सोमवार, 11 अप्रैल 2011

अंतर्भाव समास ४

अंतर्भाव

समास ४

सिद्ध होउनि बैसला | दृष्टी नाणी साधनाला |

सादर अशन शयानाला | अत्यादरे करुनी ||१||

ऐसा जो विषयासक्त | अत्यंत विषई आसक्त |

सिद्धपणे आपुला घात |तेणे केला ||२||

जो सिध्दांचा मस्तकमणी |माहांतापासी शूळपाणी |

तो हि आसक्त श्रवणी | जपध्यान पूजेसी ||३||

अखंड वाचे रामनाम |अनुष्ठाता हि परम |

ज्ञान वैराग्य संपन्न |सामर्थ्य सिंधू ||४||

तो हि म्हणे मी साधक | तेथे मानव बापुडे रंक |

सिद्धपणाचे कौतुक |केवीं घडे ||५||

म्हणौनी साधनेसी जो सिद्ध |तोचि ज्ञाता परम शुध्द |

येर ते जाणावे अबध्द | अप्रमाण ||६||

साधनेवीण बाष्कळता |ते चि जाणावी बद्धता |

तेणे घडे अनर्गळता | आसक्ती रूपे ||७||

मन सुखावले जिकडे | आंग टाकले तिकडे |

साधन उपाय नावडे | अंतरापासूनि ||८||

चित्ती विषयाची आस |साधन म्हणता उपजे त्रास |

नेम धरिता कासावीस |परम वाटे ||९||

दृढ देहाची आसक्ती |तेथे कैची पां विरक्ती |

विरक्ती वीण भक्ती | केवी घडे ||१०||

ऐक गा शिष्या टिळकां | नेम नाही ज्या साधका |

तयासी अंती धोका |नेमस्त आहे ||११||

तवं शिष्ये केली विनंती |अंशी मती तेचि गती |

ऐसे सर्वत्र बोलती |तरी मी काये करू ||१२ ||

अंती कोण अनुसंधान |कोठे ठेवावे हे मन |

कैसे राहे समाधान |तये समयी ||१३ ||

अंत समयो येईल कैसा | हा तो न कळे भर्वसा |

प्राप्त होईल कोण दशा | हे तो श्रुत नाही ||१४||

ऐसी आशंका घेतली मने | शिष्य बोले करुणा वचने |

याचे उत्तर श्रोते जाने | सावध परिसावे ||१५||

एक जण सिद्ध झाला पण त्याने साधन करायचे असते या कडे दुर्लक्ष केले .अत्यंत आवडीने त्याने झोप आणि खाणे पिणे करायला सुरुवात केली .असा तो विषयासक्त झाला .सिद्ध असूनही साधन न केल्यामुळे त्याने घात करवून घेतला .

जो सिध्दांचा मुकुट मणी आहे,,महा तप करणा-या मध्ये श्रेष्ठ असणारे शंकर ,त्यांनाही श्रवण करण्यात आसक्ती आहे .,जप ध्यान करण्यात आसक्ती आहे .

ते अखंड राम नामाचा जप करतात .सतत अनुष्ठाने करतात .ज्ञान ,वैराग्य ,सामर्थ्याने युक्त असलेले शंकर ही स्वत:ला साधक म्हणवतात .मग आपण तर क्षुद्र मानव ! आपल्या सिद्धपणाचे कौतुक कोणाला सांगणार ?

म्हणून साधना करण्याची ज्याची तयारी असते तोच खरा शुध्द असतो .बाकीचे सगळे अबध्द म्हणजे बध्द असतात .साधने शिवाय जे राहू शकतात ते बद्धच असतात .बद्ध्तेने आसक्ती येते आणि अध:पतन होते .बध्दतेने मनाला ,शरीराला जिकडे सुख वाटेल ,तिकडे अंग टाकले जाते म्हणजे मन वैषयिक गोष्टींकडे आकर्षिले जाते . मना पासून साधन आवडत नाही .चित्तात विषयांची ईच्छा असते .साधन करायला आवडत नाही .कोणताही नेम नित्यनेमाने करता येत नाही नित्य नेम करण्यास कासाविशी होते .याचे कारण देहाची दृढ आसक्ती असते .त्यामुळे त्याच्या जवळ विरक्ती सुध्दा रहात नाही .विरक्ती नाही म्हणजे भक्ती पण रहात नाही

म्हणून हे शिष्या ऐक .ज्याच्या कडे नित्य नेम नाही ,त्याला अंती धोका असतो .

असे सांगितल्यावर शिष्य म्हणतो जशी मती तशी गती असे सगळे म्हणतात तर मग मी काय करू ?शेवटी कोणाचे अनुसंधान ठेवू ? हे मन कोठे लावावे ? अंतकाळी मनाचे समाधान राहण्यासाठी काय करू ? अंतकाळ कसा येईल ?हे कळत नाही .कोणती दशा प्राप्त होईल ते कळत नाही

अशी शंका श्रोत्याने घेतली शिष्याने करुणेने प्रश्न विचारला .त्याचे गुरु उत्तर देत आहेत .ते सावध चित्ताने ऐकावे .

अंतर्भाव

समास ३

प्राप्त जाले ब्रह्मज्ञान | आंगी बाणले पाहिजे पूर्ण |

म्हणोनि हे निरुपण | सावध ऐका ||१||

कांहीच नेणे तो बध्द | समूळ क्रिया अबध्द |

भाव उठिला तो शुध्द | मुमुक्षु जाणावा ||२||

कर्मे तजून बाधक | शुध्द वर्ते तो साधक |

क्रिया पालटे विवेक | पाहे नीच नवा ||३||

तये क्रियेचे लक्षण | आधी स्वधर्म रक्षण |

पुढे अद्वैत श्रवण | केले पाहिजे ||४||

नित्य नेम दृढ चित्ती | तेणे शुध्द चीतोवृत्ती |

होउनिया भगवंती | मार्ग फुटे ||५||

नित्य नेमे भ्रांति फिटे | नित्य नेमे सदेह तुटे |

नित्य नेमे लिगटे | समाधान अंगी ||६||

नित्य नेमे अंतर शुध्द | नित्य नेमे वाढे बोध |

नित्य नेमे बहु खेद | प्रपंची नुठी ||७||

नित्य नेमे सत्व चढे | नित्य नेमे शांती वाढे |

नित्य नेमे मोडे | देहबुद्धी ||८||

नित्य नेमे दृढभाव | नित्य नेमे भेटे देव |

नित्य नेमे पुसे ठाव | अविद्येचा ||९||

नित्य नेम करू कोण | ऐसा शिष्ये केला प्रश्न |

केले पाहिजे श्रवण | प्रत्ययी स्वयें ||१०||

मानसपूजा जप ध्यान | येकाग्र करूनिया मन |

त्रिकाळ घ्यावे दर्शन | मारुती सूर्याचे ||११||

हरिकथा निरुपण | प्रत्यई करावे श्रवण |

निरूपणी उणखूण | केली पाहिजे ||१२ ||

संकटी श्रवण न घडे | बळात्कारे अंतर पडे |

तरी अंतरस्थिती मोडे | ऐसे न कीजे ||१३||

अंतरी पांच नामें | म्हणत जावी नित्य नेमे |

ऐसे वर्तता भ्रमे | बाधिजेना ||१४||

ऐसी साधकाची स्थिती | साधके राहावे ऐसिया रिती |

साधनेवीण ज्ञानप्राप्ती |होणार नाही ||१५||

तव शिष्य म्हणे जी ताता | जन्म गेला साधन करता |

कोण वेळ आता | पावो समाधान ||१६||

कैसे येईल सिद्धपण | केव्हा तुटेल साधन |

मुक्त दशा सुलक्षण | मज प्राप्त केवी ||१७||

आता याचे प्रत्योत्यर | श्रोती व्हावे सादर |

ऐका पुढे विस्तार | सांगिजेल ||१८||

इति श्री अंतर्भावं | जन्ममृत्यू समूळ वाव |

रामदासी गुरुराव |प्रसन्न जाला ||१९||

तुला ब्रह्मज्ञान तर झाले आहे पण ते अंगी मुरायला हवे .म्हणून हे शिष्या मी काय सांगतो ते नीट ऐक .ज्याला कांहीच कळत नाही तो बध्द असतो .त्यामुळे त्याच्या सर्वच क्रिया बध्दासारखे म्हणजे नेणतेपणाच्या असतात .पण जेव्हा बध्दाच्या ठिकाणी शुध्द भाव निर्माण होतो ,नको हा संसार ,नको ही दु:ख ,नको ही सुख असे वाटते ,आता फक्त परमेश्वर पाहिजे असे वाटू लागते तेव्हा बध्दाचा तो मुमुक्षु बनतो .

मुमुक्षु च्या विचारात खूप फरक पडतो .त्याला साधक काय ,बाधक काय हे कळू लागते तेव्हा त्याच्या अध्यात्मिक प्रगतीच्या आड येणारी सर्व कर्मे त्यागतो .शुध्द कर्मे करण्याचा निश्चय करतो .त्यामुळे क्रिया पालटे तत्काळ अशी अवस्था येते .

त्याच्या क्रिया कशा असतात ?

स्वधर्म रक्षण हे त्याचे पहिले कर्तव्य समजतो .स्वधर्माच्या रक्षण करण्या साठी तो समाजात स्वधर्म जागृती करतो ,धर्म सोडणा-यांना परावृत्त करतो .

दुसरी गोष्ट तो करतो ती ही की अद्वैताचे श्रवण तो करू लागतो .अद्वैताचे श्रवण करताना नित्य नेम करण्याचे दृढ निश्चय तो करतो .नित्य नेमाने चित्त वृत्ती शुध्द होतात .

नित्य नेमाने भ्रम नाहीसा होतो ,सदेह ,शंका संपतात. समाधानाची प्राप्ती होते .नित्य नेमाने अंत:करण शुध्द होते ,बोध वाढतो ,प्रपंचात अनुभवायला येणारे दु:ख कमी होते .त्याची तीव्रता कमी होते .नित्य नेमाने सत्व गुण वाढतो ,नित्य नेमाने शांती वाढते ,देहबुद्धी नाहीशी व्हायला लागते .नित्य नेमाने परमेश्वरा विषयी दृढ भाव निर्माण होतो .देवाची भेटी होते ..अविद्या ,अज्ञान नाहीसे होते .

नित्य नेमाने काय होते ते सांगितल्यावर शिष्य विचारतो ,नित्य नेम कोणता करू ?

समर्थ उत्तर देतात ,नित्य नेमाने श्रवण कर .मन एकाग्र करून मानसपूजा ,जप ध्यान कर .सूर्याचे त्रिकाळ दर्शन घे .दररोज हरिकथा श्रवण कर .निरुपण समजावून घे .सकट काळी श्रवण करता आले नाही तरी अंतरस्थिती मोडणार नाही याची काळजी घे .अनुसंधान सुटणार नाही याची काळजी घे .राम ,कृष्ण ,हरी ,गोविंद केशव नामे सतत घेत जावी .असे केल्याने भ्रम होणार नाही

अशी साधकाची स्थिती असावी .साधकाने असे रहावे .साधन केल्याशिवाय काही उपयोग नाही .

शिष्य म्हणतो ,महाराज ,साधन करता करता जन्म गेला .आता मला समाधान केव्हा मिळणार ? माझ्या अंगी सिद्धपण केव्हा येईल ?माझे साधन केव्हा सुटेल ? मला मुक्त दशा केव्हा प्राप्त होईल ?

याचे उत्तर श्रोत्यांनी आता ऐकावे .विस्ताराने सागतो .ह्या प्रश्नाने रामदासी गुरु प्रसन्न झाले आहेत .ते आता प्रश्नाचे उत्तर देत आहेत .