शुक्रवार, 27 मई 2011

अंतर्भाव समास ५


अंतर्भाव

समास ५

ऐक शिष्या सावधान | येकाग्र करुनिया मन |

तुवां पुसिले अनुसंधान \ अंत समयीचे ||१||

तरी अंत कोणासी आला | कोण मृत्याते पावला |

हा तुवां विचार केला |पाहिजे आता ||२||

अंत आत्म्याच्या माथा | हे तो न घडे सर्वथा |

सस्वरूपी मरणाची वार्ता | बोलोंचि नये | |३||

स्वरूपी तो अंत नाही | येथे पाहणे न लगे काही |

मृगजळाच्या डोही | बुडो चि नको ||४ ||

आतां मृत्य देहासी घडे | तरी ते अचेतन बापुडे |

शवास मृत्यू न घडे | कदा कल्पांती ||५||

आता मृत्य कोठे आहे | बरे शोधूनि पाहे |

शिष्य विस्मित होऊनि राहे | क्षण येक निवांत ||६||

मग पाहे स्वामीकडे | म्हणे हा देह कैसा पडे |

चालविता कोणीकडे | निघोनी गेला ||७ ||

देह चालवितो कोण | हे मज सांगावी खूण |

येरू म्हणे हा प्राण | पंचकरूप ||८||

प्राणास कोणाची सत्ता | येरू म्हणे स्वरूप सत्ता |

सत्ता रूपे तत्वता | माया जाण ||९||

मायेची माईक स्थिती | ऐसे सर्वत्र बोलती |

माया पाहातां आदी अंती | कोठेची नाही ||१०||

अज्ञानासी भ्रांति आली |तेणे दृष्टी तरळली |

तेणे गुणे आडळली | नस्ती च माया ||११||

शिष्या होई सावचित्त | मायेचा जो शुध्द प्रांत |

तोचि चौदेहाचा अंत | सद्गुरू बोधे ||१२||

चत्वार देहाच्या अंती | उरली शुध्द स्वरूप स्थिती |

तेणे गुणे तुझी प्राप्ती |तुजसी झाली ||१३||

जन्मला चि नाही अनंत | तयास कैचा येईल अंत |

आदि अंती निवांत | तो चि तू आप घा ||१४ ||

स्वामी म्हणती शिष्यासी |आता संदेह धरिसी |

तरी श्रीमुखावरी खासी | निश्चयेसी ||१५ ||

देह्बुध्दिचेनी बळे |शुध्द ज्ञान ते झांकोळे |

भ्रांती हृदयी प्रबळे | संदेह रूप ||१६ ||

म्हणोनि देहातीत ते सुख | त्याचा करावा विवेक |

तेणे गुणे अविवेक |बाधू न शके ||१७ ||

तुटले संशयाचे मूळ |फिटले भ्रांतीचे पडळ |

तयास अंत केवळ | मूर्खपणे भ्रांती ||१८ ||

जे जन्मलेची नाही |त्यासी मृत्यू चिंतीसी कायी |

मृगजळाचा डोही |बुडोची नको ||१९||

मनाचा करूनी जयो |याचा करावा निश्चयो |

दृढ निश्चये अंत समयो |होऊनि गेला ||२० ||

आदि करूनी देहबुद्धी | देह टाकीला प्रारब्धी |

आपण देहाचा संबंधी | मुळीच नाही ||२१ ||

अस्ते करुनी वाव |नस्त्याचा पुसूनी ठाव |

देहातीत अंतर्भाव |अस्ते खुणेने असावे ||२२ ||

हे समाधान उत्तम | अस्तेपणाचे जे वर्म |

देहबुद्धीचे कर्म |तुटो जाणे ||२३ ||

आता तुटली आशंका | मार्ग फुटला विवेका |

अद्वैत बोधे रंका राज्यपद ||२४||

तंव शिष्ये आक्षेपिले |आता स्वामी दृढ झाले |

तरी हे ऐसे चि बाणले |पाहिजे की ||२५ ||

निरूपणी वृत्ती गळे |शुध्द ज्ञान प्रबळे |

उठोनी जाता स्वयेची मावळे | वृत्ती मागुती ||२६ ||

सांगा यासी काय करू | मज सर्वथा न धरे धीरू |

ऐका सावध विचारू | पुढिलीये समासी ||२७ ||

शिष्याने समर्थांना करुणेने प्रश्न विचारला की मी कोणाचे अनुसंधान अंतसमयी

ठेवू ?अंतसमयी मी माझे समाधान कसे टिकवू ?

समर्थ उत्तर देतात :

हे शिष्या ,एकाग्रतेने ऐक .अंतसमयी अनुसंधान कसे ठेवू असे तू विचारतो आहेस .तू

विचार कर अंत कोणाचा झाला ? मृत्यू कोण पावला ? तुला आत्म्याचा अंत वाटत

असेल तर अरे ,आत्म्याचा अंत होत नसतो आत्मा स्वरूप रूप असतो त्याचा कधीच

अंत होत नाही .स्वरूपाचा अंत ही कल्पना करणे म्हणजे मृगजळाच्या मागे लागण्या

सारखे आहे .,खोटी आहे .

मृत्यू देहाला आहे असे मानावे तर ते गरीब बिचारे अचेतन आहे .त्यामुळे शवाला मृत्यू

झाला असे मानणे योग्य होणार नाही .मग आता मृत्यू कोणाला होतो ,तो कोठे असतो

ते शोधून पहा . हे ऐकल्यावर शिष्य आश्चर्य चकित होऊन एक क्षण पहात राहिला

.मग समर्थांना विचारतो ,आत्म्याला मृत्यू नाही ,देहाला मृत्यू नाही ,मग हा देह का

पडतो ? त्याला चालवणारा कोठे निघून जातो ? हा देह कोण चालवतो तो कसा

असतो ?त्याची खूण कृपा करून महाराज ,मला सांगावी .

एक जण म्हणतो ,हा प्राण पंचक रूप आहे शरीरात पंचप्राण आहेत .या प्राणांवर

कोणाची सत्ता असते ? एक जण म्हणतो स्वरूप सत्ता स्वरूपाची सत्ता म्हणजे

मायेची सत्ता .माया स्वरूपाची शक्ती .तिचीच सत्ता सर्वत्र चालते .तिच्या सत्तेनेच हे

विश्व चालते .परंतु माया मायिक आहे असे सर्व म्हणतात .कारण ती आपल्याला

दिसत नाही .पण तिचे परिणाम मात्र दिसतात .

अज्ञानी माणसाला भ्रम होतो .त्याची दृष्टी तरळते ,तिला योग्य दिसत नाही त्यामुळे

तिला नसलेली माया आढळते .

परब्रह्माला जे पहिले स्फुरण झाले ,मी एक आहे ,अनेक व्हावे तीच शुध्द माया .ही

माया जशी माणसाला अज्ञानात भरकट ठेवते ,तसे त्याला शुध्द आत्मस्वरूपाकडे ही

नेते .

हे शिष्या ,सावध हो ,तू मायेचे शुध्द स्वरूप स्थिती पाहिलीस तर तुला या चार देहाचा

निरास करता येईल जेव्हा तू या चारही देहांच्या पलीकडे जाशील तेव्हा तू स्वरूप

स्थितीला जाशील .तेव्हा तुला तुझी प्राप्ती होईल .म्हणजे स्वरूप स्थिती हेच तुझे खरे

रूप आहे .हे सर्व तुला सद्गुरूंच्या बोधामृतानेच कळणे शक्य होईल .

तू स्वरूपात लीन होशील .तुला तुझी स्थिती प्राप्त होईल आणि मग तू अनादी अनंत

अजन्मा असे स्वस्वरूप होशील .मग तुला जन्म आणि मृत्यू कसा असेल ? तो

विश्वाच्या आधीही होता ,नंतरही असणार आहे त्यामुळे त्याला अंत नाही तू

स्वस्वरूपात विलीन झाल्यामुळे तूही स्वस्वरूपच होशील मग तुला अंत कसा ? तुला

जन्म कसा ? तू अजन्माच आहेस .तू अनादी अनंत आहेस .आता तुला काही शंका

आहे का ? आता तू शंका घेतलीस तर मात्र थोबाडीत मारून घेण्याची अवस्था तुझी

होईल .

सदेह ,शंका घेतलीस तर तुझी देहबुद्धी वाढेल .तू स्वस्वरूप आहेस हे तुला झालेले

शुध्द ज्ञान झाकोळून जाईल .तुझ्या मनात भ्रम उत्पन्न होईल .तुझ्या स्वस्वरूपाच्या

ज्ञानाला अज्ञानाने झाकून टाकायला नको असेल तर तू विवेक कर .देहबुद्धी सोडून

देहातीत होण्यात जे सूख आहे त्याचा विवेक कर .तसे केलेस तर अविवेक तुझ्यावर

काही परिणाम करू शकणार नाही .

देहातीत म्हणजे मी देह आहे हा विचार न करता मी आत्मा आहे ,मला सुख दु:ख

नाही ,मला राग लोभ नाही ,असा विवेक केला तर तुला कोणतेही दु:ख ,कोणतीही

भावना बाधू शकणार नाही .कोणताही संशय तुला बाहू शकणार नाही .तुझा सगळा

भ्रम नाहीसा होईल .तुझ्या स्वस्वरूपाला अंत आहे हा भ्रम नाहीसा होईल .

त्यामुळे हे शिष्या ,तू अनादी अनंत अजन्मा असल्यामुळे तुला जन्मही नाही ,मृत्युही

नाही .तू तुझ्या जन्म मृत्युची खुळी कल्पना करू नकोस .मृगजळाच्या मागे धावू

नकोस .

मनाशी हे पक्के ठरवं ,की तू स्वस्वरूपच आहेस .दृढ निश्चय कर की तुला जन्म

मृत्यू नाही .देहबुद्धी सोड ,या स्थूल देहाला प्रारब्धावर सोडून दे .तुझा आणि या स्थूल

देहाचा काही संबध नाही याचा दृढ निश्चय कर .मी आत्मा आहे या आहे पणाचा भाव

वाढवं आणि मी देह नाही हा नाही पणाचा भाव वाढवं .असे केलेस तर तुझे समाधान

तुला देहबुद्धी वाढवू देणार नाही .

आता तुझी शंका फिटली .विवेक अंगी रुजला .या अद्वैत बोधाने भिका-याला ही

राजपद मिळते .

यावर शिष्य म्हणतो ,महाराज ,मला अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली पण हे ज्ञान अंगी

बाणले पाहिजे ..निरुपण ऐकताना वृत्ती पसरत नाहीत .ताब्यात असतात .शुध्द

ज्ञानाचा अंमल असतो .पण निरुपण संपले की पून्हा ये रे माझ्या मागल्या अशी गत

होते .,याला काय करू ? महाराज ,मला आता धीर निघत नाही .कृपा करून मला

मार्गदर्शन करा .

सोमवार, 11 अप्रैल 2011

अंतर्भाव समास ४

अंतर्भाव

समास ४

सिद्ध होउनि बैसला | दृष्टी नाणी साधनाला |

सादर अशन शयानाला | अत्यादरे करुनी ||१||

ऐसा जो विषयासक्त | अत्यंत विषई आसक्त |

सिद्धपणे आपुला घात |तेणे केला ||२||

जो सिध्दांचा मस्तकमणी |माहांतापासी शूळपाणी |

तो हि आसक्त श्रवणी | जपध्यान पूजेसी ||३||

अखंड वाचे रामनाम |अनुष्ठाता हि परम |

ज्ञान वैराग्य संपन्न |सामर्थ्य सिंधू ||४||

तो हि म्हणे मी साधक | तेथे मानव बापुडे रंक |

सिद्धपणाचे कौतुक |केवीं घडे ||५||

म्हणौनी साधनेसी जो सिद्ध |तोचि ज्ञाता परम शुध्द |

येर ते जाणावे अबध्द | अप्रमाण ||६||

साधनेवीण बाष्कळता |ते चि जाणावी बद्धता |

तेणे घडे अनर्गळता | आसक्ती रूपे ||७||

मन सुखावले जिकडे | आंग टाकले तिकडे |

साधन उपाय नावडे | अंतरापासूनि ||८||

चित्ती विषयाची आस |साधन म्हणता उपजे त्रास |

नेम धरिता कासावीस |परम वाटे ||९||

दृढ देहाची आसक्ती |तेथे कैची पां विरक्ती |

विरक्ती वीण भक्ती | केवी घडे ||१०||

ऐक गा शिष्या टिळकां | नेम नाही ज्या साधका |

तयासी अंती धोका |नेमस्त आहे ||११||

तवं शिष्ये केली विनंती |अंशी मती तेचि गती |

ऐसे सर्वत्र बोलती |तरी मी काये करू ||१२ ||

अंती कोण अनुसंधान |कोठे ठेवावे हे मन |

कैसे राहे समाधान |तये समयी ||१३ ||

अंत समयो येईल कैसा | हा तो न कळे भर्वसा |

प्राप्त होईल कोण दशा | हे तो श्रुत नाही ||१४||

ऐसी आशंका घेतली मने | शिष्य बोले करुणा वचने |

याचे उत्तर श्रोते जाने | सावध परिसावे ||१५||

एक जण सिद्ध झाला पण त्याने साधन करायचे असते या कडे दुर्लक्ष केले .अत्यंत आवडीने त्याने झोप आणि खाणे पिणे करायला सुरुवात केली .असा तो विषयासक्त झाला .सिद्ध असूनही साधन न केल्यामुळे त्याने घात करवून घेतला .

जो सिध्दांचा मुकुट मणी आहे,,महा तप करणा-या मध्ये श्रेष्ठ असणारे शंकर ,त्यांनाही श्रवण करण्यात आसक्ती आहे .,जप ध्यान करण्यात आसक्ती आहे .

ते अखंड राम नामाचा जप करतात .सतत अनुष्ठाने करतात .ज्ञान ,वैराग्य ,सामर्थ्याने युक्त असलेले शंकर ही स्वत:ला साधक म्हणवतात .मग आपण तर क्षुद्र मानव ! आपल्या सिद्धपणाचे कौतुक कोणाला सांगणार ?

म्हणून साधना करण्याची ज्याची तयारी असते तोच खरा शुध्द असतो .बाकीचे सगळे अबध्द म्हणजे बध्द असतात .साधने शिवाय जे राहू शकतात ते बद्धच असतात .बद्ध्तेने आसक्ती येते आणि अध:पतन होते .बध्दतेने मनाला ,शरीराला जिकडे सुख वाटेल ,तिकडे अंग टाकले जाते म्हणजे मन वैषयिक गोष्टींकडे आकर्षिले जाते . मना पासून साधन आवडत नाही .चित्तात विषयांची ईच्छा असते .साधन करायला आवडत नाही .कोणताही नेम नित्यनेमाने करता येत नाही नित्य नेम करण्यास कासाविशी होते .याचे कारण देहाची दृढ आसक्ती असते .त्यामुळे त्याच्या जवळ विरक्ती सुध्दा रहात नाही .विरक्ती नाही म्हणजे भक्ती पण रहात नाही

म्हणून हे शिष्या ऐक .ज्याच्या कडे नित्य नेम नाही ,त्याला अंती धोका असतो .

असे सांगितल्यावर शिष्य म्हणतो जशी मती तशी गती असे सगळे म्हणतात तर मग मी काय करू ?शेवटी कोणाचे अनुसंधान ठेवू ? हे मन कोठे लावावे ? अंतकाळी मनाचे समाधान राहण्यासाठी काय करू ? अंतकाळ कसा येईल ?हे कळत नाही .कोणती दशा प्राप्त होईल ते कळत नाही

अशी शंका श्रोत्याने घेतली शिष्याने करुणेने प्रश्न विचारला .त्याचे गुरु उत्तर देत आहेत .ते सावध चित्ताने ऐकावे .

अंतर्भाव

समास ३

प्राप्त जाले ब्रह्मज्ञान | आंगी बाणले पाहिजे पूर्ण |

म्हणोनि हे निरुपण | सावध ऐका ||१||

कांहीच नेणे तो बध्द | समूळ क्रिया अबध्द |

भाव उठिला तो शुध्द | मुमुक्षु जाणावा ||२||

कर्मे तजून बाधक | शुध्द वर्ते तो साधक |

क्रिया पालटे विवेक | पाहे नीच नवा ||३||

तये क्रियेचे लक्षण | आधी स्वधर्म रक्षण |

पुढे अद्वैत श्रवण | केले पाहिजे ||४||

नित्य नेम दृढ चित्ती | तेणे शुध्द चीतोवृत्ती |

होउनिया भगवंती | मार्ग फुटे ||५||

नित्य नेमे भ्रांति फिटे | नित्य नेमे सदेह तुटे |

नित्य नेमे लिगटे | समाधान अंगी ||६||

नित्य नेमे अंतर शुध्द | नित्य नेमे वाढे बोध |

नित्य नेमे बहु खेद | प्रपंची नुठी ||७||

नित्य नेमे सत्व चढे | नित्य नेमे शांती वाढे |

नित्य नेमे मोडे | देहबुद्धी ||८||

नित्य नेमे दृढभाव | नित्य नेमे भेटे देव |

नित्य नेमे पुसे ठाव | अविद्येचा ||९||

नित्य नेम करू कोण | ऐसा शिष्ये केला प्रश्न |

केले पाहिजे श्रवण | प्रत्ययी स्वयें ||१०||

मानसपूजा जप ध्यान | येकाग्र करूनिया मन |

त्रिकाळ घ्यावे दर्शन | मारुती सूर्याचे ||११||

हरिकथा निरुपण | प्रत्यई करावे श्रवण |

निरूपणी उणखूण | केली पाहिजे ||१२ ||

संकटी श्रवण न घडे | बळात्कारे अंतर पडे |

तरी अंतरस्थिती मोडे | ऐसे न कीजे ||१३||

अंतरी पांच नामें | म्हणत जावी नित्य नेमे |

ऐसे वर्तता भ्रमे | बाधिजेना ||१४||

ऐसी साधकाची स्थिती | साधके राहावे ऐसिया रिती |

साधनेवीण ज्ञानप्राप्ती |होणार नाही ||१५||

तव शिष्य म्हणे जी ताता | जन्म गेला साधन करता |

कोण वेळ आता | पावो समाधान ||१६||

कैसे येईल सिद्धपण | केव्हा तुटेल साधन |

मुक्त दशा सुलक्षण | मज प्राप्त केवी ||१७||

आता याचे प्रत्योत्यर | श्रोती व्हावे सादर |

ऐका पुढे विस्तार | सांगिजेल ||१८||

इति श्री अंतर्भावं | जन्ममृत्यू समूळ वाव |

रामदासी गुरुराव |प्रसन्न जाला ||१९||

तुला ब्रह्मज्ञान तर झाले आहे पण ते अंगी मुरायला हवे .म्हणून हे शिष्या मी काय सांगतो ते नीट ऐक .ज्याला कांहीच कळत नाही तो बध्द असतो .त्यामुळे त्याच्या सर्वच क्रिया बध्दासारखे म्हणजे नेणतेपणाच्या असतात .पण जेव्हा बध्दाच्या ठिकाणी शुध्द भाव निर्माण होतो ,नको हा संसार ,नको ही दु:ख ,नको ही सुख असे वाटते ,आता फक्त परमेश्वर पाहिजे असे वाटू लागते तेव्हा बध्दाचा तो मुमुक्षु बनतो .

मुमुक्षु च्या विचारात खूप फरक पडतो .त्याला साधक काय ,बाधक काय हे कळू लागते तेव्हा त्याच्या अध्यात्मिक प्रगतीच्या आड येणारी सर्व कर्मे त्यागतो .शुध्द कर्मे करण्याचा निश्चय करतो .त्यामुळे क्रिया पालटे तत्काळ अशी अवस्था येते .

त्याच्या क्रिया कशा असतात ?

स्वधर्म रक्षण हे त्याचे पहिले कर्तव्य समजतो .स्वधर्माच्या रक्षण करण्या साठी तो समाजात स्वधर्म जागृती करतो ,धर्म सोडणा-यांना परावृत्त करतो .

दुसरी गोष्ट तो करतो ती ही की अद्वैताचे श्रवण तो करू लागतो .अद्वैताचे श्रवण करताना नित्य नेम करण्याचे दृढ निश्चय तो करतो .नित्य नेमाने चित्त वृत्ती शुध्द होतात .

नित्य नेमाने भ्रम नाहीसा होतो ,सदेह ,शंका संपतात. समाधानाची प्राप्ती होते .नित्य नेमाने अंत:करण शुध्द होते ,बोध वाढतो ,प्रपंचात अनुभवायला येणारे दु:ख कमी होते .त्याची तीव्रता कमी होते .नित्य नेमाने सत्व गुण वाढतो ,नित्य नेमाने शांती वाढते ,देहबुद्धी नाहीशी व्हायला लागते .नित्य नेमाने परमेश्वरा विषयी दृढ भाव निर्माण होतो .देवाची भेटी होते ..अविद्या ,अज्ञान नाहीसे होते .

नित्य नेमाने काय होते ते सांगितल्यावर शिष्य विचारतो ,नित्य नेम कोणता करू ?

समर्थ उत्तर देतात ,नित्य नेमाने श्रवण कर .मन एकाग्र करून मानसपूजा ,जप ध्यान कर .सूर्याचे त्रिकाळ दर्शन घे .दररोज हरिकथा श्रवण कर .निरुपण समजावून घे .सकट काळी श्रवण करता आले नाही तरी अंतरस्थिती मोडणार नाही याची काळजी घे .अनुसंधान सुटणार नाही याची काळजी घे .राम ,कृष्ण ,हरी ,गोविंद केशव नामे सतत घेत जावी .असे केल्याने भ्रम होणार नाही

अशी साधकाची स्थिती असावी .साधकाने असे रहावे .साधन केल्याशिवाय काही उपयोग नाही .

शिष्य म्हणतो ,महाराज ,साधन करता करता जन्म गेला .आता मला समाधान केव्हा मिळणार ? माझ्या अंगी सिद्धपण केव्हा येईल ?माझे साधन केव्हा सुटेल ? मला मुक्त दशा केव्हा प्राप्त होईल ?

याचे उत्तर श्रोत्यांनी आता ऐकावे .विस्ताराने सागतो .ह्या प्रश्नाने रामदासी गुरु प्रसन्न झाले आहेत .ते आता प्रश्नाचे उत्तर देत आहेत .

शुक्रवार, 18 मार्च 2011

अंतर्भाव

अंतर्भाव

समास २

ऐक शिष्या सावधान | सिद्ध असता निजबोध |

माईक हा देहसमंध | तुज बाधी ||१||

बद्धके कर्मे केली | ते पाहिजे भोगिली |

देह बुद्धी दृढ झाली |म्हणोनिया ||२||

मागे जे जे संचित केले |ते ते पाहिजे भोगिले |

शूद्रे सेत जरी टाकिले | तरी बाकी सुटेना ||३||

हा तो देहबुद्धीचा भाव | स्वस्वरूपी समूळ वाव |

परंतु प्राप्तीचा उपाव | सुचला पाहिजे ||४ ||

स्वरूप लंकापुरी | हेम इटा दुरीच्या दुरी |

देहबुद्धीचा सागरी | तरले पाहिजे ||५ ||

विषयमोळ्या बाहो सांडी | मग त्यास म्हणे कोण काबाडी |

तैसी पदार्थाची गोडी |सांडीत आत्मा || ६ ||

देहबुद्धीचे लक्षण | दिसेंदिस होता क्षीण |

तदुपरी बाणे खूण | आत्मयाची ||७||

सर्व आत्मा ऐसे बोलता |अंगी बाणे सर्वथा |

साधनेवीण ज्ञानवार्ता |बोलोची नये ||८||

दस-याचे सोने लुटले | तेणे काय हातासी आले |

कि राय विनोदे आणिले |सुखासन ||९||

तैसे शब्दी ब्रह्मज्ञान |बोलतां नव्हे समाधान |

म्हणोनिया आधी साधन |केले पाहिजे ||१० ||

शब्दी जेविता तृप्ती जाली |हे तो वार्ता नाही ऐकिली |

पाक निष्पत्ती पाहिजे केली |साक्षपे स्वयें ||११||

कांहीतरी येक कारण | कैसे घडे प्रेत्नेवीण |

मा हे ब्रह्मज्ञान परम कठीण | साधनेवीण केवी ||१२ ||

शिष्य म्हणे सद्गुरू |साधन तरी काय करू |

जेणे पाविजे पारू |माहा दु:खांचा ||१३||

आता पुढिलीये समासी | स्वामी सागती साधनासी |

सावध श्रोती कथेसी |अवधान द्यावे ||१४||

हे शिष्या ,सावधान होउन ऐक .अरे ,तू सिद्ध आहेस .तुला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे .तुला निजबोध झाला आहे .मग तुझी अशी अवस्था कशामुळे झाली आहे ? अरे ,मायिक असलेला असा तुझा देह्संग तुला बाधतो आहे .देह तर नश्वर आहेच .पण तोच तू खरा मानून चालला आहेस .तो तुला बाधतो आहे .तुझी देहबुद्धी दृढ झाली आहे त्यामुळे तू केलेल्या कर्माची फळे तुला भोगावी लागणार आहेत .कारण ती कर्मे मी केली अशा अहंकाराने केली आहेस .कर्ता मी आहे ,असा अहंकार तुझ्याजवळ आहे म्हणून तुला त्या कर्माची फळे तुला भोगावी लागणार आहेत

मागे तू केलेली कर्मे संचित रूपात फळे द्यायला तयार आहेत .

ही तुझी देहबुद्धी आहे .स्वस्वरूप प्राप्त करण्याच्या आड ही देहबुद्धी येते आहे .असे असले तरी स्वस्वरूपा पर्यंत पोहोचण्या साठी काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे .सोन्याच्या विटा असलेली लंका दूर असते तसे स्वस्वरूप ही खूप पल्याड आहे ..ते स्वस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी देहबुद्धीचा हा सागर पार करून जावाच लागेल .

विषयांच्या मोळ्या जो हातातून सांडून टाकतो , मग त्याला काबाडी ,कष्ट करणारा असे कोण म्हणेल ? तसा आत्मा पदार्थांची गोडी आत्मा काढून टाकतो .

जे जे देहबुद्धीचे लक्षण आहे ते ते दिवसेंदिवस क्षीण होत जाते .आणि आत्म्याची खूण मनाला पटत जाते .मनाला समाधान होते .सगळ्यामध्ये एकच आत्मा असे आपण नुसते बोलतो .पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आलेला नसतो .त्यामुळे साधना करणे खूप जरूरी असते .साधने शिवाय काहीही बोलणे योग्य नाही .

जसे दसयाचे सोने आपण लुटतो पण ते खरे सोने नसल्यामुळे आपल्याला खरे समाधान मिळत नाही .तसे शब्दाने नुसते आत्मज्ञान बोलले तरी त्याचा काही उपयोग नाही .त्याने समाधानाची प्राप्ती होत नाही .समाधानासाठी साधना करायलाच हवी .

नुसत्या शब्दाने पोट भरले असे होत नाही .त्यासाठी स्वत: स्वयंपाक करावाच लागतो .कोणतीही गोष्ट प्रयत्नांशिवाय प्राप्त होत नाही .ब्रह्मज्ञान तर सर्वात कठीण आहे . ब्रह्मज्ञान साधनेशिवाय कसे प्राप्त होणार ?

शिष्य गुरुंना विचारतो ,स्वामी ,मी साधना तरी कोणती करू ? ज्यामुळे हा भवसागर पार करून जाईन .

पुढच्या समासात गुरु साधना कोणती करायची ते सांगतात .



अंतर्भाव

समास १

जय जय सद्गुरू समर्था | जय जया पूर्ण मनोरथा |

चरणी ठेउनिया माथा | प्रार्थितसे ||१ ||

मी येक संसारी गुंतला | स्वामीपदी वियोग जाला |

तेणे गुणे आळ आला |मज मीपणाचा ||२||

इच्छाबंधने गुंतलो | तेणे गुणे अंतरलो |

आता तेथूनि सोडविलो | पाहिजे दातारे ||३ ||

प्रपंच संसार उद्वेगे |क्षणक्षण मानस भंगे |

कुळाभिमान म्हणे उगे | सामाधानासी ||४ ||

तेणे समाधान चळे | विवेक उडोनिया पळे |

बळेची वृत्ती ढांसाळे | संगदोषे ||५ ||

स्वामी प्रपंचाचे नि गुणे | परमार्थासी आले उणे |

ईश्वर आज्ञेप्रमाणे | क्रिया न घडे || ६ ||

याचिया दु:खे झोंका आदळे चित्ती | समाधान राखणे किती |

विक्षेप होता चितोवृत्ती | दंडळू लागे ||७||

प्रपंचे केले कासावीस | होउ नेदी उमस |

तेणे गुणे उपजे त्रास | सर्वत्राचा ||८ ||

आता असो हा संसार | जाले दु:खाचे डोंगर |

स्वामी अंतसार्क्ष विचार | सर्व हि जाणती ||९ ||

तरी आता काय जी करावे | कोण्या समाधाने असावे |

हे मज दातारे सांगावे | कृपा करावी ||१०||

ऐसी शिष्याची करुणा | ऐकोनी बोले गुरुराणा |

केली पाहिजे विचारणा | पुढिलीये समासी ||११||

शिष्य सद्गुरू चरणी प्रार्थना करतो आहे की हे सद्गुरू नाथा आपण पूर्ण मनोरथ आहात ..मी आपल्या चरणी माथा ठेवून प्रार्थना करतो आहे की मी एक संसारी गुंतलेला बध्द आहे .त्यामुळे मला स्वामी चरणांचा वियोग सहन करावा लागतो आहे ..स्वामी चरणांपासून दूर झाल्या मुळे माझ्यामध्ये देहबुद्धी वाढली आहे .मीपणा ,अहंकार वाढला आहे .माझ्यामध्ये मीपणा वाढल्या मुळे माझ्या मध्ये वासना ,कामना ,कल्पना या सर्व गोष्टी वाढू लागल्या मुळे षडरिपू माझ्या मागे लागले . सत्व गुण मागे मागे हटू लागला ..पण मला यातून सुटायचे आहे .

प्रपंच संसार यांचा आता उद्वेग आला आहे .आता बास झाला संसार असे वाटते आहे क्षणक्षणाला असे वाटते आहे मनाचा निश्चय भग पावतो आहे .कुंळाभिमानाने माझे समाधान नाहीसे झाले आहे .माझ्यातला मी पणा वाढला आहे . विवेक नाहीसा झाला आहे .संगदोषाने वृत्ती ढांसाळली आहे .संग आहे विषयांचा , त्यामुळे समाधान नाहीसे झाले आहे .

स्वामी प्रपंचात रमल्यामुळे परमार्थ हातून होत नाही .नामस्मरण होत नाही ,अर्चन पूजन होत नाही .कांहीच होत नाही .ईश्वराची आज्ञा आहे त्याप्रमाणे कांहीच होत नाही .मन सहाजिकच सुख दु:खाच्या झोक्याबरोबर झुलत रहाते .मग समाधान तरी कसे राखणार ? काही मनाविरुध्द झाले की चित्त वृत्ती डळमळीत होउ लागतात ..

प्रपंचाने मला कासावीस केले आहे मला तुम्ही नाराज करू नका ,कारण त्यामुळे सगळी कडे त्रासच वाढेल .असो असा हा संसार म्हणजे दु:खाचा डोंगर झाला आहे .स्वामी अंतरसाक्षी आहेत .ते सर्व जाणतात ।

आता मी काय करावे ? मला समाधानाने कसे जगता येईल? हे स्वामींनी कृपा करून सांगावे.

अशी शिष्याची करुणापूर्ण वाचणे ऐकून गुरुराणा काय म्हणतात ते पुढच्या समासात पाहू .

शनिवार, 12 फ़रवरी 2011

आनंदवन भुवनी समर्थांचे पूर्ण झालेले स्वप्न

भक्तांसी रक्षिले मागे | आतां ही रक्षिते पहा |

भक्तांसी दिधले सर्वै | आनंदवनभुवनी ||४३ ||

आरोग्य जाहाली काया | वैभवे सांडिली सीमा |

सार सर्वस्व देवाचे | आनंदवनभुवनी ||४४ ||

देव सर्वस्व भक्तांचा | देव भक्त दुजे नसे |

संदेह तुटला मोठा | आनंदवनभुवनी ||४५ ||

देव भक्त येक जाले |मिळाले सर्व जीव ही |

संतोष पावले तेथे | आनंदवनभुवनी ||४६ ||

सामर्थ्ये यशकीर्तीची | प्रतापे सांडिली सीमा |

ब्रीदेंची दिधली सर्वे | आनंदवनभुवनी ||४७ ||

राम कर्ता राम भोक्ता | रामराज्य भूमंडळी |

सर्वस्व मीच देवांचा |माझा देव कसा म्हणों || ४८ ||

हेंच शोधूनी पहावे |राहावे निश्चळी सदा |

सार्थक श्रवणे होते | आनंदवनभुवनी ||४९ ||

वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |

कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

गीत सगीत सामर्थ्ये | वाद्य कल्लोळ उठिला |

मिळाले सर्व अर्थार्थी | आनंदवनभुवनी ||५१ ||

वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |

आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||

मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |

कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||

येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती |

सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||

उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |

ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||

बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |

पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||

स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |

काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||

महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी |

विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||

सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |

वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||

जय जय रघुवीर समर्थ !

आदीमाया आदिशक्ती भक्तांचे सतत रक्षण करते तसे ती आताही करेल असा विश्वास समर्थांना वाटतो .शक्तीच्या उपासनेने शारीरिक आरोग्य तर मिळतेच ,त्याबरोबर वैभवही मिळते .आदिमाया आदिशक्ती देवाचे सार सर्वस्व आहे कारण तिच्यामुळेच हे प्रचंड विश्व उभारता आले .

देव भक्तांचा सर्वस्व असतो कारण देव आणि भक्त एकच असतात .त्यांच्या मध्ये भिन्नत्व नसतेच .देवांचे सामर्थ्य ,वैभव भक्तांना मिळते .त्यांच्या एकत्वाविषयी संशय नसतो .

जसे देव भक्तात ऐक्य असते तसे भक्त भक्तात ही ऐक्य असते .एकाच देवाची भक्ती करणा-या भक्तांत ही ऐक्य असते .आपले जिवलग भेटल्याचा आनंद वाटतो .

भक्ता भाक्तांतील ऐक्यात सामर्थ्य निर्माण होते .जीवाला जीव देणारे भक्त असतात .त्यामुळे ते संतुष्ट होतात

देव भक्त आणि भक्त भक्त यांच्या ऐक्यामुळे सामर्थ्य ,यश ,कीर्ती ,प्रताप निर्माण होतो .आणि मग अवर्णनीय पराक्रम निर्माण होतो .भक्त यश कीर्ती पराक्रम प्राप्त करून घेतात ,त्या ऐक्यातून महाशक्ती निर्माण होते व देव कार्य समर्थ पणे चालू राहते .

भगवंत षडगुणैश्वर्य संपन्न आहे कारण त्याला दुष्टांचा विनाश ,सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना ही तीन कार्य करायची असतात .

तीन कार्य करणाराही तोच आहे आणि त्या कार्याचे फळ भोगणारा ही तोच आहे .देव ,भक्त ,भक्त आणि भक्त हे सर्व एकरूप झाले की रामराज्य येते अशी समर्थांची कल्पना होती .असे रामराज्य शिवराय देतील अशी त्यांना खात्री होती .कारण लोकसंग्रह शिवरायांनी केला .अठरा पगड जातींमधून माणसे गोळा केली आणि स्वराज्य स्थापनेची ईर्षा त्यांनी निर्माण केली .देव देश आणि धर्म याविषयी अभिमान लोकांमध्ये निर्माण केला .

पूजा अर्चा फक्त करणे ,कर्मठपणे वागणे ही भक्ती नाही हां विचार समर्थांनी मांडला .निश्चल अविनाशी रामाच्या ठिकाणी मन निश्चल ठेवणे म्हणजे भक्ती असे समर्थ सांगतात .

गुरुवार, 3 फ़रवरी 2011

आनंदवन भुवनी

आनंदवनभुवनी

देवची तुष्टला होता | त्याचे भक्तीस भुलला |

मागुता क्षोभला दुखे | आनंदवनभुवनी ||२६ ||

कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |

कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||२७||

बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |

अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी || २८||

पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |

कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||२९ ||

त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |

कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||३०||

भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |

लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||३१ ||

येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |

संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||३२ ||

बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |

मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी || ३३ ||

बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |

ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||३४ ||

गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |

निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||३५ ||

उदंड जाहाले पाणी | स्नान संध्या करावया |

जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी ||३६ ||

नाना तपे पुरश्चरणे |नाना धर्म परोपरी |

गाजली भक्ती हे मोठी | आनंदवन भुवनी ||३७||

लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |

चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||

बंडपाषांड उडाले |शुध आध्यात्म वाढले |

राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभुवनी ||३९||

देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |

पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||

रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली |

मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||४१||

प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |

नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी || ४२ ||

देवांच्या व सीतेच्या मुक्ततेसाठी श्रीरामांनी रावणाशी युध्द केले ,तसेच युध्द श्रीरामांनी भारतवर्षातील जनतेला दुष्ट यवनांच्या तावडीतून सोडविण्यासाठी करावं असं समर्थांना वाटत असावं. रावणाने तप:श्चर्या केली .भोळा सांब त्याच्या तप:श्चर्येस भुलला व त्याला वर दिला .रावणाने त्याच वराने सर्व देवांना बंदिवासात टाकले .सीताहरण केले .त्यामुळे भोळा सांब क्षोभित झाला .

जेव्हा शिवरायांसारख्या धर्म वीरांनी म्लेंछ संहार करण्याचा प्रयत्न केला,तेव्हा कल्पांतासारखां प्रलय झाला .तेव्हा देवांनी धर्मवीरांची बाजू घेतली .आणि मुख्य देव जो श्रीराम ,तो उठला ,त्याने धर्मवीरांच्या लढ्याला आशीर्वाद दिले .

मुख्य देव धर्मवीरां च्या पाठीशी उभा राहिल्याने सगळे अभक्त ,सर्व पापी बुडाले .हिंदुस्थान बळावले ,असे समर्थ म्हणतात .त्याअर्थी संपूर्ण हिंदूस्थान या पापी यवनांच्या जोखडातून मुक्त व्हावे असा भविष्यकाळ समर्थ पहात असावे .

पूर्वी रामरावण युध्दात जे दैत्य मारले गेले होते तेच आता पून्हा प्रबळ होउन लोकांना त्रास देत आहेत अशी कल्पना समर्थ करतात .म्हणून देवांचा देव श्रीराम पून्हा कोपले आहेत आणि पून्हा संहार करणार आहे असा विश्वास समर्थांना वाटत आहे .

रामायण काळी दैत्यांनी त्रैलोक्य गाजले होते .श्रीरामांनी तेव्हा त्रैलोक्याला रावणाच्या तावडीतून सोडवले होते ,तसे आता परत श्रीराम पून्हा सोडवणार आहेत अशी समर्थांना खात्री आहे .

श्रीरामांनी आपला भीमरूपी महारुद्र मारुती लंकेत पाठवले होते मग श्रीराम चढाई करून गेले त्याप्रमाणे वीर पुरुषाचे सैनिक शत्रूवर चढाई करून जात आहेत .,शत्रूच्या फौजांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करत आहेत .

याचा परिणाम म्हणून धर्म वाढला आहे ,धर्म संस्थापना झाली आहे .रामाधर्म म्हणजे ल्क्ष्मी चे वैभव वाढले आहे .त्यामुळे सर्वत्र सुख ,समाधान वाढले आहे .

सर्वात महत्वाची गोष्ट समर्थ सांगत आहेत की पापी औरंग्या बुडाला आहे .त्याचा नायनाट झाला आहे ..त्यामुळे त्याने नष्ट केलेली देवस्थाने पून्हा उभारली गेली आहेत

माणसामाणसातील भेदभाव ,जातीचे ,धर्माचे ,उच्च नीच असे भेदभाव बुडाले होते .नष्ट चांडाळ ,पातकी मारले गेले .

ते गळाले ,पळाले ,देशोधडीला लागले .त्यामुळे दुष्ट लोकांचा पृथ्वीवरील भार नाहीसा झाला .पृथ्वी निर्मळ झाली .मोडलेली क्षेत्रे पून्हा बांधली ,लोक संध्या स्नान निर्भर होउन करू लागले ,त्यामुळे उदंड पाणी झाले असे समर्थ म्हणतात .जप तपात कोणताही अडथळा नव्हता .वेगवेगळी तपे ,अनुष्ठाने ,पुरश्चरणे लोक आनंदाने करू लागले .लिहिल्या प्रमाणे घडलं त्याचा प्रत्यय आला .

म्लेंछाचे बंड मोडून काढल्यामुळे सर्वांना सारखे ज्ञान देणारे अध्यात्म ज्ञान वाढीला लागले .

सर्वत्र दीपमाळा झळकत आहेत .विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी देव आणि देवालये सजली आहेत .ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी युध्दाची आवश्यकता होती तो युध्दाचा प्रसंग समर्थांच्या डोळ्यासमोर येतो आहे ,

राम रावण युध्दात ज्या मातेने श्रीरामांना वर दिला तीच आता स्वत: शस्त्र घेउन उठली आहे .नष्ट ,चांडाळ पापी लोकांना खाण्या करीता चालली आहे ..