मंगलवार, 2 दिसंबर 2014

सोलीव सुख
पारमार्थिक दृष्ट्या  सोलीव सुख
सोलीव सुख म्हणजे कल्याण कारक सुख
पारमार्थिक दृष्ट्या सोलीव सुख हे काव्य श्री समर्थांचे की कल्याणस्वामींचे या बद्दल मतभेद आहेत .पण पांगारकरांच्या दासबोधात हे काव्य समर्थ कृत सोलीव सुख असे म्हटले आहे .म्हणजे हे काव्य समर्थांनी लिहिले असावे .सोलीव सुख हे दासबोधाचे सार ,फलित आहे .
सद्गुरुंना वंदन करताना म्हटले आहे .
जयजयाजी सद्गुरुराजा | पूर्णब्रह्मा प्रतापसूर्या |
तुज नमोजी आचार्या | करुणासिंधो || १ ||
सद्गुरुंचा जयजयकार असो .तुम्ही पूर्ण ब्रहम आहात .प्रतापसूर्य आहात .आपल्या  सत्तेने सर्व व्यवहार चालतो .तुम्हाला कोणाची उपमा देता येत नाही .आपण माझे आराध्य आहात .करुणासागर आहात .आपण ज्ञानी लोकांना उद्धरून नेताच पण अज्ञानांनाही उद्धरून म्हणून शबरी सारख्या भिल्लिणी ना सुध्दा आपण पावन केलेत .आपल्याला अज्ञानी लोकांची करुणा येते .त्यांना संसाराच्या दलदलीतून बाहेर काढता .म्हणूनच पिंगले सारख्या वेश्येला सुध्दा तारून नेता .
आपण आचार्य आहात तत्वज्ञानाचे अधिष्ठान असलेले प्रस्थान त्रयी चा अभ्यास  करणारे आहात .
जे भवसमुद्री पोळले | विषयमदे अंध जाहले |
चौ-याशित वाहू लागले |  मार्ग सुचेना तयासी ||२ ||
या संसार रुपी भवसागरात जे पोळले ,विषयाचा मद ज्यांना चढला आहे आणि त्यामुळे जे अंध झाले आहेत .ज्यांना खरे खोटे ,सार असार कळत नाही ,चौ-यांशी लक्ष योनी ज्यांना फिराव्या लागतात ,मुक्तीचा मार्ग ज्यांना दिसत नाही ,त्यांचा उध्दार आपण करतात .
ऐसे विश्व बहुत बुडाले | मी जीव म्हणोनी धांवू लागले |
मुळीच स्मरण विसरले | मी कोण ऐसे || ३ ||
हे विश्व तुझ्याच सत्तेने चालते ,त्याचे तुम्ही पालनही करता ,पान त्या विश्वाचा लय ही करता ,त्या विश्वाचा लय ही आपणच करता .माणूस अज्ञानाने स्वत:ला जीव म्हणतो .जीव म्हणजे मी म्हणतो . अज्ञानाने धावू लागतो .  त्याच्यावर अज्ञानाचा पडदा येतो .त्यामुळे देह म्हणजे मी असे त्याला वाटते .त्यामुळे खरा मी कोण याचे त्याला विस्मरण होते .
तयासी मुक्त करावया पूर्ण | तूं बा उतरलासी ज्ञानघन |
रोगिया औषधी देऊन | भवमोचन करिसी || ४ ||
अशा देहबुद्धी असणा-या अज्ञानाला पूर्ण करायला हे दयाघना तू आला आहेस .तू ज्ञानरूप आहेस .त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती ही तू मला करून देशील .मी अज्ञानी असलो तरीही तू सर्व अज्ञानी जीवांचा उध्दार करणारा आहेस .गुरु गीतेत सांगितल्या म्हणल्या प्रमाणे भव व्याधी होती निर्मळ | व्याधी म्हणजे रोग येथे रोग या अर्थी रोगिया असा शब्द आहे ज्याप्रमाणे भवसागर तरून जाण्यासाठी मदत करतोस म्हणून मी अज्ञानी मी तुला शरण आलो आहे .
ऐसे औदार्य तुझे सघन | म्हणोनि आलो मी शरण |
दयार्णवा कृपा करून | मज दातारे तारावे || ५ ||
तू उदार आहेस .तुझे औदार्य महान आहे .मला तुझ्याजवळ आश्रय  देशील म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे .हे दयार्णवा ,दयेच्या सागरा ,कृपा कर .आणि मला बालकाला तरून ने .
सोलीव सुख हे प्रकरण गुरु शिष्यांचा संवाद आहे .शिष्याला गुरुंना विनंती करायची आहे .
आपण आपणा ते पावे | ऐसे माझे मनी बोलावे |
ते दातारे गोचर करावे | रोकडे ब्रहम || ६ ||
मी मला प्राप्त व्हावे म्हणजे मी स्वस्वरुपी असावे .तुम्ही मागू ते देणारे आहात .रोकडे ब्रहम माझ्या ईंद्रीयांना गोचर होऊ देत .मला परमेश्वर दाखवा आणि मला रोकडे ब्रहम प्रचीतीला येऊ द्यात या दोन्हीत फरक आहे .रोकडे ब्रहम प्रचीतीस येण्यासाठी सद्गुरू वं सत्शिष्य दोन्ही प्रचीतीचे असावे लागतात .रोकड्या ब्रह्माचे दर्शन होण्यासाठी सर्व सोडण्याची तयारी हवी .वैराग्य परीसीमेला पोचलेले असावे लागते .शंकराचार्यांच्या अष्ट काप्रमाणे व्यतिरेक वं अन्वया वागता आले तर ते गोचर होते .मला रोकडे ब्रहम दाखवा असे शिष्याने म्हणताच काय झाले ?
ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी |
ज्ञानाचे भरते आले | स्वामी लागोनि |
आसन सांडोनिया तये क्षणी | कडकडोन भेटले || ७ ||
शिष्याचा प्रश्न ऐकून सद्गुरुंना ज्ञानाचे भरते आले .आणि शिष्याला कोठे ठेवू आणि कोठे नको असे सद्गुरुंना झाले .आणि त्या आनंदाच्या भरात सद्गुरुंनी आपले आसन सोडले आणि शिष्याला कडकडून भेटले .
रे बाळका ,ऐक निर्धार | तुझा प्रश्न वाग्दोर |
माझे कंठी बैसला साचार | बरे घेई निजा वस्तू || ८ ||
अरे बाळका माझा निर्धार ऐक .तुझा प्रश्न म्हणजे माझा वाग्दोर आहे .म्हणजे लगाम आहे .तो माझ्या कंठी बसला आहे .त्या प्रश्नाने मी तुझ्याकडे ओढला गेलो आहे .चाळ तर ,तुला मी निजवस्तू ,ब्रहम देतो ते घे .

मग स्नेहाळे नवल केले | वोसांगाशी शिष्या घेतले |
अर्ध मात्रा रस काढिले | पूर्ण फुंकले कर्णरंध्री || ९ ||
गुरूंनी शिष्याला मांडीवर घेतले .अर्ध मात्रेचा रस काढला .एकनाथ महाराज म्हणतात : कानी जे पेरिले | नेत्री ते उगविले | कानात पेरला महावाक्याचा मंत्र .डोळ्यामध्ये शिष्याला आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला .स्नेहाळाने म्हणजे सद्गुरुंनी नवल केले ,आश्चर्य केले .गुरूंनी शिष्याला मांडीवर घेतले .ओंकाराच्या अर्धमात्रेचा रस काढला .ओंकाराच्या पहिल्या तीन मात्रा देहाच्या तीन अवस्थां बरोबर आहेत  ओंकाराच्या चार मात्रा अ ऊ म आणि अर्धमात्रा .या मात्रा समजून घेण्यासाठी देहाच्या चार अवस्था आहेत .अ काराची मात्रा म्हणजे जागृती अवस्था .ऊ काराची मात्रा म्हणजे स्वप्नावस्था वं म काराची मात्रा म्हणजे सुषुप्ती अवस्था .ओंकाराची अर्धमात्रा म्हणजे म्हणजे चंद्र आणि बिंदू .,म्हणजे तुरीय अवस्था . अर्धमात्रेचा अनुभव म्हणजे स्वरूपाचा अनुभव . स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी पहिल्या तीनही मात्रांना ओलांडून पुढे जावे लागते .मग त्याची विशालता ,विविधता ,नाद ,बिंदू ,चंद्राची कला ,वं ज्योती अशा प्रकारे ,अर्धमात्रेचा अनुभव येण्यासाठी तीनही मात्रा ओलांडून जावे लागते ,
अर्धमात्रेचा रस काढला म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतला .त्या सगळ्याचा रस ,अर्क काढला .तो पूर्ण अर्क शिष्याच्या कर्णरंध्रात फुंकला तो दिव्य रस कानातून डोळ्यात  गेला .
खडतर औषधी दिव्यरसायनी | नयनी झोंबले जाऊन |
डोळियाचा डोळा फोडून | चित्सूर्य भेदिले || १० ||
केनोपानिषदात २ या मंत्रात म्हटले आहे :: श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद |
वाचो हं वाचं स प्राणस्य प्राण : |
चक्षुस्च्क्षुरति मुच्य धीरा : |
प्रत्यास्माल्लोकाद् मृता भवन्ति |
परब्रह्म परमात्मा श्रोत्राचा श्रोत्र ,मनाचे मन डोळ्यांचा डोळा आहे .ज्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केले तो उपाधीने युक्त झाला .प्रकृती पुरुष रूप झाला .सगुण परमात्मा झाला प्रभू श्रीराम हे त्या परमात्म्याचे सगुण रूप तर आत्मा हे त्याचे निर्गुण रूप .तीच प्रत्येकात असलेली चैतन्य शक्ती आहे .या शक्तीचा आश्रय घेऊन चीत्सूर्याला भेदून टाकले आहे .
पूर्ण अंश गगनी भेदिला | अर्क तो पिंडी माजी उतरला |
त्रिकुट श्रीहाट चुराडा केला | सेखी भरला गगन गर्भी || ११ ||
कर्णरान्ध्रातून फुंकलेल्या ओंकाराच्या अर्ध मात्रेचा रस पूर्ण अंशाने गगनाला भेदला .पिंडामध्ये अंश रुपाने म्हणजे सोहं भाव राहिला .त्रिकुटाचा म्हणजे सत्व ,रज ,तमाचा चुराडा केला. सत्व ,रज ,तमोगुणां च्या पलीकडे गेला .
आज्ञा चक्र ,श्रीहाट ,वं गोल्हाट या तीन चक्रांचा एक त्रिकोण तयार होतो .यालाही त्रिकुट म्हणतात .या त्रीकुटावर सद्गुरूंची पावले उमटतात.
कुंडलीनी मार्गात कुंडलिनी जागृत होताना ज्या मार्गावरून जाते ते ते आज्ञाचक्र ते सहस्राधार चकरा पर्यंत पोहोचते .ती सरळ मार्गाने न जाता वाकड्या मार्गाने जाते .ही आज्ञाचक्र ,श्रीहाट ,गोल्हाट या मार्गाने जाते .ही चक्र शक्तीची स्थाने मानली तर सत्व ,रज तमो गुणांचा आपल्या शरीरात असतात .प्रत्येक क्षणी या त्रिगुणांची नवनवीन समिश्रणे तयार होतात .जेव्हा या त्रिगुणांचे खेळ बंद केले त्रिगुणांच्या पलीकडे नेले .श्रीहाट यात श्री म्हणजे प्रकृती ,हाट म्हणजे बाजार म्हणजे पंचमहाभूतांचा वं त्रिगुणांचा खेळ बंद केले योग मार्गात चित्त वृत्तीचा निरोध होतो आणि ईश्वराचा अनुभव येतो .                 
उग्रतेज लखलखाट | तेथे जाला चौदेहाचा आट |
भ्रांती पडली बळकट | तेव्हा बाळ निचेष्टित पडे || १२ ||
चार देहांचा म्हणजे स्थूळ ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण या चार देहांचा नाश होतो .मग जीव भाव संपतो ,अद्न्यानाची उपाधी संपली ,जीव भाव संपतो .हिरण्यगर्भा च्या तेजाशी याचा संबंध येतो .हे सर्व त्या शिष्याला झेपले नाही .म्हणून तो बेसावध झाला
ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ | पद्म्हस्त मस्तकी ठेवत |
वत्सा सावध त्वरित | निजरूप पहा आपुले || १३ ||
शिष्य बेसावध झाला असे पाहून आपला पद्म्हस्त सद्गुरुंनी शिष्याच्या मस्तकावर ठेवला आणि सद्गुरू म्हणाले वत्सा सावध हो . तू तुझे रूप स्वत : पहा .
जागृत  करोनी ते वेळी | अजपाची दोरी देऊनी जवळी |
विहंगम डोल्हारी तयेवेळी | अलक्ष्य लक्षी बैसविले || १४ ||
शिष्याला समर्थ जागृत करतात आणि म्हणतात मी तुला अजपाजपाची दोरी दिली आहे अजपाजप म्हणजे न जपता सहज होणारा सोहं जप श्वासोश्वासात एकवीस हजार सहाशे जप आहे याचा अर्थ एकवीस हजार सहाशे वेळा आपण श्वास उचावास करत असतो . अजपाजपाने अलक्ष्य असणारे परमात्मस्वरूप प्राप्त करून घेता येते . ,तत्वमसी आदी महावाक्यांच्या निरुपण सद्गुरू करतात .,ज्याचा वेध घेता येत नाही त्याच्या पर्यंत विहंगम मार्गाने स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचता येते .तसा तू पोहोचशील .धैर्याचे आसन बळकट | आणि इंद्रीये ओढुनी सघट |
धरे ऊर्ध्वपंथे वात नीट | अढळपदी लक्ष लावी || १५ ||
तुला योगप्राप्ती झाली तरी तू धैर्याने ,बळकट आसन घालून ,तुझ्या उद्देशापासून दूर न जाता त्यासाठी ईंद्रीये दमन करावे लागेल . असे सांगण्याचे कारण धैर्य आणि बळकट आसन या दोघांचा विचार केला नाही तर योगभ्रष्टता येते .असे होऊ नये म्हणून उद्धर्व मार्गाने जायचे आहे .त्यासाठी गुरूने सांगितलेल्या मार्गाने जायचे .गुरूने उपदेश करावा आणि शिष्याने त्या प्रमाणे वागावे .त्यासाठी धैर्य ,निर्विचारी ,निर्विकारी मन असावे .ईंद्रीय ओढून सघट म्हणजे ईंद्रीयांचे नियंत्रण करायचे .गुरु  शिष्याचा अधिकार जाणून त्याला दृष्टी स्पर्श या मार्गाने शिष्याला पुढे नेतात .
पुढे करोनिया जाणीव | मागे सारोनी नेणीव |
जे जे जाणीव अभिनव | ते तू नव्हेसी आता || १६ ||
विश्वात परामात्म्ररूपाने जाणीव भरली . सर्वदूर भरून राहिलेल्या जाणीवेला पुढे कर .अद्न्यानाला मागे कर . त्यासाठी दृष्टांत पातेल्याचा देता येईल . घासून पुसून स्वच्छ केलेले पातेले गरम केले  तर मसालेदार पदार्थाचा वास येतो .कारण त्यांचा संस्कार शिल्लक राहतो .तसे गुरु शिष्याला घासून पुसून स्वच्छ करतात .तसा अज्ञानाचा संस्कार गुरु पुसतात . शिष्याकडून गुरु साधना करवून घेतात .तेव्हा त्याला अनुभव यायला लागतात .तेव्हा गुरु सांगतात की की येणारे अनुभव दूर कर .त्यांच्या मध्ये अडकू नकोस .तू त्या अनुभवा पलीकडे आहेस .आलेले अनुभव हे ब्रह्मस्वरूप नाही हे लक्षात ठेव .
तै मार्गाची करू नव्हाळी | प्रथम घंटानादाची नवाळी |
दुसरी किंकिणीची मोवाळी | तिसरी अनुहात कोल्हाळ || १७ ||
नव्हाळी म्हणजे नवलाई . तुला अनुभवात प्रथम घंटानाद ऐकू येईल .किंकिण ऐकू येईल .पण या अनुभवात अडकू नकोस .पुढे जा .
आता अग्री लक्ष लावी | काय दिसेल ते न्याहाळी |
चंद्र ज्योती प्रकाशली | व्यूह बांधिला बळकट || १८ ||
आता तू लक्ष लाव तुझ्या ध्येयाकडे .तुला जे दिसेल ते तू न्याहाळ .सृष्टीच्या निर्मिती चा व्यूह ,गुंता दिसेल .सृष्टी कशी निर्माण झाली , त्यांचा व्यूह बळकट आहे कठीण आहे .कारण तुला ह्या सृष्टीच्या पलीकडे जायचे आहे .सृष्टीची निर्मिती ज्याच्या पासून झाली त्या तत्वांच्या पलीकडे तुला जायचे आहे .मी  तुला स्वरूपाचे सुख मिळाले ते अंतरी धर . मी तुला स्वरूपाचे सुख मिळाले ते अंतरी धार .तरी त्या स्वरूपाच्या अनुभवाची कोवळीक आहे ,नवेपणा आहे ,तुला पुढे  जायचे नाही स्वरूपानुसंधान सुखरूप ठेवून तुला पुढे जायचे आहे .
ते सुख अंतरी घेउनी | पुढे चाल करी संगमी |
तेथे विजू ऐसा कामिनी | चमकताती सुवर्णरंग || १९ ||
पुढे विजेचा लखलखाट आहे ,सोनेरी रंगाचा लखलखाट होईल .तो हिराण्यगर्भाचा ,जो सृष्टीचा मूळ अधिष्ठाता आहे .म्हणून ते ही मागे टाक .
तेहि जाणोनी मागे सारी | पुढे सूर्यबिंब अवधारी |
ज्वाळा निघती परोपरी | डंडळू नको कल्पांती || २० ||
ते सर्व मागे सारून सूर्यबिंब बघ .सूर्य उगरूपाने प्रकट झाला आहे . डडळ म्हणजे डळमळीत .सूर्य बिंबापासून जरी  ज्वाला निघत असल्या तरी तू डळमळीत होऊ नकोस .तू थांबू नकोस . कल्पांत झाला तरी घाबरु नकोस .
वायोमुख करोनी तेथे | गिळी वेगे सूर्यकिरणाते |
मग देखसी आनंद मार्तंडाते | तेजोमय ममपुत्रा || २१ ||
रे पुत्रा  आता तू तेजोमय झालास .हिरण्यगर्भाच्या पातळीवर तू आलास .तू आता आनंद सूर्य पाहशील .म्हणजेच सत् चित् आनंदाचा अनुभव घेशील .ब्रह्माच्या सर्व लक्षणाचा अनुभव घेशील .वायुमुख म्हणजे सुषुम्ना नाडी .या नादितून प्राणांचा प्रवास ऊर्ध्वगामी असतो .तेव्हा तू आनंद मार्तंडाचा अनुभव घेशील कारण तू आता तेजोमय झाला आहेस .
अनंतभानू तेज अद्भुत | खदिरांगार ज्वाला उसळत |
धारिष्ठ तेथे न निभत | दुर्घट व्यूह तेथीचा || २२ ||
अनंत सूर्यांचे अद्भूत तेज तुझ्यामध्ये आता आले आहे .मोठ्या मोठ्या ज्वाला आता उसळत आहेत .सूर्य वं चंद्र नाडी ह्या श्वासोच्छवासाच्या ठिकाणी आहेत सुषुम्ना नाडी जी पाठीच्या कण्यातून जाते ,त्यातून प्राणांना ऊर्ध्वमुख केले जाते .या सुषुम्ना नाडीला काकीमुख म्हणतात .सर्व प्रकारचे प्राण या सुषुम्ना नादितून वर् जातात ,ऊर्ध्वमुख होतात .मग तुला सत् चित् आनंद रूपाचा अनुभव येईल .
तेथे हुशारीचे काम | अग्री लक्ष लावोनी नेम |
तीरे लावोनी सुगम | मागे सारी सूर्याते || २३ ||
प्रणवाचे धनुस्ष्य कर .अर्धमात्रेचे धनुष्य झाले ,ब्रहम हे उद्दिष्ट ठेव .स्वरूपाच्या अखंड अनुसंधानासाठी जीवाचा तीर कर .
पुढे दिसेल ते नवल | ते पाही हंसमेळ |
चंद्रकिरण शीतल | पाहसी तू मम वत्सा || २४ ||
पुढे तुला एक नवल दिसेल .तू हंसमेळ पहा हंस म्हणजे स : अहं तो मी प्राण आहे .ही जाणीव श्वास घेताना ज्ञान आहे की मी जीव आहे .श्वास घेणे वं सोडणे या दोन क्रिया प्राण वं अपानाचा खेळ आहे .तोच हंसा मेल आहे .नाम्स्म्मरण करताना सुध्दा हंसा मेळ होतो .जेव्हा एकतानता होते तेव्हा ध्यान होते .जेव्हा त्रिगुण व्याक्तावस्थेत येतात ,पंचमहाभूते वं त्रिगुण यांची अष्टधा प्रकृती होते वं सृष्टीची निर्मिती होते .हंसामेळात ,ध्यानावस्थेत अहंकार सुटतो ,स्वरूपाचा अनुभव येतो . त्रिगुण सुटतात .चंद्राच्या शीतल चांदण्याची जाणीव होते .
तेव्हा मागील दाह क्षमेल | शीतळाई सर्वांग होईल |
चंद्राची प्रभा सुढाळ | फडफडीत चांदणे || २५ ||
त्रिगुणांना ओलांडून पुढे गेले की दाह शमतो . सर्वांगावर शीतळाई येईल . चंद्राची प्रभा फाकेल .सर्वत्र चंद्र प्रकाश पसरेल . फडफडीत चांदणे पडेल तुझ्या देहात तुला अनुभव येईल .
तेचि डोळियांचा डोळा पाही | देहातीत वर्म विदेही |
चिन्मय सुखाची बवाई | भोगी आपुले की गा || २६ ||
देहाच्या अतीत असण्याचे वर्म तुला कळेल तू विदेही होशील .चिन्मय सुखाची प्राप्ती तुला होईल .चित् चे अनुभव तू घेशील .चिन्मय म्हणजे चित् + मय .मय म्हणजे विपुल .त्याचे चित् जगात भरून राहिलेले आहे अशी जाणीव तुला होईल .तू सर्व व्यापी होशील . बावाई म्हणजे बहुवाई म्हणजे तू बहुत होशील .सर्वांमध्ये समरस होशील .तूच सर्व होशील . तुझ्या चिन्मय रूपाचा ,मूळ स्वरूपाचा अनुभव घे . महत् जाणीवेचा अनुभव घे ,भोग घे .
अनुभवाची शीग भरली | आग्रापरी उसळली |
भूमंडळी प्रभा पडली | कर्पूर वर्ण नभ जाहले || २७ ||
तू आता निर्गुणा पर्यंत चा अनुभव घेतलास . अनुभवाचे मापन करता येते पण तुझा अनुभव मापना पलीकडे गेला आहे .आग्रा परी उसळी म्हणजे जणू काही तुझ्या पासून अनुभव प्रगट झाला आहे . अनुभव देणारा वं घेणारा एकच आहे द्वैत संपले आहे .अद्वैत झाले आहे .मुळात आकाश काळे आहे .पण सूर्य प्रकाशाने ते निळे दिसते .पण तुझे अज्ञान म्हणजे काळेपणा संपला आहे म्हणून आता आकाशाची निळाई संपली आहे .सात रंग एकत्र आल्यावर पांढरा रंग दिसतो ,त्याच प्रमाणे तुझे अज्ञान संपल्या मुळे कर्पूरगौर वर्ण दिसतो आहे .
तया मध्यभागी सघन | अढळपद  दैदिप्यमान |
उर्वरित ब्रहम जाण | धृव बैसला अढळ ते || २८ ||
कर्पूर नभात तुझ्या अनुभवा पलीकडे तुझे स्वरूप आहे .तुझे ज्ञान ,तो मार्ग ,ती जाणीव आता शिल्लक रहात नाही .ध्रुवाला जसे अढळपद मिळाले तसा तू सुध्दा अढळपदी जाऊन बसणार आहेस .
ते तुझे स्वरूप नेटे वोटे | जेथे समस्त जाणणे आटे |
ऐके जालासी थिटे | बळकट पणे बलाढ्य || २९ ||
तू अशा रुपाला जाऊन पोहोचणार आहेस तेथे सर्व जाणणेही संपेल .अद्न्याची अवस्था तू पार केली आहेसच पण आता ज्ञानाची अवस्थाही तू पार केली आहेस .ह्याला कारण तू बलवान ,बलाढ्य आहेस .तू तुझी साधना कोणत्याही टप्यावर सोडली नाहीस .
ऐसे सुख योगिया लाधले | तेव्हा देहाचे  मरण गेले |
सांगणे ऐकणे मुराले | एकत्वपणे एकचि || ३० ||
असे सुख जेव्हा योग्याला मिळाले ,तेव्हा देहाचे मरण गेले कारण तू अशा अवस्थेत असशील की देह जगाला काय किंवा मेळा काय तुझ्या साठी सारखेच असेल .विदेही अवस्था तुला प्राप्त होईल . सांगणे ,ऐकणे ,सगळे तुझ्यासाठी सारखेच होईल .
शांती येथोनि माळ घाली | अलक्ष्य सेजे निजेली |
हंसपदे ऐक्य जाली | सुख सुखाते निमग्न || ३१ ||
तुला अखंड तृप्ती ची प्राप्ती होईल .काहीही मिळवायचे शिल्लक राहणार नाही .असे तुझे दर्शन लोकांना होईल .तू ब्रहमभावाला प्राप्त झालास अलक्ष्य म्हणजे ब्रहम ते तुझ्या जवळ निजेल म्हणजेच तुला ब्रहम पदाची प्राप्ती होईल .हंस पदे ऐक्य झाले म्हणजे स्वरूपाशी तू एकरूप झालास .तुला जगातून काही मिळवायचे शिल्लक राहणार नाही . कार्य करायला काही उरणार नाही .कारण तुला कोणताही संकल्प उरणार नाही .ह्यालाच शून्यता म्हणतात .तुझ्या रुपाने सुख सुखात निमग्न झाले .सुख तुला शोधात आले .
तेथील अनुभव घेऊनि | स्वानुभव पाहे कलटूनि | 
आला मार्ग ते क्षणी | दिसेनासा जाला की || ३२ ||
तू अंतीम शांततेचा अनुभव घेतलास .तू मागे वळून पाहिलास तर तुला मार्ग दिसेनासा होईल .
त्रिकुट श्रीहाट गोल्हाट | बुडाले ते औटपीठ |
इडा पिंगळा सुषुम्ना तट | विराले ते स्वात्मसुखे || ३३ ||   
कारण त्रिकुट म्हणजे त्रिगुण ,श्रीहाट म्हणजे प्रपंचाचा बाजार संपला .ईडा ,पिंगला ,सुषुम्ना ह्या सर्व नाड्या ही विराल्या आणि स्वात्म सुखाचा अनुभव तू घेतलास .
स्थूळ सूक्ष्म कारण | नेणो काय जाले महाकारण |
ईंद्रीय चुबकली जाण | धाव मोडली तयांची || ३४ ||
स्थूळ ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण ह्या देहाच्या अवस्था च्या पलीकडे तू गेलास .त्यामुळे तुझी इंद्रीये सुध्दा बुच्कुल्यात पडली ,त्यांची विषयांकडे जाणारी धाव ही संपली .
पंचभूतांचे खवले | तयांचे ठावाची पुसले |
अपरिमित आनंदले | निमग्न जाले सुखात || ३५ ||
खवले म्हणजे टरफल .पंचमहाभूतांची टरफले ,त्यांचे ठाव म्हणजे स्थानही संपले .तुला अपरिमित आनंद झाला .चैतन्य सुखात निमग्न झाले .देह पंचभूतिक राहिला नाही .आणि तुझ्यात ब्रह्मत्व प्रकट झाले .
सखोल भूमी ऐसे जाले | सुख सुखासी घोटले |
स्वये आत्मत्व प्रकटले | माझे देही रोकडे || ३६ ||
सुखाला सुखाने घोटले .एकजीव झाले .ज्याप्रमाणे कोणतेही होमिओपॅथिक ,आयुर्वेदीय औषध घोटले की एकजीव होते त्याप्रमाणे तू सुखाला सुखांने घोटलेस .मग देहात प्रत्यक्ष रोकडे ब्रहम प्रकट झाले .
मग सहजसमाधी जिरवून | शिष्य उठला घाबरा होऊन |
हे सद्गुरू देणे वरदान | काय उत्तीर्ण व्हावे म्या ||३७ ||
मग शिष्य सहजसमाधीतून बाहेर आला .सतत अनुसंधानात राहणे म्हणजे सहज समाधी .त्यातून शिष्य घाबरा घुबरा होऊन उठला .आणि म्हणतो ,गुरुदेवां ,आपण मला वरदान दिले .त्यातून मी कसा उतराई होऊ ?
जरी स्तुती तयाची करावी | माझी मती नाही बरवी |
अनिर्वाच्य गती बोलावी | परा वाचा कुंठीत || ३८ ||
आपली स्तुती मी कोणत्या शब्दात करू ? माझी बुद्धी ते करू शकत नाही कारण माझी परा वाचा सुध्दा कुंठीत झाली आहे .मला शब्द सुचत नाहीत . आपले वर्णन अनिर्वाच्य असेच करावे लागेल .
आता जी मी लडिवाळ पणे | तुमचे कृपेने करितो स्तवन |
सूर्यापुढे खद्योत जाण | तैशापरी बोल हे || ३९ ||
आता मी लडिवाळपणे तुमच्याच कृपेने तुमचे स्तवन करतो .सूर्यापुढे जसा काजवा तसा आपली स्तुती मी करणे आहे .
जयजयाजी करुणासिंधू | जयजयाजी भवरोग वैदू |
जयजयाजी बाळबोधु | कृपाघना समर्था || ४० ||
आपण करुणेचे सागर आहात .भवरोगा वरचे औषद देणारे वैद्य तुम्ही आहात .कृपेचा मेघ वर्षाव करणारे आहात .
जयजयाजी अविनाशा | जयजयाजी परेशा |
जयजयाजी अध्यक्षा | दयार्णवा || ४१ ||
आपण अविनाशी ,कधीही नाश न पावणारे आहात .आपण दयेचा सागर आहात .
जयजयाजी पूर्णचंद्रा | जयजयाजी अलक्ष्य विहारा |
जयजयाजी भवसिंधू भास्करा | आनंदप्रभू || ४२ ||
आपण पूर्ण चंद्रा सारखे आहात ,जो अलक्ष्यात लोक लवकर विहार करतात .
तुझी स्तुती करितां सांग | वेद्स्तुती जाले अव्यंग |
तेथे प्राकृत मी काय | वर्णावया योग्य नव्हे || ४३ ||
तुझी स्तुती करताना वेद ही शांत झाले कारण त्यांची वाणीही थकली .
कल्याण म्हणे जी रामदासा | माझा मुकेपणाचा ठसा |
ते मोडोनी वसोसा | मज आपणा ऐसे केले || ४४ ||
कल्याण स्वामी समर्थांना म्हणतात माझ्या मुकेपणाचा ठसा म्हणजे अज्ञान ते आपण मोडलत . वासोसा म्हणजे परिश्रम . परिश्रम करून तुम्ही माझे अज्ञान नाहीसे केले .सद्गुरू शिष्याला परीस करतात . परीस लोखंडाला सोने बनवते .पण ते सोने दुस-या लोखंडाला सोने बनवू  शकत नाही . पण सद्गुरूंचे तसे नसते .सद्गुरू शिष्याला त्यांच्या सारखेच बनवतात . शिष्य आपल्या सारखाच दुसरा शिष्य बनवतो .म्हणजेच परीस बनवतो .
ऐकोनी मृदुवचन | कुरुवाळीले तया लागून |
गुरु शिष्य हे बोलणे | उरले नाही ते वेळी || ४५ ||
असे मृदू वचन ऐकून गुरुंनी शिष्याला कुरवाळले .मग तेव्हा गुरु शिष्य वेगळे उरले नाहीत . त्यांचे बोलणे ही संपले नाही .
एकपण एकचि जाले | ऐक्य् रुपी  सम मिळाले |
करुनिया सुख उसळले | नाहीपण जाऊनि || ४६ ||
भक्ती प्रेमाचा ओलावा आहे .प्रेमभाव ब्रहमभावाने ब्रह्मांडात परमात्मा निवास करायला लागला .बहु नामरूपात आला .कारण सर्व जगाविषयी परमेश्वराचे प्रेम आहे .अद्वैत एकच झाले .व्यतिरेक संपला .अन्वय साधला .त्या भावाने सर्व एकरूप झाले .
सुगरिणीचा पाक जाला | नाथभाजनी वाढीला |
अक्षयपदी सुगरवाला | संत जेवती स्वानंदे || ४७ ||
सुगरीणी चा पाक झाला .हा दृष्टांत दिला आहे . सुगरण अनेक पदार्थ करते .अनेक पादार्थांचे चवीचे माधुर्य लोक खाताना अनुभवतात ,नभ व्यापक आहे .त्या व्यापक नभाच्या अंगणात भोजन आहे .सुरगावला म्हणजे रुची आली .रसाळ पण आले .ते भोजन गुरूने शिष्या करता बनवले ,त्या भोजनाची रुची अक्षय पदाला पोहोचली .अवीट असे सुख सद्गुरुंनी शिष्याला दिले . पण सर्व अक्षर बध्द केले सामान्यासाठी ,त्यांना आनंद देण्यासाठी .
अनिर्वाच्य बोल बोलिले | साधकाचे उपेगां आले |
सिद्ध तरी डोलो लागले | बध्द  मुमुक्षु होताती ||४८ ||
सिद्धांत अनुभवाची खूण पटली . अनिर्वाच्य असे अनुभव शब्द बध्द केले .ते ऐकून सिद्ध डोलायला लागले .बध्द मुमुक्षु झाले .
यापरते आन नाही बोला | श्रीराम दाशरथीची आण  |
एकपत्नी तो सुजाण | आपुले पद दे दास || ४९||
मी काहीही खोटे सांगितले नाही . मी दाशरथी श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो .
इति श्री दासबोध ग्रंथ | त्यातील हा सोलीव अर्थ |
श्रोते ऐकता यथार्थ | समाधिस्त होती || ५० ||
हा दासबोध ग्रंथाचा सोलीव अर्थ आहे .जे श्रोते यथार्थ म्हणजे अर्थ लक्षात घेऊन ऐकतील ते समाधी स्थिती अनुभवातील .













                          















                                                                                              






     



सोमवार, 23 जून 2014

आदिशक्ती

आदिशक्ती
कुमारी शारदा देवी | सुंदरा गायनी कळा |
हंसासनी चतुर्भुजा | वीणा पुस्तक नेटके || १ ||
ब्रह्मी जाली जगजोती | ब्रह्मसुता म्हणोनिया |
ब्रह्मसुता वेदमाता | वेद तेथून जाहाले || २ ||
जाणीव म्हणजे देव्या | जाणता देव बोलिजे |
सीवशक्ती रत्नजोती | वेगळी करितां न ये || ३ ||
सीवशक्ती बहुरूपा | नामरूपी विलासते |
दिसते नासते काया | माया ते अंतरी वसे || ४ ||
ब्रह्मांडीची मूळमाया | पींडीची जाणिजे परा |
परा ते मूळमाया ते | वेदमाता म्हणोनिया ||  ५ ||

कुमारी शारदा देवीची गायनी कळा आहे . हंसावर आरूढ असलेली चतुर्भुज असणारी नेटके पणे वीणा पुस्तक धारण करणारी शारदा आहे ब्रह्मा मध्ये एको हं बहुस्याम हे झालेले प्रथम स्फुरण म्हणजे मूळमाया .ह्या मूळमायेची दोन अंगे .एक शक्ती रूप वं एक जाणीव रूप .शारदा शक्तिरूप आहे ,म्हणजेच जगज्जोती आहे .ती ब्रह्मा पासून झालेली म्हणून ब्रह्मसुता आहे .वेद तिच्यापासून निर्माण झाले म्हणून वेदमाता आहे .जाणीव म्हणजे देवता आहे,शारदा आहे .जाणीव रूप म्हणजे जाणता देव आहे म्हणजे गणेश आहे .
आपले सगळे देव शक्ती वं जाणीव रूपातच असतात .शिव आणि शक्ती रत्न आणि ज्योती हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही .शिव शक्ती अनेक रूपात ,अनेक नामात दिसते .काया शरीर दिसते ,नाश पावते .माया मात्र मनात असते .ब्रह्मांडात जशी मूळमाया ,तशी पिंडात परा वाणी .परा वाणी आणि मूळमाया एकच ! कारण ती वेदमाता आहे .



२८ आदिशक्ती
मायची माय तीची हि | जन्ननी मात्रु जन्ननी |
माता माता तीची माता | वोली हे लांबली बहू || १ ||
माया माया बहु माया | मूळमाया मुळी असे |
जगाची मुळीची माता | जगन्माता म्हणोनिया || २ ||
त्रैलोकी समस्तां माता | आंडजारजादिका |
सर्वांच्या लांबल्या वोळी | पाहो जातां मुळाकडे || ३ ||
जगन्माता जगत्पिता | सीवशक्तीच जाणिजे |
शक्ती ते शक्ती जाणावी | सीवशक्ती सदा वसे || ४ ||
शक्ती दोहीकडे आहे | सामर्थ्य याच कारणे |
त्रैलोकी सर्वही देहे | शक्तीवीण अशक्त ते || ५ ||
सर्वांची पाळिली कुळे | कुळदेव्या म्हणोनिया |
दासांची शक्ती दासाला | बोलिली कृपाळू पणे || ६ ||


तुळजा भवानी आईची आई आहे .जननी आहे .माता आहे .ही यादी खोप वाढेल .माया आहे मूळ माया सर्वात आधी आहे .ती जगाची खरोखरच माता आहे .ती जगन्माता आहे .अंडज ,जारज यांची ती माता आहे .आपण जर मूळ पहायला गेलो तर असे लक्षात येते की तीच जगन्माता ,जगत्पिता आहे .तीच शिवशक्ती आहे .त्या शक्तीला ओळखायला हवे .सामर्थ्य या शक्ती मुळेच मिळते . त्रेलोक्यातले सर्व देह शक्ती शिवाय अशक्त होतात .त्यासाठी भवानी ला ओळखायला हवे .तिने सर्व कुळांना कुलदेवी म्हणून सांभाळले आहे .दासांची शक्ती आहे .असे कृपाळू पणे बोलवते .




आदिशक्ती

आदिशक्ती
वसे मुख्य नेत्री तथा शब्द श्रोत्री |
सदा सर्व गात्री दिसे प्राणीमात्री ||
पहा एकतंत्री फिरे देह्यत्री |
जगज्योती हिंडे कुपात्री सुपात्री || १ ||
पहा तर्कशास्त्री पहा न्यायशास्त्री |
पहा शिल्पीशास्त्री पहा सर्व शास्त्री |
पहा मंत्रयंत्री पहा सूत्रमात्री |
पहा मूळमंत्री अरत्री परत्री || २ ||
पहा वेदशास्त्री पहा शास्त्रमात्री |
पहा कीर्तिमात्री पहा काव्यमात्री ||
पहा ग्रंथमात्री पहा लोकमात्री |
पहा शब्दमात्री सुचीत्री विचीत्री || ३ ||
कुवर्नी सुवर्णी पहा वर्णवर्णी |
आकर्णि विकार्नी च कर्णोपकर्णी |
कितीयेक धरणी किती वृक्षपर्णी |
बहु जीव ते दाटले व्योमतरणी || ४ ||
समस्तांसी कर्णे समस्तांसी धरणे |
समस्तांसी हर्णे समस्तां विवर्णे |
जगज्जोतीने राखिले आपणासी |
म्हणे दास हे सौख्यरासी विलासी || ५ ||
आदिशक्तीच डोळ्यात राहून आपल्याला दृष्टी देते .कानात राहून ऐकू येते .प्रत्येक प्राण्याच्या प्रत्येक गात्रात तीच असते .प्रत्येक प्राणीमात्रात तीच असते .ती तिच्या इच्छेने सर्वत्र संचार करते .सर्व देहांमध्ये फिरते .ही जगज्जोती सर्वत्र आहे .
ती तर्कशास्त्रात आहे ,न्यायशास्त्रात आहे .शिल्पशास्त्रात आहे ,सर्व शास्त्रात आहे .तुम्ही तिला मंत्रात यंत्रात ,सूत्रात मूळ मंत्रात अरत्र इहलोकात परलोकात पहा .वेद्शास्त्रात शास्त्रात कीर्तित काव्यात ग्रंथात लोकात शब्दात सुचीत्रात पहा .चित्र विचित्र शब्दात पहा .सुवर्णात कुवर्नात पहा .वेगवेगळ्या वर्णात तिला पहा .कानापर्यंत कानापलीकडे जमिनीवर वृक्षाकडे पहा असंख्य जीव या अंतराळात धरतीवर आहेत . सगळ्यांना कान आहेत सगळ्यांना धारण करते सगळ्यांना विवरण करते ,जगज्जोती स्वत:ला राखते दास म्हणतात म्हणजे समर्थ म्हणतात की हा दास सौख्य राशीत आनंदात आहे .

२६ आदिशक्ती

जगदात्मा जगदेश्वरी | परमात्मा परमेश्वरी |
उमा लक्ष्मी गाईत्री | सावित्री ते ईंद्रायीणी ||१ ||
अहिल्या द्रौपदी सीता | तारा मंदोदरी दरी |
दमंती दुसरी तारा | गंगा भागीरथी उखा || २ ||
नाना प्रकृतीची नामे | पुलोमा रेणुका उखा |
स्वर्गस्ता किनारी कोपी | गन्धर्वी गायनी कळा || ३ ||
देव रुसी मुनी योगी | ज्ञानीभक्त बहुविधा |
नारदू तुंबरादिक | धृव प्रल्हाद आंबॠषी || ४ ||
उपमन्या अन्य नामे | भक्त मुक्त माहां तपी |
सर्व संग परीत्यागी | आगमी अघोरी हटी || ५ ||
दंडधारी जटाधारी | आघारी भस्मलेपनी |
विलेपने सुगंधे नाना | अष्टभोग विलासती|| ६ ||
सारंग नौरंग नाना | मानामाने स्वरास्वरे |
ताळ प्रबंदाचे गाणे | नाचणे वाद्य सर्वही || ७ ||
सिद्धची सर्वही आहे | उमा रमा विलसती|
पूजिती तुळजामाता | सदा आनंद गोंधळी || ८ ||
त्रैलोक्य पुजनासाठी | वाढती मोडती किती|
राम वर्दायीनी माता | हे माझी कुलस्वामिनी || ९ ||
पाळितो सर्वही क्षेत्रे | बंधू तो क्षेत्रपाल हा |
विखार चीर्डीले सर्वै | कालसर्प परोपरी || १० ||
आदिशक्ती जगाची आत्मा ,ती जगदेश्वरी आहे ,या जगाची ईश्वरी ,जगाला सांभाळणारी आहे .शंकराची पत्नी उमा ,विष्णू पत्नी लक्ष्मी ,गायत्री ,ब्रहमदेवांची पत्नी सावित्री ,ते ईंद्राची पत्नी ईंद्राणी ही सर्व आदिशाक्तीचीच नावे .
अहिल्या ,द्रौपदी सीता ,तारा मंदोदरी ,गंगा ,भागीरथी ,उखा [उषा ] जी श्रीकृष्णाची नातसून आहे ती सुध्दा आदिशक्तीचीच रूपे आहेत .प्रकृतीची अनेक नावे आहेत .पुलोमा ,रेणुका ,उषा ,स्वर्गातील गंधर्व ,किन्नर ,गायनी कला ,हे सर्व ही आदिशक्तीचीच रूपे आहेत .अनेक देव ऋषी मुनी योगी ज्ञानी भक्त नारद ,तुंबर धृव प्रल्हाद आंबऋषी उपमन्यू अशी अनेक नामे भक्त मुक्त महा तपस्वी ,सर्व संग परित्याग करणारे ,शाक्तपंथीय विद्या ,अघोरी विद्या हट्टी आग्रही दंडधारी ,जटाधारी ,भयंकर दिसणारे ,भस्म विलेपन करणारे ,अनेक सुगंधांनी विलेपन करणारे ,अष्टभोग भोगणारे सर्वच आदिशाक्तीचीच रूपे आहेत . सारंग [संगीतातील एक राग ] नवरंग ,मान माने स्वर ,संगीतातील ताल [ताळ ] ,गीत प्रकार [प्रबंद ] त्याचे गाणे ,नाचणे ,वाद्य ,हे सर्व आदिशाक्तीचेच रूप आहे .सिद्ध सर्व आहे ,उमा ,रमा शोभून दिसतात .ही सर्व आदिशाक्तीचीच रूपे आहेत .हे सर्व तुळजा मातेची पूजा करतात .गोंधळी तर तुळजा मातेचा महिमा सांगताना गोंधळी तर आनंद च वाटतात .त्रैलोक्य पूजनासाठी कितीतरी ब्रह्मांडे वाढतात ,मोडतात .ही माझी रामवरदायिनी माता आहे .ही माझी कुलस्वामिनी आहे .या कुलस्वामिनी चा बंधू जो क्षेत्रपाल आहे ,तो सर्व क्षेत्रांचे पालन करतो .[विखार ] विष ,जे कालसर्प सोडतो त्या विषापासून सर्वांचे रक्षण करते .