सोमवार, 27 जनवरी 2014

तुळजाभवानी स्तोत्र

प्रपंची आमुचे कुळी तुळजा कुळदेवता |
नेणता ऐकले होते जाणतां स्मरले मनी || १ ||
श्रेष्ठाची कामना होती पुरविली मनकामना |
नवस जो नवसिला होता तो त्यापासोन चुकला || २ ||
पुत्र जो  घेतला त्यांचा जोगी करून सोडीला |
ख्याती ते ऐकिली मोठी न्यायनीती चुकेचना || ३ ||
वैराग्य घेतले पूर्ण सर्व संसार सोडीला |
तुझिया दर्शना आळो कृपादृष्टी विलोकीजे || ४ ||
तुझ्या कृपे वाचलो हे महंत म्हणती तया |
तुझेची सर्वही देणे सर्वही तुजपासुनी || ५ ||
संसारी मोकळे केले आनंदी ठाव दिधला |
सांडिली सर्वही चिंता माता तू सत्य जाहले || ६ ||
पूर्वील काय मी सांगू इच्छा पूर्ण परोपरी |
मागील आठवेना की आश्चर्य वाटते मनी || ७ ||
सदानंदी उदय जाला सुख संतोष पावलो |
पर आधीनता गेली सत्ता उदंड चालली || ८ ||
उदंड ऐकिले होते रामासी वरू दिधला |
दास मी रघुनाथाचा मज ही वरदायिनी || ९ ||
श्रेष्ठांचा नवस जो होता फेडिला तोचि मी म्हणे |
पुष्प देऊनी उतराई ऐसे हे कल्पिले मनी || १० ||
तुळजापूर टाकोनी चालिली पश्चिमेकडे |
पाराघाटी जगन्माता सध्या येउनी राहिली || ११ ||
ऐसे हे ऐकिले होते एथेची पातले |
पुष्पाची कल्पना होती पुष्प तेथेची वाहिले || १२ ||
ऐशी दयाळू माता तू त्वां हे पुष्प घेतले  |
संतुष्ट भक्तीभावाने त्रैलोक्यजननी पहा || १३ ||
थोड्याने श्लाघ्यता मोठी थोर संतोष पावलो |
तुझेची तुजला दिल्हे आणिले सांग कोठुनी || १४  ||
रक्षिता देव देवांचा त्यांचा ईच्छला |
संकटे वारिली नाना रक्षिला बहुतापरी || १५ ||
जीवीचे जाणती माता तू माता मज रोकडी |
लोकांची चुकती माता अचूक जननी मला || १६ ||
एकाची मागणे आता द्यावे ते मज कारणे |
तुझाची वाढवी राजा सीघ्र आम्हांसी देखता || १७ ||
दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकिले |
परंतू रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी || १८ ||
देवांची राहिली सत्वे तू सत्व पाहीसी किती |
भक्तांसी वाढती वेगी ईच्छा पूर्णचि ते करी || १९ ||
रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे |
क्षमावे तुळजे माते ईच्छा पूर्ण परोपरी || २० ||


या प्रपंचात आमची कुळदेवता तुळजाभवानी आहे असे मी लहान असताना ऐकले होते .जाणता झाल्यावर आता त्याचे स्मरण झाले .मोठ्या माणसांची म्हणजे आईची ईच्छा होती की पुत्र व्हावा म्हणून मातापूरच्या देवीला नवस केला होता की सुवर्ण पुष्प वाहीन .तो  त्यांच्या हातून फिटला नाही .म्हणून देवीने त्याचे स्मरण अंगावर नायटा उठवून दिले .पण मातापूर पर्यंत कोण जाणार ? तेव्हा वेणू बाईंनी प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या देवीजवळ जाऊन नवस फेडावा असे सुचवले .समर्थांनी एक तोळा सोन्याचे सुवर्ण पुष्प तयार करून घेतले .ते पुष्प कुठे वाहावे असा प्रश्न समर्थांना पडला कारण देवी दागिन्यांनी मढलेली होती .तेव्हा मस्तकावरील बिंदी बाजूला सारून तेथे पुष्प वाहावे असे देवीने सुचवले .समर्थांना देवीने वर मागण्यास सांगितले .तेव्हा समर्थांनी उत्तर दिले मी एक जोगी आहे .मला काही नको .जे द्यायचे आहे ते शिवबाला दे .मी संपूर्ण वैराग्य धारण केले आहे .तुझ्या दर्शनाला आलो आहे. माझ्यावर कृपादृष्टी ठेव .तुझ्यामुळेच मी आज जो आहे तो आणि तसा आहे .तू मला संसारातून मोकळे केलेस .मला आनंदाचा ठाव ठिकाणा मिळाला . सगळ्या चिंता नाहीशा झाल्या ही गोष्ट खरोखरच झाली आहे .
आनंदाचा उदय झाला .,सुख संतोष मिळाला .पारतंत्र्य गेले उदंड सत्ता मिळाली .
मी ऐकले होते की तू श्रीरामांना वर दिलास. मी रघुनाथाचा दास आहे .तू मलाही वरदायिनी झालीस .मोठ्यांनी केलेला नवस आज फेडला .पुष्प देऊन उतराई व्हावे अशी मनीची आस होती .
तुळजापूरवर अफझल खानाने हल्ला करून मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून पश्चिमेकडे माता पारघाटला जगन्माता येऊन राहिली आहे असे ऐकले होते कारण मूर्ती वाचवण्याचा लोकांचा हेतू सफल झाला होता .
अशी तू दयाळू माता आहेस .तू हे पुष्प घेतलेस .तुझेच तुला मी दिले .मी कोठून आणणार ? अशा ह्या दयाळू त्रैलोक्यजननी कडे पहा .देवांचा देव तो सर्व देवांचा रक्षणकर्ता आहे .त्या प्रभू श्रीरामांचा उत्सव करण्याची ईच्छा केली .अनेक संकटे आली पण त्यांचे निवारण केले ,अनेक प्रकारे रक्षण केलेस .हे माता ,आपण माझ्या जीवीचे जाणता .मला सहज प्राप्त झालीस .माझे आता एकच मागणे आहे ,तू शिवबा राजांना मोठा कर .तू मागे दुष्टांचा संहार केलास असे ऐकले होते आता तू तुझे सामर्थ्य प्रत्यक्ष दाखव .हे माते आता अंत पाहू नको .भक्तांची इच्छा लवकर पूर्ण कर रामदास म्हणतात माझे सर्व बोलणे मनापासून आहे .म्हणून हे तुळजामाते ,माझी इच्छा पूर्ण कर .