बुधवार, 25 नवंबर 2015



समास ३
ऐसे जीवन्मुक्त ज्ञानी | नित्य स्वरूप समाधानी |
देही प्रापंचिक जनी | परी तो विदेही || १ ||
असे जीवनमुक्त आणि ज्ञानी ,नेहमी स्वस्वरुपाशी अनुसंधान राखलेले असते .सामान्य प्रापंचिक देही असतात पण जीवनमुक्त मात्र विदेही असतो . जीवनमुक्त नेहमी ब्रह्ममय असतो .घरातले व बाहेरचे सर्व व्यवहार सांभाळतो .श्रवण मनन अशी साधने करून तो जगदोध्दार करतो . उत्तम अथवा अधम दोन्ही उपाधीत सम वागणारा सचेतन तो जीवन मुक्त असतो . असा जीवन मुक्त ज्ञानी सुध्दा असतो . ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी असतो .त्याचे स्वत :चे स्वरूप तो ओळखतो .   
नेहमी स्वस्वरुपाशी अनुसंधान साधलेला असतो . तो विदेही असतो .देहात असताना सुख दु:ख भोगावी लागतात ती त्याला भोगावी लागत नाही .त्याला देहाचा अहंकार नसल्यामुळे ,स्वरूपाशी अनुसंधान असल्यामुळे त्याला समाधानाची अवस्था तो भोगतो .
अनित्य सांडून नित्य विवरी | सारासार विचार करी |
जीव लवणरूप सागरी | मिसळोन गेला || २ ||
समाधानाची अवस्था तो भोगतो कारण तो अनित्याचा म्हणजे जे अशाश्वत आहे ,विकारी आहे ,नाशिवंत आहे त्याचा तो विचार करत नाही.समर्थांनी दासबोधात पहिल्या  दशकात नित्याचा विचार केला आहे. सारासार विचार करतो .सारासार म्हणजे केल्याचे वरचे साल म्हणजे असार तर आतले केळे म्हणजे सार .या दृश्य विश्वात जे दिसते ते नष्ट होते ते असार आणि जे दिसत नाही ,ते परब्रह्म ते सार ,सारासाराचा विचार म्हणजे त्या शाश्वत परब्रह्माचा विचार तो करतो .त्यामुळे समुद्रात ज्याप्रमाणे मीठ विरघळलेले असते ,त्यात भरून असते तसे या विश्वात परब्रह्म तत्व मिसळलेले असते . जीव भवसागरामध्ये मिसळून गेलेला असतो .

मग तो देहीच जीवन्मुक्त | अखंडैकरसी तृप्त |
लोकी निर्विकार निर्हेत | पण वागे || ३ ||
मग हा देहामध्ये असतानाच जीवन्मुक्त असतो . अखंडैकर म्हणजे एकरूप ,एकजीव असतो .कुणाशी एकरूप असतो ? तो एकरूप असतो त्या शाश्वताशी ,परब्रह्मतत्वाशी . त्यामुळेच तो तृप्त असतो .त्याला कोणतीही गोष्ट मागायची नसते ,मिळवायची नसते ,कशाचीही ईछा नसते . त्यामुळेच तो लोकांशी वागताना निर्विकार पणे वागतो कारण त्याला कोणापासूनही फायदा मिळवायचा नसतो . निर्हेतुक पणे वागतो .त्याचा असा कोणताही हेतू त्याच्या कोणत्याही कृतीमागे नसतो .

ब्रह्मज्ञान हात्ता चढे | तेणे सार वस्तू जोडे |
भवप्रपंच बाधक उडे | आत्मज्ञानाचे || ४ ||
असे होण्याचे कारण त्याला ब्रहमज्ञान झालेले असते . त्यामुळे तो सार वस्तू म्हणजे ब्रह्म जोडतो .ब्रह्मस्वरूपी लीन झालेला असल्यामुळे प्रपंच रुपी सागर त्याच्या साठी नसतोच कारण तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो . आत्मज्ञाना मुळे मी कोण हे त्याला कळलेले असते . प्रपंच तो भगवंताचा असे मानतो ,मी त्याचा राखणदार मानतो .प्रपंचाची बाधकता त्याला त्रास देत नाही .

अखंड स्वरूपी समाधान | ब्रह्मसाक्षात्कारी लीन |
सहज मावलोन अज्ञान | प्रपंच कार्य निरसे || ५ ||
तो अखंड स्वस्वरुपाशी अनुसंधान साधतो . त्यामुळे समाधानाची प्राप्ती त्याला झालेली असते ब्रह्मस्वरूपी लीन झालेला असतो .त्याला आत्मज्ञान झालेले असल्यामुळे त्याचे अज्ञान मावळते .ज्ञानाचा उदय झालेला असतो . प्रपंचाचा निरास झालेला असतो .म्हणजे प्रपंचातील मिथ्यत्व त्याला समजलेले असते .

संचित कर्म संशायादिक | विपरीत ज्ञान ते बाधक |
म्हणोनी भ्रांतीचे मूळ छेदक | ज्ञान खड़ग | ६ ||
कर्माचे प्रकार ३ .क्रियमाण कर्म ,संचित कर्म ,प्रारब्ध कर्म  .क्रियमाण कर्मे लगेच फळ देतात .काही कर्मे लगेच फळ न देता ते फळ मिळायला वेळ लागतो .ती कर्मे संचितात जमा होतात .जसे परीक्षा दिल्या बरोबर लगेच निकाल लागत नाही त्याला वेळ लागतो .त्याला संचित कर्मे म्हणतात . अशी अनेक संचित कर्मे या जन्माची ,मागच्या जन्माची फळ देण्यास उत्सुक असतात . त्यांची फळे कदाचित आपाल्याला त्रास देणारी असू शकतात . त्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो . भ्रांती ,भ्रम निर्माण होऊ शकतो . भ्रांती ,भीती चा नाश करणारे असते ज्ञानखड्ग .

एरवी सद्गुरूकृपेवीण | कैसेनि जोडे जीवन्मुक्तपण |
म्हणोनी ब्रह्मनिष्ठत्व खूण | विरूळा जाणे || ७ ||
ज्ञान खड्ग हे गुरुच्या हातात असते . सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय जीवन्मुक्त पण अनुभवायला येत नाही . जीवन मुक्ताला ओळखायचे असले तर त्याची ब्रह्मनिष्ठा ही त्याची खूण असते .

ब्रह्मनिष्ठ तोची सद्गुरू | येर अवघा भूतसंचारू |
मंत्रविद्या चमत्कारु | जन भुलविणे || ८ ||
 ब्रह्मनिष्ठा ज्याच्या जवळ असते तोच सद्गुरू असतो . नाही तर तो भूत संचारू असे समर्थ म्हणतात . समर्थांनी जे गुरूंचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत त्यातील जे सद्गुरू नाहीत ,चेटूक करणारे ,मंत्रतंत्र करणारे असतात ,लोकाना चमत्कार करून लोकाना भूलावतात .

उघडे सिद्धीचे भांडार | लोकी भासला चमत्कार |
लोटले अज्ञानाचे भार | शिष्य व्हावया || ९ ||
हे सर्व चमत्कार ,मंत्र तंत्र पाहून अनेक अज्ञांनी  लोक शिष्य होण्यासाठी लोटतात .
साभिमाने भुलले जन्न | नेणती शुध्द आत्मज्ञान |
तरी कैसेनी भवबंधन | तुटेल जाण || १० ||
अशा गुरुंचा अशा अज्ञानी लोकांना अभिमान असतो . पण त्यांना खरे गुरु कोणते ,दांभिक कोणते हे न कळल्यामुळे त्यांना शुध्द आत्मज्ञान जाणता येत नाही .आत्मज्ञान झाले नाही तर या संसार बंधन कसे तुटतील .

तरी सद्गुरुकृपेस्तव तत्वता | आत्मज्ञानाने जीवनमुक्तता |
अचळ साजोज्य हाता | लाभ चढे || ११ ||
सद्गुरुकृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती होते .आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे याचे ज्ञान होते . या चराचराचे मूळ जे शुध्द ,निर्मल स्वरूप आहे त्याचे ज्ञान होते .असे ज्ञान झाल्यावर साधक जीवन मुक्त होतो . अचळ असणारी सायोज्यमुक्ती प्राप्त होते .सायोज्य मुक्ती याचा अर्थ कधीही नाश न पावणारी ,अचळ असणरी कधीही स्वरूपापासून न ढळणारी मुक्ती प्राप्त होते .

आतां जीवन्मुक्त नाम | प्रकृती आंगीचा सुख संभ्रम |
त्रिपुटी रहित आत्माराम | संचला ठाईचा || १२ ||
सायोज्यता मुक्ती मिळते ,तेव्हा नाम परावाणीत जाते ,परावाणी म्हणजे ज्ञान .ज्ञान प्राप्त झाल्यावर कोणत्याही प्रकारची त्रिपुटी रहात नाही ,जसे अज्ञान ,ज्ञान ,विज्ञान .अशा त्रिपुटी पलीकडे  अवस्था येते . आणि आत्माराम सर्वत्र संचला आहे ,व्यापून राहिला आहे असा अनुभव येतो
दृश्यकर्पूर द्रष्टी अनळ | दर्शन तो प्रकाश बहळ |
विरोनी शून्याकार सकळ | होत संकल्पी || १३ ||
दृश्य कापूर आहे ,बघणारा अग्नी आहे ,मग जेव्हा त्या आत्मारामाचे दर्शन होते तेव्हा प्रगट होणारा प्रकाश खूप मोठा असतो . मोठा झगमगाट असतो .आत्मारामामध्ये म्हणजे संकल्पात तो मिसळतो तेव्हा शून्याकार असतो .
तेचि गुरुकृपेचे नि होते | दृश्य गिळोनी शून्यापरते |
स्वरूप न्याहाळीता जीवाते | जीवन्मुक्त पदवी || १४ ||
असेच जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा दृश्य शून्य वाटू लागते .साधकाला स्वरूपाची प्राप्ती होते पण जिवंत असताना जीवाला जीवन्मुक्त ही पदवी मिळते .
लटिके बंधन पावला स्वप्नी | ते मिथ्या जैसे जागेपणी |
जीवन्मुक्तपण निर्वाणी | ठावाची नसे || १५ ||
स्वप्नामध्ये पाहिलेल्या दृश्यामुळे आपल्यावर बंधन आहे असे वाटते ,पण ते खोटे असते .जसे स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात ख-या होत नाहीत तसे जीवन मुक्तपण हे शेवटी ,निर्वाणी म्हणजे मृत्युच्या वेळेस खरे नसते .

नामरूप वाच्य वाचकता | हा प्रकृतीसंबंध चि आईता |
त्यागून जीवन्मुक्तत्व हातां | जरी चढले || १६ ||
नाम रूप बोलणे ,बोलणारा हा सर्व प्रकृती संबंध त्याग केला तर जीवन मुक्त प्रत्यक्षात अनुभवास येते
जेथे विवेकेसी मावळे बोध | तुटे मी तूं पानेसी संवाद |
जेथे जीवनमुक्तपण शब्द | उरेल कैंचा || १७ ||
जीवन्मुक्त ही अवस्था अशी असते की जेथे विवेकाने बोध मावळतो ,मी तू पणाचा संवाद संवाद संपतो . मग जीवन्मुक्त हा शब्द तरी तेथे कसा उरेल ?
ऐसा अनुभव ज्या आला | निर्वाणबोध हातां आला |
ऐसा साधू यया बोला | मानिजे सत्य || १८ ||
असा अनुभव ज्याला येतो त्याला निर्वाण बोध हातात येतो .निर्वाण  याचा अर्थ ब्रह्मज्ञान .जे एकमेव आहे .जे कळण्यास अवघड आहे  
देहभांव जी नाही जया | पापपुण्य कैसे त्या |
असोनि पुत्र मित्र जाया | निर्मुक्त कर्मी || १९ ||
ब्रह्मज्ञान झाले की त्याचा देहभाव रहात नाही . अहंकार नाही ,पापपुण्य रहात नाही .मग त्याला मुले ,मित्र ,पत्नी असली तरी तो मुक्त पाने कर्म करतो म्हणजे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत नाही .कर्म करून अकर्ता राहतो ,भोगून अभोक्ता राहतो .
गुणभूते बारा वाटे | विताळोनी कर्मतवा फाटे |
देहबुध्दीचा समंध तुटे | सहजचि ऐसा || २० ||
त्रिगुण आणि पंचमहाभूते आठ असली तरी जास्त वाटतात असे वाटते की जणू कर्म रुपी तवा वितळतो आहे आणि फाटतो आहे .
आता देह संमधाचे खितपणे | ते सहजची जाले वायाणे |
पावता आत्यंतिक खुणे | असोनी नाही || २१ ||
जीवन्मुक्त देह आहे म्हणून जगात असतो .वास्तविक त्याची देहबुद्धी झाडून गेल्यामुळे सुख दु:ख ,राग लोभ काहीच उरलेले नसते .त्याच्या दृष्टीने ते आयुष्य व्यर्थ असते ,तो असून नसल्यासारखा असतो .याच्या खुणा त्याला मिळतच असतात .
 इति श्री रामदास कवी | पापपंकशोषक रवी |
साधू दर्शने ब्रह्मपदवी | माहा पुण्य लाभ || २२ ||
रामदास कवी पापशोषण करणारा रवी म्हणजे सूर्य आहेत . साधूच्या दर्शनांने अतिशय  पुण्य लाभ होतो कारण ब्रह्मपदवी प्राप्त होते .  






 
  



मंगलवार, 31 मार्च 2015

समास २



समास २
जय जय सद्गुरू निर्विकल्पा | जय जय सद्गुरू अरूपा |
आलिंगीता सुखस्वरुपा | पदवी लाभे || १ ||
समर्थ सद्गुरुंचा जयजयकार करत आहेत .ते म्हणतात सद्गुरू निर्विकल्प आहेत .संशय रहित आहेत .अरूप आहेत .सुखस्वरूप आहेत सद्गुरूंच्या भेटीने फक्त सुखाचीच प्राप्ती होते .
जो सर्वां लाभांचा शेवट | किं विश्रांतीचे मूळपीठ |
ज्ञानचर्चेस खटपट | निवांत जेथे || २ ||
सर्व लाभ एकत्र केले आणि सद्गुरुंचा लाभ बघितला तर तो सर्व लाभांच्या पेक्षा जास्त आहे कोणताही लाभ सद्गुरू लाभापेक्षा जास्त नाही .हा लाभ विश्रांतीचे मूळ पीठ आहे .सद्गुरुंजवळ आल्यावर संपूर्ण विश्रांती मिळते .ज्ञानाच्या चर्चांना तेथे विश्रांती मिळते कारण सद्गुरू सर्व संशयाचे निरसन करतात .
जें पूर्वीचे ही पूर्व | जे आदि मध्य भरीव |
अवसान त्रिपुटी सर्व | आपणचि असे || ३ ||
कारण सद्गुरू पूर्वी ही होते ,आदी मध्य भरीव आहे म्हणजे जे पूर्वी होते ,आता आहे ,नंतर ही असणार आहे ,सर्व त्रिपुटी सद्गुरुच आहेत .सर्व काही तेच आहेत .
जे असेना नसे वर्म | जे कळेना न कळे  भ्रम |
गेलीयाने अंतर्याम | ठाउके पडे || ४ ||


जे कळत नाही ,जो भ्रम नाही ,जे प्रत्यक्ष दिसत नाही ,पण आहे ,त्याचे ते नक्की कसे समजेल याचे वर्म काय आहे ते कळत नाही .पण अंतर्यामी गेले की ठाऊक होते असे समर्थ म्हणतात .अंतर्यामी कसे जायचे ? ते कळत नाही ,आणि अंतर्यामी जायचे म्हणजे काय ते कळत नाही .
जे येक ना अनेक | जे तर्के ना अतर्क्य |
अनिर्वाच्य येकयेक | गुह्य गुज || ५ ||
जे एक नाही ,अनेकही नाही ,ज्याचा तर्क करता येत नाही ,जे अतर्क्य ही नाही ,ज्याचे वर्णन ही करता येत नाही असे ते गुह्य म्हणजे गुप्त आहे .गुप्त गोष्ट आहे .
असो ऐसिया सद्गुरू | वर्णू नेणे काय करू |
स्तुती करता विसरू | माझा मज पडे || ६ ||
अशा सद्गुरू चे वर्णन मी कसे करू ? मी त्याची स्तुती करायला गेलो माझा मलाच विसर पडतो .
आपुलेन विसरलेपणे | विसरल्याचेनि विस्मरणे |
तेणे गुणे हे बोलणे | अबध्द माझे || ७ ||
आपल्या विसरले पणाची भावना ही विसरून जाते .कारण माझा मी राहतच नाही .मी सद्गुरुंशी एकरूप होतो त्यामुळे माझे बोलणेही माझे रहात नाही .
असो आता पूर्वीचे समासी | स्वप्न पडिले अजन्मासी |
तये निरुपणे रिघायासी | मार्ग फुटेना || ८ ||
आधीच्या समासात अजन्माला स्वप्न पाडले होते ,त्यांचा अर्थ काय हे समजत नाही .त्याचे निरुपण कसे करायचे ते समजत नाही
म्हणोनि ते निरुपण | केले चि करावे श्रवण |
तेथील जे कां खूण | ते सांगिजो जी स्वामी || ९ ||
म्हणून स्वामी आपण ते निरुपण केले होते तरी ते पून्हा करावे .ते पून्हा आम्ही श्रवण करावे .त्याची खूण आम्हास पून्हा सांगावी. 
अजन्मा तो  सांग कवण | तेणे कैसे देखिले स्वप्न |
तेथे कैसे समाधान | ते प्रगट कीजो जी || १० ||
अजन्मा कोण आहे ? त्याने कोणते स्वप्न पाहिले ? ते कळल्याने कोणते समाधान मिळणार आहे ते कृपा करून सांगा .
जाणोनी शिष्याचा आदर | स्वामी बोलती प्रत्योत्तर |
तेचि आता अति तत्पर | श्रोते येथे परिसावे || ११ ||
शिष्याचा गुरु प्रति असलेला आदर पाहून स्वामी उत्तर देते झाले ते आता तत्परते श्रवण करावे .
ऐक गा शिष्या सावधान | अजन्मा तो तू तूचि जाण |
तुवां देखिले स्वप्नी स्वप्न | ते मी आता सांगेन || १२ ||


हे शिष्या सावधान होऊन ऐक . अजन्मा तूच आहेस .तूच स्वप्नात स्वप्न पाहिले आहेस .ते आता मी तुला सांगतो .
स्वप्नी स्वप्नाचा विचार | तो तू जाण हा संसार |
येथे तुवा सारासार  | विचार केला || १३ ||
स्वप्नात स्वप्नाचा विचार म्हणजे हा संसार आहे .तू येथे सारासार विचार केला आहेस .
रिघूनी सद्गुरुसी शरण | काढूनी शुध्द निरुपण |
याची करिसी उण खूण | प्रत्यक्ष आता || १४ ||
सारासार विचार असा केला आहेस की तू सद्गुरुंना शरण आला आहेस .तू ऐकलेल्या या शुध्द निरुपणातून तू तुझी खूण पटवून घे .
याचा घेता अनुभव | बोलणे तितुके होते वाव |
निवांत विश्रांतीचा ठाव | हे तू जाण जागृती || १५ ||.
या शुध्द निरूपणात सांगितलेल्या गोष्टींचा तू अनुभव घेशील तर तुझे बोलणे खुंटून जाईल .तू विश्रांती चे सुख अनुभवशील .सुख समाधानाचा अनुभव घेशील .तीच तुझी जागृती आहे असे समज .
ज्ञानगोष्टींचा गलबला | सरोनी अर्थ प्रगटला |
त्यांचा विचार घेता आला | अंतरी अनुभव || १६ ||
हे सुख तू कसे अनुभवशील ? तुझ्या मनात आत्ता पर्यंत अनेक शंका होत्या ,त्या शंका फिटतील आणि खरे शुध्द ज्ञान तुझ्यात प्रगट होईल आणि मग तुला सुखाचा अनुभव घेता येईल .
तुज वाटे हे जागृती | मज आली अनुभवाप्रती |
या नाव स्वप्न भ्रांती | फिटलीच नाही || १७ ||
मग तुला वाटेल मला जागृती आली .मला अनुभव आला .पण हा स्वप्नातला भ्रम आहे .हा भ्रम अजून संपला नाही .
अनुभव अनुभवी विराला | अनुभवेवीण अनुभव आला |
हा हि स्वप्नाचा चेईला | नाहीसा बापा || १८ ||
अनुभव अनुभवात विरून गेला .मग अनुभवाशिवाय अनुभव आला .स्वप्नातून जागा झालास .स्वप्न नाहीसे झाले .
जागृती या पैलीकडे | ते सांगणे केवी घडे |
जेथे हे सकळ मोडे | मोडलेपणेसी || १९ ||
स्वप्न नाहीसे झाले .तू जागा झालास .जागृती या पलीकडे आहे हे सांगायचे केव्हा होईल ? जेव्हा सगळे मोडेल तेव्हा म्हणजे तुझे सर्व अनुभव विरतील तेव्हा
जागा जालिया स्वप्नउर्मी | स्वप्न म्हणसी अजन्मा तो मी |
ते उर्मी गेलिया वर्मी | वर्मची अवघे || २० ||


स्वप्नाच्या उर्मीतून जागा झाला .स्वप्नात म्हणत होता मी अजन्मा आहे .स्वप्नाची उर्मी म्हणजे उमाळा गेला की सर्व वर्म म्हणजे रहस्य च तुला कळेल .
शिष्या अंती मति सा गती |ऐसे सर्वत्र बोलती |
तुझा अंती तुझी प्राप्ती | तुज चि जाली || २१ ||
शिष्या असे सर्वत्र म्हणतात की शरीर त्यागण्याच्या वेळेस जेथे वासना असते ती गती प्राप्त होते जसे जड भारताला मृत्यूसमयी हरीण बालकाची काळजी होती त्यामुळे त्याला पुढचा जन्म त्याला हरिणाचा मिळाला ..तुला तू मिळालास म्हणजे तुझे आत्मस्वरूप तुला प्राप्त झाले .
जो चवदेहाचा अंत |जन्म मुळाचा प्रांत |
अंतप्रान्तासी अलिप्त | तो तू आत्मा || २२ ||
चार देहांचा अंत झाला .स्थूळ ,सूक्ष्म कारण आणि महाकारण या माणसाच्या देहाच्या चार अवस्था असतात .या चार देहांचा अंत झाला .जन्म आणि मृत्यू या दोनही गोष्टी मानवी देहासाठी अपरिहार्य आहेत .जेव्हा साधकाला शुध्द ज्ञान होते ,मी म्हणजे शरीर नाही तर मी म्हणजे आत्मा आहे याचा अनुभव येतो तेव्हा जन्म मृत्यू च्या फे-यातून त्याची सुटका होते .कारण मी म्हणजे आत्मा आहे असा बोध होतो आणि आत्म्याला जन्म मृत्यूचे बंधन नसते .
जयासी ऐसी आहे मती | तयासी अंती आत्मगती |
गती आणि अवगती |वेगळाची तो || २३ ||
मी आत्मा आहे असा बोध होतो तेव्हा तो आत्मस्वरूप होऊन जातो .गती आणि अवगती असणारा आत्मा वेगळाच असतो
मति खुंटली वेदाची | तेथे गती आणि अवगती कैची |
येणे विवेके प्राणीयाची | भ्रांती फिटे श्रवणे || २४ ||
मग ती अवस्था वेद ही वर्णन करू शकत नाहीत .त्या अवस्थेत गती आणि अवगती दोन्ही नसते . मग अशा वेळेस प्राण्याची म्हणजे साधकाची श्रवणाने भ्रांती म्हणजे भ्रम नाहीसा होतो .
मिथ्या जीवित्व या नाव भ्रांती | भ्रांति फिटता आत्मप्रचीती |
प्राणी पावला उत्तम गती | सद्गुरू बोधे || २५ ||
येथे समर्थांनी भ्रांतीची व्याख्या केली आहे .ते म्हणतात की सामान्य माणसे जी अज्ञानात जीवन जगात असतात ,देहबुद्धीने जीवन जगात असतात ती भ्रांती म्हणजे भ्रम असतो .तो भ्रम नाहीसा झाला की आत्मप्रचीती येते .आत्मप्रचीती सद्गुरू बोध करतात आणि येते .मग त्या प्राण्याला उत्तम गती मिळाली असे म्हटले जाते .
सद्गुरू बोध जेव्हा जाला | चौदेहाचा अंत जाला |
तेणे निजध्यास लागला | स्वस्वरुपी || २६ || 


सद्गुरू बोध होतो ,सद्गुरू अनुग्रह देतात ,उपदेश करतात ,शिष्य तयारी चा असेल तर स्थूळ ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण या चार ही देहांचा अंत होतो .देहबुद्धी चा नाश होतो .मग स्वस्वरूपाचा निदिध्यास लागतो .सतत स्वस्वरुपाचेच चिंतन चालू राहते .
तेणे निजध्यासे प्राणी | ध्येय चि जाला निर्वाणी |
सायोज्य मुक्तीचा धणी | होऊन बैसला ||  २७ ||
स्वस्वरूपाचा निदिध्यास लागला की सायोज्यमुक्ती जे त्याचे ध्येय आहे ते ध्येय तो प्राप्त करून घेतो .सायोज्य मुक्ती ही चौथी मुक्ती आहे .स्वलोकता , समीपता  सरूपता , आणि सायोज्यता अशा चार मुक्ती आहेत .पहिल्या तीन मुक्ती नाशिवंत ,न टिकणा-या आहेत पण सायोज्यता मात्र टिकणारी आहे .शाश्वत आहे .अशा शाश्वत मुक्तीचा धणी साधक होतो .
दृश्य पदार्थ वोसरता | अवघा आत्माची तत्वता |
नेहटून विचारे पाहतां | दृश्य मुळीच नाही || २८ ||
दृश्य म्हणजे दिसणारे पदार्थ मिथ्या आहेत ,नाशिवंत आहेत ,परिवर्तनशील आहेत हे मनापासून पटले की सर्वत्र आत्मरूपच भरून राहिले आहे असे प्रत्ययाला येते .जसे गोपींना सर्वत्र कृष्णच दिसत होता .दृश्य विश्व खरे नाही हे प्रत्ययाला येते .
मिथ्या मिथ्यत्वे पाहिले | मिथ्यापणे अनुभवा आले |
श्रोती पाहिजे ऐकिले | या नाव मोक्ष || २९ ||
दृश्य विश्व जे मिथ्या आहे खोटे आहे ,ते मिथ्यत्वाने पाहिले म्हणजे साक्षित्वाने पाहिले ,त्यांचा अनुभव घेतला तेव्हा त्याला मोक्ष असे म्हणतात असे श्रोत्यांनी ऐकावे असे समर्थ सांगतात .
सद्गुरूवचन हृदयी धरी | तो चि मोक्षाचा अधिकारी |
श्रवणमनन केलेची करी | अत्यादरे || ३० ||
जो सद्गुरू वचन हृदयाशी धरून ठेवतो म्हणजे सद्गुरू वचनावर पूर्ण विश्वास ठेवतो ,सद्गुरुंची आज्ञा तंतोतंत पाळतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो .पण त्याला अतिशय आदराने श्रवण मनन करावे लागते श्रवण मनन पून्हा पून्हा कर असे समर्थ सांगत आहेत .
जेथे आटले दोनी पक्ष | तेथे ल्क्ष ना अलक्ष |
या नाव जाणिजे मोक्ष | नेमस्त श्रोती || ३१ ||
जेथे दोन्ही पक्ष आटतात म्हणजे जेथे पूर्वपक्ष मी देह हा असतो ,आणि मी आत्मा आहे हा उत्तर पक्ष असतो तेव्हा मी देह आहे हा पूर्व पक्ष नाहीसा होतो ,पुढे जाऊन मी आत्मा आहे स्वस्वरूप आहे हा सुध्दा पक्ष मावळतो ,मीपणा संपूर्ण संपतो आणि मी पणा स्वस्वरुपात लीन होतो तेव्हा मोक्ष प्राप्ती होते ही गोष्ट श्रोत्यांनी लक्षात घ्यावी .
जेथे ध्यानधारणा सरे | तेथे मनाची हाव पुरे |
अवघा रामची उरे | आनंदरूप || ३२ ||


मोक्षप्राप्ती झाली की ध्यान धारणेची गरज उरत नाही .मनाला कोणतीही हाव उरत नाही .मग फक्त आनंदरूप असणारा रामच उरतो .
भवमृगजळ आटले | लटिके बंधन तुटले |
अजन्म्यासी मुक्त केले | जन्मदु:खापासूनि || ३३ ||
संसार रुपी मृगजळ आटले .जशी सूर्य किरणांच्या प्रखरते मुळे जमिनीवर पाण्याचा भास होतो त्याप्रमाणे हे दृश्य विश्व आणि त्यामध्ये वावरणारे सर्व प्राणी हे भास आहेत ,खोटे आहेत हे कळते ,आपण ज्या मुले ,बायको ,घर ,संसार या सर्व खोट्या बंधनात बांधलेले असतो त्यातून सुटतो . मग जो अजन्मा आहे त्याला जन्म दु:खां पासून मुक्त केले जाते म्हणजे जन्म मृत्युची येरझारा संपते .
लटीकेची परी दृढ होते | भयं फिटले अद्वैत मते |
काळें ग्रासिली पंचभूते | आपणेसीं || ३४ ||
काळ पंचभूतांना ग्रासतो ,खाऊन टाकतो ,त्यांचा नाश  करतो पण या लटक्या गोष्टींचे पंच महाभूतांचे भयं नाहीसे होते .सर्वत्र परब्रह्म भरून आहे ,त्याच्या शिवाय एकाही ठिकाणी अशी एकही जागा नाही की जेथे परब्रह्म नाही मोक्ष प्राप्ती नंतर साधकाला अनुभव येतो की तोच सर्वत्र भरलेला आहे ,मग कोणाचे भयं वाटणार ? 
प्रारब्धी टाकला देहो | बोधे फिटला संदेहो |
आताचि पडो अथवा राहो |मिथ्या कलेवर || ३५ ||
गुरुबोध झालेला असा भयं रहित ,निर्भय झालेला ,मोक्ष मिळवलेला साधक देहाच्या बाबतीत उदासीन होतो .देह आत्ता पडला काय की नंतर पडला काय कारण हे कलेवर म्हणजे देह मिथ्याच खोटाच ,नश्वर .तो केव्हातरी पडणारच मग केव्हाही पडो. प्रारब्ध असेल तितके दिवस राहील असा विचार करतो .
ज्ञानीयाचे जे शरीर | ते मिथ्यत्वे निर्विकार |
म्हणोनि जेथे पडे तेचि सार | पुण्यभूमी || ३६ ||
ज्ञानी माणसाचे शरीरा बद्दल ज्ञानी माणसाला आसक्ती नसते ,ते शरीरा बद्दल निर्विकार असतात .देहबुद्धी संपूर्ण नाहीशी झालेली असल्यामुळे त्यांचे शरीर कोठेही पडले तरी त्यांना त्याची पर्वा नसते .जसे संत कबीर काशीत असून ते मृत्यू समयी मगहर ला  गेले .
साधुदर्शने पावन तीर्थ | पुरती त्याचे मनोरथ |
साधू न येता जिणे व्यर्थ | तया पुण्यक्षेत्राचे || ३७ ||
साधू चे दर्शन झाले की पवित्र तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेण्याचे पुण्य मिळते .साधू दर्शनाने मनोरथ पूर्ण होतात .जर एखाद्या तीर्थक्षेत्रावर साधू आला नाही तर त्या पुण्य क्षेत्री जाऊनही फायदा नाही .
पुण्य नदीचे जे तीर | तेथे पडावे शरीर |
हा इतरांचा विचार | साधू तो नित्यमुक्त || ३८ ||
उत्तरायण ते उत्तम | दक्षिणायंन ते अधम |
हा संदेही वसे भ्रम | साधू तो नि:संदेही || ३९ ||
देह्याचा अंत भला झाला | देहो सुखरूप गेला |
त्यासी म्हणती महा भला | पुण्यपुरुष || ४० ||
सामान्य माणसाच्या दृष्टीने कोणता मृत्यू चांगला आणि कोणता वाईट याचे सुंदर विवेचन समर्थांनी दासबोधात दशक ७ समास दहा देहांत निरुपण या समासात केले आहे .त्यातील काही ओव्या येथे घेतल्या आहेत .पुण्य नदीच्या काठी ,उत्तरायण शुक्ल पक्ष ,घरात दिवा जळत असताना मरण आले तर चांगले ,दक्षिणायनात ,वद्य पक्षात मरण आले तर ते वाईट असा समाज आहे . साधूं च्या मनात अशा शंका कधी येत नाहीत कारण साधू नित्य मुक्त असतो .देहाला फारसे कष्ट न होता मृत्यू आला तर तो भला माणूस पुण्यवान माणूस समजला जातो .पण साधूची गोष्टच वेगळी असते .त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती झालेली असल्याने देह कुठेही कसाही पडला तरी त्याला फारसा फरक पडत नाही .
पुढे हे चि निरुपण | देह अहंभाव खंडन |
जीवन्मुक्ताची खूण | निरोपिजेल || ४१ ||
इति श्री रामदास ग्रंथ |पुढे वोगरिल परमार्थ |
साधूदर्शनाचा पुण्यार्थ | परिसोत श्रोते || ४२ ||
आता पुढे हेच निरुपण चालू राहील .देहाचा अहंभाव कसा नाहीसा करायचा ते सांगेन .जीवन्मुक्त कसा ओळखायचा ते ही सांगेन .रामदासांनी लिहिलेला हा ग्रंथ पुढे परमार्थ सांगेल .साधू दर्शनाचे पुण्य घेण्या साठी श्रोत्यांनी हा ग्रंथ ऐकावा .