शुक्रवार, 24 मई 2013

फूट योग समास

फूट योग समास
नाना पदार्थ नाना काया | ते ते जगदेश्वराची माया |
मूळ मायेपासोनिया | खाणी परियेत || १||
पंचभूते तिनी गुण | अष्टधा प्रकृती हे खूण |
नाना पदार्थ दृष्यची संपूर्ण | माया जगदीशाची || २||
अवघी माया जगदीशाची | त्यामध्ये कांही एक जीवाची |
ऐसी रोकडी प्रचीतीची | गोष्ट आहे || ३ ||
मायेबाप बंधू बहिणी | कन्यापुत्र आणि नाती |
त्याची माया अंत:करणी | जीवासी आहे || ४ ||
सेतामळे वाडे घरे | संग्रही मनुष्य लहान थोरे |
धनधान्य नानाप्रकारे | माया जीवाची || ५ ||
नाना वस्त्रे अलंकार भूषणे | नाना पदार्थ मेळवीणे |
नाना पदार्थ कोणे | किती म्हणोन सांगावे || ६ ||
ऐसी हे माया जीवाची | अवघी माया जगदीशाची |
हे अनादी परी मिथ्याची | जाणोन घ्यावी || ७ ||
शास्वतपणे अनादी ब्रहम | नासिवंतपणे अनादी भ्रम |
अवघेची अनादी वर्म | कळले पाहिजे || ८ ||
पूर्ण अपूर्ण व्यापक संधी | तैसेची नाना जिनस अनादी |
निश्चळ करुनिया बुद्धी | शोधुनी पाहावे || ९ ||
स्मार्थ भागवत दोनी भेद | यासी म्हणिजे अनादी सिध |
नाना अनादी सीध विषद | करून घ्यावे || १० ||
स्मार्थ म्हणिजे सिवभक्त | भागवत म्हणिजे  विष्णूभक्त |
त्याहीमध्ये युक्तायुक्त | विचारणां आहे || ११ ||
महादेवाचे कैसे रूप | विष्णूचे कैसे स्वरूप |
रूप विवरायाचा साक्षेप | आधीं करावा || १२ ||
मुळीं संकल्प उठीला | हरी संकल्प म्हणिजे तयाला |
तोची हरी समजला | पाहिजे मुळी || १३ ||
परमार्थासी पाहिजे सत्वगुण | तेथे कामा नये तमोगुण |
आदी पशात विवरण | केले पाहिजे || १४ ||
हरी संकल्प षडगुण ईश्वर | याचा बरा पाहावा विचार |
सुक्षमंद दृष्टीने अंतर | कांहीच नाही || १५ ||
सृष्टीमध्ये उदंड भेद | त्या भेदास म्हणो नये अभेद |
या कारणे मुळीचा संवाद | केला पाहिजे || १६ ||
जगदीश्वर ,जगाचा ईश्वर त्याची माया म्हणजे सृष्टीत उत्पन्न झालेले नाना पदार्थ आणि नाना प्रकारच्या जीवयोनी ,त्यांनी धारण केलेले  देह .जगदेश्वराच्या मूळ संकल्पानेच म्हणजे मी एक आहे ,बहु व्हावे या संकल्पाने मूळमाया निर्माण झाली ..त्यातून सत्व ,रज तम हे त्रिगुण निर्माण करणारी गुणमाया ,त्यापासून अष्टधा प्रकृती ,त्यापासून चार खाणी [उद्भिज ,स्वेदज , अंडज ,जारज ] निर्माण झाल्या .त्रिगुणांतील तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली .ही पंचमहाभूते व त्रिगुणांपासून अष्टधा प्रकृती व त्यापासून वेगवेगळे पदार्थ आणि संपूर्ण दृश्य विश्व निर्माण झाले .हे दृश्य विश्व म्हणजेच त्या जगदीश्वराची मायाच .
जगदीश्वराची माया खूप व्यापक आहे .ती सर्वत्र आहे .त्यात जीवाची माया येते .जीव म्हणजे त्या परमात्मा परब्रह्माचा अंश जो  प्रत्येक देहात असतो ,त्या देहाला चालवतो .त्या देहाकडून सर्व कर्मे करवून घेतो .ही रोकडी प्रचीती रोजच्या जीवनातही आपल्याला येतेच .
आई वडील ,भाऊ ,बहिणी ,कन्या ,पुत्र ,नातवंड या सर्वांबद्दल प्रेम जीवाला असते .
शेत मळे ,वाडे ,घरे ,लहान थोर माणसे ,धनधान्य ,हे सगळे साठवणे जीवाच्या मायेनेच घडते . जीवाला या सगळ्यांचे प्रेम असते ,माया असते ,.त्यांच्या प्रेमापोटी अनेक प्रकारची वस्त्रे ,अलंकार ,भूषणे ,यांचा संग्रह माणूस करतो .
अशी ही जीवाची माया आणि जगदीशाची माया जाणावी असे समर्थ सांगतात .ही माया अनादी म्हणजे प्राचीन आहे परंतु मिथ्या आहे कारण हे दृश्य विश्वच माया निर्मित आहे .त्यातल्या वस्तू  मिथ्या आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित असणारे प्रेमही मिथ्या आहे .पण माणूस हे सर्व सत्य आहे असे धरून चालतो .आणि चुकतो .
प्राचीन ब्रहम शाश्वतपणे आहे आणि प्राचीन भ्रम नाशिवंत पणे आहे .ब्रहम प्राचीन आहे म्हणजे ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी हे होते .आत्ता ही आहे ,सृष्टी चा अंत झाला तरीही राहील म्हणजेच ते अनादी आहेत .भ्रम सुध्द्दा अनादी आहे भ्रम आहे मी देह आहे याचा .त्यामुळेच देहावर ,स्थावर जंगमावर माणसाचे प्रेम आहे .पूर्ण ब्रहम
,अपूर्ण विश्व तसेच हे विश्व ज्यापासून निर्माण झाले ते सर्व अनादी म्हणजे प्राचीन आहे हे सर्व निश्चळ बुद्धीने समजावून घ्यावे .
शिव भक्तांना स्मार्थ म्हणतात .तर विष्णू भक्तांना भागवत म्हणतात .त्यात कोण योग्य कोण अयोग्य ह्याचा विचार करावा महादेवाचे रुप्प कसे आहे ,आणि विष्णूचे स्वरूप कसे आहे ते ओळखायला हवे .त्या रूपाचे विवरण करण्यासाठी आधी साक्षेप म्हणजे प्रयत्न करायला हवा .पराब्र्ह्मामध्ये जो मूळ संकल्प मी एकटा आहे ,अनेक व्हावे असा मूळ संकल्प उठला त्यालाच हरिसंकल्प म्हणतात .त्यालाच हरी  समजायला हवे असे समर्थ म्हणतात .परमार्थाला सत्वगुण असायला हवा .तमोगुण नको .हरी संकल्प  म्हणजे षड्गुण ईश्वर .यश ,श्री ,औदार्य ,ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सहा गुणांनी युक्त असणारा ईश्वर याचा विचार करावा .षड्गुनैश्व्र्र ईश्वर आणि हरिसंकल्प एकच आहेत ..समर्थ सांगतात की या सृष्टीमध्ये अनेक भेद आहेत . भेद उपाधीरूप आहेत ,८४ लक्ष जीव योनी आहेत .माणसात उच्च नीच ,काळे गोरे ,स्त्री पुरुष असे अनेक भेद आहेत .हे भेद आहेत पण त्यांच्यात आत्मा एकच आहे आत्मा त्या परब्रह्म परम तत्वाचा अंश आहे ,फरक आहेत पण एकच आहेत असे म्हणू नये त्यांचे अधिष्ठान जरी एकच असले तरी त्यांच्यात भेद आहे .त्यासाठी मुळापासून विचार करायला हवा .

कर्ममार्ग उपासना | वैष्णवांमध्ये विशेष जाण |
तार्किक विचार आंतकर्ण | बरा जाणावा || १७ ||
भेदास म्हणता अभेद | तेणे उदंड उडे खेद |
भेदाभेद हा विशद | मुळी होतो || १८ ||
सुक्ष्म सांडोनी गलबला केला | व्यर्थची खेद वाढविला |
साधक मनने सेवटासी केला | तोचि धन्य || १९ ||
निर्गुण ब्रहम मुळी तेथे | उडोनी जाती नाना मते |
तत्वझाडा प्रत्ययाते | आणून पहावा || २० ||
आईकोनी च विस्वास धरणे | हे मूर्खपणाची लक्षणे |
समजोनी प्रत्यये पाहाणे | हे उत्तमोत्तम || २१ ||
अबध मेळवोनी वाचिले | अक्षरे जुळीता पुरे जाले |
 अर्थांतर राहत गेले | सकळ काही || २२ ||
आंधी ग्रंथची चुको नये | मग वाचिता चुको नये |
त्या उपरी चुको नये | अर्थांतर प्रत्ययाचे || २३ ||
मुख्य प्रत्यये चुकत गेला | म्हणिजे निशेश बुडाला |
साधक समाधान पावला | कोण्याप्रकारे || २४ ||
जेथे नाही मुख्य प्रत्ययोग | जेथे कैसा असेल जयो |
वीतरेक  आणि अन्वयो |शोधूनी पाहावा || २५ ||
विवेक प्रलये शोधूनी पाहिले | तो तत्वे अवघे गेले |
या उपरी जे निर्गुण  उरले | त्यासी अनादी म्हणावे || २६ ||
अनादी म्हणिजे जे आदी नाही | परब्रह्मासी सीमा नाही |
सीमा वोलांडावी काही | अनादी म्हणावे || २७ ||
आत्मा म्हणिजे तत्वात आला | पंचीकर्ण प्रमई बोलिला |
चौथा देह निमाला | ब्रह्मांडींचा || २८ ||
त्या देहास होतो नाश | परब्रह्म ते अविनाश |
कोण विशेषा अविशेश | पाहोन घावे || २९ ||
येथे निवडिले सारासार | लक्षास पाहावा विचार |
येथून पुढे निरांतर | सहजचि जाले || ३० ||
पिंडीचा आत्मा निघोन जातो | म्हणोनि हा पिंड पडतो |
ब्र्ह्मांडीचा कैसा राहातो | सांगा ना का || ३१ ||
बरे हे त्या जाण त्याचे वर्म | नेणत्याचे खोटे कर्म |
सकळ काही धर्माधर्म | जाणतां जाणे || ३२ ||
|| इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना अनादी निरुपण नाम समास पहिला ||

वैष्णवात कर्ममार्ग आणि उपासना वैष्णवांमध्ये मुख्यत्वे चालते .उपाधी नुसार होणारे भेद अधिष्ठान एक असून ही अभेद होत नाही एक सारखे होत नाही जर एकच मानले तर खेद होतो सूक्ष्म सोडून जर गलबला केला ,गडबड केली तर खेद वाढतो .त्यासाठी साधकाला मनन करावे लागते .तरच त्याला शेवटाला पोहोचता येते .तरच निर्गुण निराकार परब्रह्मा पर्यंत पोहोचता येते .तत्वझाडा करत गेले की त्या परब्रह्माचा प्रत्यय  येतो ..नुसते ऐकून विश्वास करणे हे मूर्खाचे लक्षण आहे .म्हणून समजून घेऊन प्रत्यय घेतला तर ते उत्तमोत्तम आहे .अबध म्हणजे विस्कळीत ,विखुरलेला मिळवून वाचले ,अक्षर जुळवून वाचले तर असे वाटते की खूप झाले .पण तेव्हा अर्थ कळत नाही .
आधी ग्रंथ हाती घ्यावा .ग्रंथ वाचताना चुकू नये . त्याशिवाय अर्थ समजून घेण्यास चुकू नये .पण ब-याच वेळा प्रत्यय घेत नाही .तेव्हा माणूस पूर्ण बुडतो .मग साधकाला समाधान कसे मिळेल .?   
त्यासाठी विवेक प्रलय करायला समर्थ सांगतात .आपल्याला दृश्य विश्व खरे वाटते .पण विवेकाने दृश्य विश्व खरे नाही हे पटते त्याला विवेकक प्रलय म्हणतात .पिंडामधील अहंतेचा मृत्यू प्रलय म्हणजे विवेक प्रलय .तोच समर्थांनी दासबोधात सांगितला आहे .विवेक प्रलयाने ह्या देहातील तत्वांचा निरास करता येतो .मग जे उरते ते अनादी अनंत परब्रह्मच असते .अनादी म्हणजे जे आदी नाही .परब्रह्मास ही सीमा नाही .त्यामुळे तो तत्वात बसत नाही .त्याला पंचीकर्ण समजावून सांगताना सांगता येतो .तो ब्रह्मांडाचा चौथा देह आहे .त्या ब्रह्मांडा च्या देहाचा नाश होतो .पण परब्रह्म अविनाशी आहे .मग ब्रह्मांड आणि परब्रह्म यात कोण विशेश आहे ते पाहून घ्यावे .मग आता सारासार विचार करावा .
पिंडाचा आत्मा निघून जातो .म्हणून पिंड पडतो .मग ब्रह्मांडाचा आत्मा कसा राहतो .हे  सर्व तू समजून घे .जर नेणता अज्ञानी राहशील तर ते चुकीचे होईल . जो जाणता असतो त्याला सर्व काही ,धर्म म्हणजे काय ,अधर्म म्हणजे काय ते कळते .