रविवार, 9 सितंबर 2012

नाम महिमा



नाम महिमा
नाम जपे चंद्रमौळी | नाम जपे वाल्हा कोळी |
नाम जपे हिमनगबाळी | हृदय समूळी वाहतसे || १ ||
नाम जपे अजामेळ | नाम जपे ध्रुवबाळ |
नाम जपे ते गोकुळ | आबालवृध्द सर्वहि || २||
नाम जपे अभिमन्यू | नाम जपे उपमन्यू |
नाम जपे तो ब्राह्मणु | पाहा दरिद्री सुदामा || ३ ||
नाम महिमा अगाध | नरनारी होती शुत्ध |
ठसावला पूर्ण बोध | रामदास अंतरी || ४ ||


नाम जपतसे धर्म |नाम जपतसे भीम |
तिजा अर्जुन उत्तम | नकुळ सहदेव पाचवा || १ ||
नाम जपतसे द्रौपदी | नामे यज्ञ जाली सित्धी |
नाम जपे ॠषीमांदी | नाम अनादी म्हणोनि || २||
नाम जपे ॠशीमेळी | नाम जपतसे बळी |
नाम प्रगट फणीकुळी | छंद सकळी लाविला || ३ ||
नाम जपाताती साधू | नामें झडे गर्वमदु |
नाम स्मरता आनंदू | न होय बोधू कल्पांतू || ४ ||
नाम आगळे सर्वात | नामे होय कृतकृत्य |
रामदास हा पुनीत | नामें करुनी जाहला || ५ ||




चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकर ,ते रामनाम जपतात .जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा हलाहल विष बाहेर आले .त्या विषाने समस्त जगाला धोका निर्माण झाला असता म्हणून श्रीशंकरांनी ते विष प्यायले .त्याने घशाला अतिशय दाह झाला .तो गंगा मस्तकी घेऊन ,नागाला गळ्याभोवती गुंढाळून ही थांबला नाही .म्हणून त्यांनी श्रीरामांच्या नामाचा जप सुरु केला आणि दाह थांबला .
वाल्ह्या कोळी लूटमार करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असे . एकदा नारद मुनी जंगलातून जाय असताना नारदांनी वाल्ह्या कोळ्याला त्याच्या पापाचा वाटा घ्यायला कोणी तयार आहे का ते विचारायला सांगितले .तेव्हा कोणीच त्याच्या पापाचा वाटा घ्यायला तयार नव्हते .तेव्हा वाल्याला पश्चात्ताप झाला व त्याने नारदांच्या उपदेशानुसार नाम  घ्यायला सुरुवात केली .त्याला राम म्हणता यायचे नाही म्हणून त्याने मरा मरा असे उरफाटे नाम घ्यायला सुरुवात केली .त्या नामात इतका दंग झाला की त्याच्यावर वारूळ तयार झालेले त्याला कळले नाही .वारूळ म्हणजे वाल्मिक .म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला .
हिमनगबाळी म्हणजे पार्वती ! तिला भगवान शंकरानी राम महिमा आवडीने सांगितला आणि ती नाम घेऊन तिने तिचे मन श्रीराम चरणी वाहिले .
अजामेळ एक विद्वान ब्राह्मण .पण तो वाहवत गेला .त्याची अधोगती झाली .त्याच्या धाकट्या मुलाचे नाव नारायण होते .मृत्यू समयी त्याच्या तोंडात नारायणाचे नाव होते त्यामुळे यमदूत त्याचे प्राण न्यायाला आल्यावर विष्णुदूत मध्ये पडले .यमदूतांना त्याचे प्राण हरण करता आले नाहीत .
ध्रुवाला त्याच्या वडीलांच्या मांडीवरून त्याच्या सावत्र आईने उठवले म्हणून ध्रुवान अढळपद मिळवण्यासाठी नारदांच्या उपदेशावरून नाम घ्यायला सुरुवात केली .परमेश्वर प्रसन्न झाला .त्याने ध्रुवाला अढळपद दिले .
गोकुळ तर कृष्णमयचं झाल होते .गोपिकांना सर्वत्र कृष्णच दिसत होता .त्या कृष्णाच्या लीला आठवत होत्या .त्याचे गुणगान गात होत्या .त्याचे नामात दंग होत होत्या .गोपींची भक्ती तर इतकी पराकोटीची होती की ज्ञान शिकवायला गेलेल्या उद्धावाला त्यांनी प्रेमभक्ती शिकवली .
अभिमन्यू तर श्रीकृष्णांच्या बहिणीचा म्हणजे सुभद्रेचा मुलगा .तो श्रीकृष्णांच्या तालमीत तयार झाला .त्यांचे नाम तो घेतच होता .
उपमन्यू वसिष्ठ कुळातला एक मंत्र द्रष्टा ॠषी. लहानपणी तो त्याच्या मामाबरोबर एकां यज्ञात गेला होता . तेथे त्याला उत्तम गायीचे दूध प्यायला मिळाले .घरी परत आल्यावर त्याने आईजवळ दुधासाठी हट्ट धरला .आईने त्याला पाण्यात पीठ कालवून दिले .पण ख-या दुधाची चव कळलेली असल्यामुळे ,उपमन्यू ते दूध प्यायला तयार होईना .तेव्हा आईने सांगितले की बाळा ,आपण दूध देण्याएतके श्रीमंत नाही आहोत .तू देवाकडे दूध माग ,,त्याने भगवान शंकरांना उग्र तप:स्चार्येने प्रसन्न करून घेतले .भगवान शंकरांनी त्याला क्षीरसागर च भेट दिला ..
श्रीकृष्णांचा गुरुबंधू सुदामा एक गरीब ब्राम्हण होता तो सतत श्रीकृष्णांचे स्मरण करत असे नाम जपत असे .सुदामा जेव्हा श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला आला तेव्हा एकां मूठभर पोह्याच्या बदल्यात श्रीकृष्णांनी त्याची नगरी सुवर्णमय केली .
असा हा नामाचा महिमा अगाध आहे .नामाने सर्व शुध्दता येते ,समर्थ म्हणतात राम्दासाने हा बोध पूर्ण ठसावला आहे .





आता महाभारतातील उदाहरणे समर्थ देतात .धर्म ,भीम ,अर्जुन ,नकुळ ,सहदेव द्रौपदी ,जी यज्ञांतून उत्पन्न झाली ,ते सर्व सतत भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करत असत .ॠषीगण ,बळीराजा सर्व नाम जपत .साधूही नाम जपतात .नामाने गर्व झडतो .नामाने आनंद होतो ,जो कल्पांत आला तरी नाहीसा होत नाही .म्हणूनच समर्थ म्हणतात नाम आगळे आहे ,वेगळे आहे .नामाने कृतकृत्य होते . रामदास नामाने पुनीत ,पवित्र झाला असेही समर्थ म्हणतात