० ||
दासाचे बोलणे ऐसे | सर्वज्ञ जाणते तुम्ही |
आह्मी तुम्ही विचारावे | धन्य संसार होतसे || ११ ||
शब्देची लाभती रत्ने | शब्द रत्ने आमोल्यकी |
कोंदणामाजी ते सोने | तैसा  अर्थ प्रचितीचा || १२ ||

स्नान संध्या केली ,टीळे लावले माळा घालून फक्त उपयोगी नाही तर आंतर्निष्ठा पाहिजे आंतर्निष्ठा म्हणजे ज्याच्या मनात कोणाविषयी मत्सर नाही ,सज्जनांना आवडतो ,ईश्वरानुभावाची पूर्ण निष्ठा असते .असा भक्त तो नित्यानित्य विवेकाने वागतो म्हणजे नेहमीच आहेच ते नित्य आणि जे कायम न टिकणारे आहे ते अनित्य हे जो समजतो तो तो नित्या नित्य विवेक करतो .म्हणजे आत्मा नित्य आहे ,देह अनित्य म्हणजे नाशिवंत आहे असे जो जाणतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो न्याय नीतीने वागतो ,न्याय आणि अन्यायाची मर्यादा जो जाणतो ,त्याच्याकडून अन्याय होत नाही ,जो सन्मार्ग धरतो ,देवाचा योग ज्याच्याबरोबर जोडला गेलेला असतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
जो सुंदर देवालये ,शिखरे ,देवालयाचे कळस बांधतो ,साधकांसाठी रहायला धर्मशाला बांधतो ,त्यांचा 
संसार धन्य होतो .
जो अन्नदान करतो ,वस्त्रे दान देतो ,ब्राम्हणांचे पूजन ,भजन करतो ,आणि मी करतो असा अभिमान न बाळगता उदासीन वृत्तीने राहतो त्याचे जीवन धन्य असते .
बावी म्हणजे विहीरी सरोवरे ,टाक्या ,बांधतो ,मठ बांधतो ,वेगवेगळे वृक्ष लावतो व हवा शुध्द ठेवायला हातभार लावतो ,अशी समाज उपयोगी कामे करून लोकांवर उपकार करतो तो धन्य होतो .
जो दुस-याच्या मनाचे जाणतो ,हवे नको ते विचारतो ,सर्व भूतांसी म्हणजे सर्व सजीव प्राण्यांची काळजी घेतो ,सर्वांवर प्रेम करतो जसे संत करतात .त्यांचा संसार धन्य होतो .जो होम याग करतो , पुरश्चरणे करतो ,हरिकथा करतो ,निरुपणे करतो ,यात्रा करतो ,ब्रहमपद मिळविण्यासाठी प्रयत्न साधना ,सत्संग ,गुरुपदेश घेतो ,गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळतो ,अशाचा संसार धन्य होतो .
जो वेदपठण करतो ,पुराणांचे महात्म्य समजतो व नित्य त्याचे पठण करतो ,शुभ असलेल्या पुराणांचे श्रवण करतो ,देवांचे उत्सव करतो ,त्यांचा संसार धन्य होतो .नवविधा भक्ती पैकी कोणती भक्ती श्रेष्ठ ते विचारतो .अध्यात्म म्हणजे काय ते समजावून घेऊन तसे वागतो .त्यांचा संसार धन्य होतो .
पंचमहाभूतांचे कर्दम म्हणजे एकत्र मिसळणे ,म्हणजे पंचीकरण समाजावून घेतो ,चार वेदांची चार महावाक्यांचे गुरुमुखातून श्रवण ,त्यांचे मनन करतो ,सत्संगात राहून होणा-या श्रवणाने जो नि:संग होतो ,त्यांचा संसार धन्य होतो .
हे दासाचे म्हणजे श्रीरामांच्या दासाचे ,समर्थ रामदास स्वामींचे बोलणे आहे आपण सर्व सर्वज्ञ आहात .आपल्या सर्वज्ञपणाचा सर्वांना लाभ देतो त्यांचा संसार धन्य होतो .
शब्द हेच जणू रत्ने ,ही रत्ने अतिशय अमूल्य आहेत .ही शब्द रत्ने जणू कोंदणा मधिल जणू सोनेच .तीच प्रचीती .!