मंगलवार, 4 दिसंबर 2012

फूटयोग निरुपण



फूटयोग निरुपण


देहाचा भर्वसा नाही | वैभवाचा असेचिना |
देशकाळ वर्तमाने |सर्वही होत जातसे || १||
सांगती चालिले सर्वे | मागेपुढे हळूहळू |
 देखतां देखतां होते | कळता ण कळे कैसे || २ ||
देशोदेशीचे राजे | नाना श्रीमंत जाणावे |
किती आले किती गेले | कोण जाणे कळेचिना || ३||
संसार नेटका वाटे | सत्य नेमस्त आपुला |
 पाहातां पाहाता पुढे | कळतां कळता कळे || ४ ||
बोलता चालता जाते | सार आयुष्य वेचते |
कळेना भुलवी माया | माझे माझे वृथा वृथा || ५ ||
सोडिना सोडिना रे |कोण्हीही पाहातां जनी |
पुरता तूर्त चालावे | कोण्ही कोणी पुसो नये || ६ ||
असों हे चालते आता | माया हे चालते संवें |
धूर्त ते पावले खुणे | भ्रमिष्ट भुलली मनी || ७ ||
दिसते काय सांगावे | लोक जाती मरोनिया |
उपजले वाढले मेले | आले गेले किती किती || ८ ||
संसार नासका आहे | विटबे भलते सदा |
मन ते सांवरेना की | उभाउभी खडाखडी ||९ ||
यालागी मोकळी वृत्ती | आसीली पाहिजे सदां |
धन्य ते जाणते ज्ञानी | उदास गिरी कंदरे ||१० ||
अद्यापि या जनामध्ये | आरडा चिरडा निघे |
उदास वृत्तीचा योगी | न लिंपे असता जनी ||११ ||
||इति श्री फूटयोग निरुपण समास ||


या समासात समर्थांनी एकसुंदर विचार सांगितला आहे की ज्या देहाचा भरवसा नाही ,कारण हा देह नाशवंत आहे ,ज्या वैभवाचा भरवसा नाही कारण वैभव म्हणजे संपत्ती ,लक्ष्मी चंचळ आहे , ज्या देशाचा भरवसा नाही कारण जे उपजते ते नाश पावते ,जो काळ सतत बदलत असतो .आजचा वर्तमानकाळ उद्या भूतकाळ होतो हे सर्व नाशवंत आपण खरे ,टिकणारे मानतो .पण आज ना उद्या मागे पुढे हळू हळू ह्या सर्व गोष्टी नाश पावना-या असतात ,नाश पावतात .अनेक देशोदेशींचे राजे ,शूर ,बलवान ,वैभवसंपन्न असले तरी एक ना एक दिवस त्यांना काळाच्या पडद्याआड जावेच लागते .
आपल्या ला संसार नेटका वाटतो .सगळं कसं छान चालले आहे असे वाटते .परंतु पुढे पुढे कळते ,की खरा संसार कसा आहे ,नेटका आहे की फसवा आहे .आपण आपला सगळा वेळ बोलण्यात घालवतो .बोलणे ही खूप काही अर्थपूर्ण असते असे नाही .सगळे आयुष्य असेच जाते .कारण त्याच वेळी माया आपल्या बरोबर चालत असते .ती आपल्याला भुलवत असते .ती आपल्यामध्ये माझे माझे असे आपल्या मनी भ्रम निर्माण करते .हा माझा संसार ,माझी मुले ,माझी सगळी माणसे असा भ्रम निर्माण करते .
ह्या सर्व जनात जे धूर्त असतात ,जाणते असतात ,त्यांना मायेची ही करणी समजते .ते या मायेच्या बंधनात सांपडत नाहीत .ते  मायेच्या बंधनातून कसे सुटायचे ते जाणतात .अज्ञानी मात्र भ्रमिष्टासारखे मायेत अडकतात .दु:खी होतात ,सुख दु:खाच्या हिंदोळ्यात अडकतात ,सुख दु:खाचे झोके घेतात .हे सगळे बघितले  की लोक उपजत ,वाढतात ,मारतात .येतात जातात .जीवनाचे सार्थक न करताच आपला देहाचा त्याग करतात .पण मनाला सांवरत नाहीत मन या मोह्मायेतून बाजूला करण्याचा प्रयत्नही करत नाहीत .उलट समजते पण वळत नाही अशी त्यांची अवस्था असते .यावर उपाय म्हणजे मोकळी वृत्ती ठेवणे म्हणजे वृत्तींच्या मागे , प्रापंचिक विचारांच्या मागे न धावता त्या वृत्तींकडे त्रयस्थ पणे पाहणे ,असे पाहण्याची सवय लावून घेतली की त्या वृत्ती आपल्या मध्ये मुरतात
वृत्ती कडे पाहता वृत्ती आपणात चि मुरे | आपण चैतन्य मात्र केवळ परिपूर्ण उरे |
वृत्ती कडे त्रयस्थ पणे पाहिले की वृत्ती आपल्यात मुरतात म्हणजे ते विचाराचे तरंग योग्य की अयोग्य याचा निर्णय होतो आणि असे करता करता वृत्ती प्रमाणे कृती करणारा देह नसून करवून घेणारा आपल्यातला चैतन्य रुपी परमात्मा आहे हे कळते .असे ओळखणारे जाणते ,ज्ञानी उदासीन वृत्तीने राहतात ,गिरी कांदरात राहतात .सर्व वृत्तींपासून अलिप्त राह्तात .ते या मायेत लिप्त होत नाहीत .

गुरुवार, 29 नवंबर 2012

फूट योग समास



                               
                                 फूट योग समास 

नेणता जन्मती प्राणी | जाणता जन्म चुकती |
नेणता जन्म दरिद्री | जाणता भाग्य होतसे ||१||
जाणणे जाणत्यापाशी | नेणत्याला कैसे कळे |
सावधी  संग शोधावा | कळतां कळतां कळे ||२ ||
जाणणे नीती न्यायाचे | सत्य नेमस्त बोलणे |
येत्नाचा साक्षपी प्राणी | तो येक भाग्य मेळवी ||३ ||
बुधीने सर्वही होते | बुधी दाता नारायणु |
आधी तो आपला कीजे | लक्षुमी चरणी वसे ||४ ||
विष्णू तो  कोण तो कैसा | पाळीतो तो कवणेपरी |
त्रैलोक्य पाळकू येकू | धन्य लीळा न वर्णावे || ५ ||
देहाचा घेतल्या बुंधी | प्राणी मात्रासी वर्तवी |
कर्तुत्व दिसते डोळा | कर्ता कोठेची नाडळे ||६ ||
धन्य रेधान्य कर्ता तो | रंगरूप बहुगुणी |
केले ते पाहावे ना की | ऐकिले न वाचे कदा || ७ ||
कोण कोणें घटी कैसा | चालवी बोलवी पहा |
नाना विद्या कला युक्ती | स्वयें देवची जाणता ||८ ||
येकला पूर्वला कैसा | हेची येक अपूर्वता |
अनंत्भेद योनीचे | सांग भेद दाखवी ||९ ||
होय रे सूत्रधारी हा | नाना सूत्रे बहुविधे |
नाचवी खेळवी सर्वे | त्रैलोक्य सचराचरी || १० ||
तो देव वोळखा वा रे | लोक हो विसरू नका |
भक्त जो तोचि जाणावा | यदर्थी संशयो नसे ||११ ||
  ||इति श्री  फूट  योग समास ||
नेणता म्हणजे अज्ञानी त्याला जन्म येतो. जाणता म्हणजे  ज्ञानी तो जन्म मृत्युच्या चक्रातून सुटतो .त्याला  सुख दु:खाच्या यातनांतून सुटका मिळते .नेणत्याला म्हणजेच अज्ञानाला सुख दु:खाच्या यातना भोगाव्या लागतात म्हणून त्याला दरिद्री म्हटले आहे तर जाणता आत्मज्ञानी असल्यामुळे तो सुख दु:खाच्या पलीकडे गेलेला असतो .तो नित्य आनंद भोगत असतो . म्हणून तो भाग्य भोगतो असे म्हटले आहे .
जे जाणणे आहे ते जाणत्यापाशी आहे .जे ज्ञान आहे ते जाणत्या जवळ आहे .त्याच्या ज्ञानाचे स्वरूप नेणत्याला कळत नाही .म्हणून संग ,मैत्री करताना सावधपणे करावी .ज्ञानी नीती न्याय कसा असतो हे जाणतो .त्याचे बोलणेही सत्य व नेमस्त म्हणजे नेमके असते .त्याच्या जवळ केवळ नीती न्याय ,सत्य बोलणेच नसते तर तो त्याच्या कार्याच्या सिद्धीसाठी प्रयत्न करायलाही मागे पुढे पहात नाही .असा जाणताच भाग्य मिळवतो .
कोणतीही गोष्ट करताना आपण बुद्धीचा तर वापर करतोच पण एक लक्षात ठेवणे जरूर आहे की बुद्धिदाता नारायण च आहे .लक्ष्मी भगवान नारायणांचे पाय चेपत असते .म्हणजे नारायण जर आपल्याला प्रसन्न  असेल तर लक्ष्मी सुध्दा प्राप्त होईल .या नारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी विष्ण]] कसा आहे ,त्याचे स्वरूप काय आहे , स्वत: कसा आहे ह्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे ,विष्णू पालनकर्ता आहे .तो ह्यासृश्तीवरील जीव मात्रांचे पालन कसे करतो हे सुध्दा बघायला हवे अंत:करण म्हणजे विष्णू .,म्हणजे जाणीव .या जाणीवेने सर्व जीवांचे रक्षण होते जाणीवेने सर्व सजीव आपले उदरभरण करतात ,जाणिवेनेच धोक्याची घंटा त्याना ऐकू येते .स्वसंरक्षण करण्याची प्रेरणा मिळते लाजाळूची पाने नुसत्या स्पर्शाने मिटतात .जाणिवेनेच सर्प माणसाच्या चाहूलीने पळ काढतो .तर सर्पाच्या दिसण्याने माणूस  तेथून पळतो .असा सर्व सजीवांचा पालनकर्ता विष्णू आहे .त्रैलोक्याचा तो पालनकर्ता आहे .त्याच्या लीळा भागवतात खूप सुंदर वर्णन केल्या आहेत .
निरनिराळे देह त्याने निर्माण केले .तो त्या सर्व प्राणीमात्रांना चालवतो .त्याना जगण्यासाठी अन्न ,पिण्यासाठी पाणी ,देतो मनुष्य प्राण्यांना रहायला निवारा ,देहाला वस्त्र पुरवतो .हे सगळे त्याचे कर्तृत्व आपल्याला डोळ्याने दिसते पण  तो स्वत: मात्र दिसत नाही ही त्याची लीळा अगाध आहे .करून अकर्ता होतो .असा हा कर्ता खरोखरच धन्य आहे .
त्याची करणी कशी अगाध आहे पहा .त्याने केलेली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे .एक दुस-या सारखी नाही .तरीही तो ह्या सर्वाना चालवतो ,बोलावतो .त्याच्या कडून क्रिया करवून घेतो .
चौदा विद्या ,चौसष्ट कला आहेत .त्या त्याला माहीत आहेत .त्या त्याला एकट्याला माहीत आहेत ,त्याने या विश्वात त्याणे एकट्याने पुरवल्या आहेत ही खरोखरच अपूर्वाई ची गोष्ट आहे .चौ-याऐंशी लक्ष योनी मध्ये भेद दाखवत त्याना एकमेकांपासून वेगळे करतो आहे .ही सृष्टी नियमाने चालावी म्हणून त्याने केलेली सृष्टी रचना खरोखरच आश्चर्य चकित करणारी आहे .म्हणून च समर्थ त्याला सूत्रधार म्हणतात .या त्रेलोक्यातील  सर्व चराचर तो नाचवतो आहे ,खेळवतो आहे .जीवनात येणारी सुखदु:ख हा त्याचाच खेळ आहे .असा हा करून अकर्ता तोच खरा देव आहे ,त्याला ओळखा असे समर्थ सांगतात .त्या देवाला जो ओळखतो योच खरा भक्त आहे .यात संशय नाही

रविवार, 9 सितंबर 2012

नाम महिमा



नाम महिमा
नाम जपे चंद्रमौळी | नाम जपे वाल्हा कोळी |
नाम जपे हिमनगबाळी | हृदय समूळी वाहतसे || १ ||
नाम जपे अजामेळ | नाम जपे ध्रुवबाळ |
नाम जपे ते गोकुळ | आबालवृध्द सर्वहि || २||
नाम जपे अभिमन्यू | नाम जपे उपमन्यू |
नाम जपे तो ब्राह्मणु | पाहा दरिद्री सुदामा || ३ ||
नाम महिमा अगाध | नरनारी होती शुत्ध |
ठसावला पूर्ण बोध | रामदास अंतरी || ४ ||


नाम जपतसे धर्म |नाम जपतसे भीम |
तिजा अर्जुन उत्तम | नकुळ सहदेव पाचवा || १ ||
नाम जपतसे द्रौपदी | नामे यज्ञ जाली सित्धी |
नाम जपे ॠषीमांदी | नाम अनादी म्हणोनि || २||
नाम जपे ॠशीमेळी | नाम जपतसे बळी |
नाम प्रगट फणीकुळी | छंद सकळी लाविला || ३ ||
नाम जपाताती साधू | नामें झडे गर्वमदु |
नाम स्मरता आनंदू | न होय बोधू कल्पांतू || ४ ||
नाम आगळे सर्वात | नामे होय कृतकृत्य |
रामदास हा पुनीत | नामें करुनी जाहला || ५ ||




चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकर ,ते रामनाम जपतात .जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा हलाहल विष बाहेर आले .त्या विषाने समस्त जगाला धोका निर्माण झाला असता म्हणून श्रीशंकरांनी ते विष प्यायले .त्याने घशाला अतिशय दाह झाला .तो गंगा मस्तकी घेऊन ,नागाला गळ्याभोवती गुंढाळून ही थांबला नाही .म्हणून त्यांनी श्रीरामांच्या नामाचा जप सुरु केला आणि दाह थांबला .
वाल्ह्या कोळी लूटमार करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असे . एकदा नारद मुनी जंगलातून जाय असताना नारदांनी वाल्ह्या कोळ्याला त्याच्या पापाचा वाटा घ्यायला कोणी तयार आहे का ते विचारायला सांगितले .तेव्हा कोणीच त्याच्या पापाचा वाटा घ्यायला तयार नव्हते .तेव्हा वाल्याला पश्चात्ताप झाला व त्याने नारदांच्या उपदेशानुसार नाम  घ्यायला सुरुवात केली .त्याला राम म्हणता यायचे नाही म्हणून त्याने मरा मरा असे उरफाटे नाम घ्यायला सुरुवात केली .त्या नामात इतका दंग झाला की त्याच्यावर वारूळ तयार झालेले त्याला कळले नाही .वारूळ म्हणजे वाल्मिक .म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला .
हिमनगबाळी म्हणजे पार्वती ! तिला भगवान शंकरानी राम महिमा आवडीने सांगितला आणि ती नाम घेऊन तिने तिचे मन श्रीराम चरणी वाहिले .
अजामेळ एक विद्वान ब्राह्मण .पण तो वाहवत गेला .त्याची अधोगती झाली .त्याच्या धाकट्या मुलाचे नाव नारायण होते .मृत्यू समयी त्याच्या तोंडात नारायणाचे नाव होते त्यामुळे यमदूत त्याचे प्राण न्यायाला आल्यावर विष्णुदूत मध्ये पडले .यमदूतांना त्याचे प्राण हरण करता आले नाहीत .
ध्रुवाला त्याच्या वडीलांच्या मांडीवरून त्याच्या सावत्र आईने उठवले म्हणून ध्रुवान अढळपद मिळवण्यासाठी नारदांच्या उपदेशावरून नाम घ्यायला सुरुवात केली .परमेश्वर प्रसन्न झाला .त्याने ध्रुवाला अढळपद दिले .
गोकुळ तर कृष्णमयचं झाल होते .गोपिकांना सर्वत्र कृष्णच दिसत होता .त्या कृष्णाच्या लीला आठवत होत्या .त्याचे गुणगान गात होत्या .त्याचे नामात दंग होत होत्या .गोपींची भक्ती तर इतकी पराकोटीची होती की ज्ञान शिकवायला गेलेल्या उद्धावाला त्यांनी प्रेमभक्ती शिकवली .
अभिमन्यू तर श्रीकृष्णांच्या बहिणीचा म्हणजे सुभद्रेचा मुलगा .तो श्रीकृष्णांच्या तालमीत तयार झाला .त्यांचे नाम तो घेतच होता .
उपमन्यू वसिष्ठ कुळातला एक मंत्र द्रष्टा ॠषी. लहानपणी तो त्याच्या मामाबरोबर एकां यज्ञात गेला होता . तेथे त्याला उत्तम गायीचे दूध प्यायला मिळाले .घरी परत आल्यावर त्याने आईजवळ दुधासाठी हट्ट धरला .आईने त्याला पाण्यात पीठ कालवून दिले .पण ख-या दुधाची चव कळलेली असल्यामुळे ,उपमन्यू ते दूध प्यायला तयार होईना .तेव्हा आईने सांगितले की बाळा ,आपण दूध देण्याएतके श्रीमंत नाही आहोत .तू देवाकडे दूध माग ,,त्याने भगवान शंकरांना उग्र तप:स्चार्येने प्रसन्न करून घेतले .भगवान शंकरांनी त्याला क्षीरसागर च भेट दिला ..
श्रीकृष्णांचा गुरुबंधू सुदामा एक गरीब ब्राम्हण होता तो सतत श्रीकृष्णांचे स्मरण करत असे नाम जपत असे .सुदामा जेव्हा श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला आला तेव्हा एकां मूठभर पोह्याच्या बदल्यात श्रीकृष्णांनी त्याची नगरी सुवर्णमय केली .
असा हा नामाचा महिमा अगाध आहे .नामाने सर्व शुध्दता येते ,समर्थ म्हणतात राम्दासाने हा बोध पूर्ण ठसावला आहे .





आता महाभारतातील उदाहरणे समर्थ देतात .धर्म ,भीम ,अर्जुन ,नकुळ ,सहदेव द्रौपदी ,जी यज्ञांतून उत्पन्न झाली ,ते सर्व सतत भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करत असत .ॠषीगण ,बळीराजा सर्व नाम जपत .साधूही नाम जपतात .नामाने गर्व झडतो .नामाने आनंद होतो ,जो कल्पांत आला तरी नाहीसा होत नाही .म्हणूनच समर्थ म्हणतात नाम आगळे आहे ,वेगळे आहे .नामाने कृतकृत्य होते . रामदास नामाने पुनीत ,पवित्र झाला असेही समर्थ म्हणतात


सोमवार, 3 सितंबर 2012

नाम महिमा


नाम महिमा


नाम साराचेही सार | जपाताती थोर थोर |
व्यासादिक मुनेश्वर | नामें तरले भवसिंधू || १ ||
नाम चोखट चोखट | नामे तरले खटनट |
आणि नं लगे खटपट | वेदशास्त्र घोकावे || २ ||
नाम सोलीव सोलीव | जपूं इच्छिताती देव |
मृत्युलोकी जन्म व्हावे | तेणे तरुं भवसिंधू ||३||
नाम उत्तम उत्तम | नामे हरे भवभ्रम |
नामें तरले अधम | उच्चारिता वाचेसी ||४||
नाम ओंकाराचे मूळ |ऐसे कळाले समूळ |
म्हणोनिया सर्वकाळ | रामदास जपतसे ||५||


नाम अमोल्य अमोल्य | नामें नये दुजे तुल्य |
नाम कैवल्य कैवल्य | देव माल उत्धारीले || १||
नाम अगम्य अगोचर | नाम वेदासी आधार |
नाम जपे महेश्वर | ॠषी सुरवरादि करून ||२||
नाम गगनाहूनि वाड | नाम अमृताहूनी गोड |
नामें पुरे सर्व कोड | भवसांकडे दूर होय | |३||
नाम पृथ्वी परीस स्थूळ | खोली पुरे न पाताळ |
नाम ढिसाळ ढिसाळ | मेरू भासे ठेंगणा || ४ ||
नाम निर्मळ निर्मळ |नाम सोज्वळ सोज्वळ |
नाम केवळ केवळ | रामदास ध्यातसे || ५ || 



नाम साराचेही सार आहे .म्हणजे सर्व साधना पध्दतीत  सर्व सामान्यांना सहज शक्य असणारी साधना पध्दती म्हणजे नाम आहे नामाला एक नाम घेण्याशिवाय कोणतेही कष्ट पडत नाहीत .शारीरिक ,मानसिक ,पैशाने कोणत्याच प्रकारे कष्ट न पडता मोक्षाप्रत नाम नेते .या नामाचा महिमा मोठा आहे थोर थोर लोक ,धृव ,अजामेळ ,मीराबाई ,गोपी सर्व नामाने उद्धरून गेले .व्यासांसारखे मुनी सुध्दा नामाने हा संसार रूपी सागर तरून गेले .
नाम चोखट आहे.खरे आहे . त्या नामाने खटनट असलेले अज्ञानासारखे भक्त तरून गेले नाम घेतले की दुसरे काहीच करावे लागत नाही ,वेदशास्त्रांचा अभ्यासही करावा लागत नाही , विद्वत्ता लागत नाही .फक्त भक्तीभावाने नाम घ्यावे लागते .
नाम सोलीव आहे ,पवित्र आहे .ते देवांनाही जपावेसे वाटते .विश्वमाता पार्वतीला सुध्दा श्रीशंकर रामनामाचा महिमा सांगतात .मृत्युलोकी जन्म घेऊन नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा ,असे देवानाही वाटते .
नाम उत्तमच आहे कारण नामाने भवभ्रम नाहीसा होतो .भवभ्रम म्हणजे संसाराचा भ्रम ,मी देह हा भ्रम ,माझी मुले ,माझा व्यवसाय ,माझे घर हा सर्व भ्रम माणसाला असतो तो नाहीसा होतो .नामाने जसे भक्त तारून जातात ,तसे अधम ,दुष्ट सुध्दा तरून जातात .रावण रामाचा द्वेष करत होता  ,पण ध्यानी मनी त्याला रामच दिसत होता .कंसानेही भगवान श्रीकृष्णांची अशीच विरोधी भक्ती केली .तोही उद्धारून गेला .
नाम ओंकाराचे मूळ आहे .प्रथम ब्रह्माला अहं अशी स्फूर्ती झाली .त्या स्फुर्तीला आदिसंकल्प म्हणतात .हा आदिसंकल्प ज्ञानमय ,शक्तीमय ,आनंदमय अमूर्त ,नादमय असतो .त्यालाच उपनिषदे ओंकार किंवा प्रणव म्हणतात .त्यालाच साधूसंत नाम म्हणतात .म्हणून नाम ओंकाराचे मूळ आहे असे समर्थ म्हणतात .म्हणूनच समर्थ ते नाम सदा सर्व काळ जपत असतात .

नाम अमूल्य आहे त्याच्याशी दुस-या कोणत्याही साधनेची तुलना होऊ शकत नाही .ते कैवल्य आहे कैवल्य म्हणजे शुध्द परब्रह्म ! कारण नाम म्हणजे जो ब्रह्माचा आदिसंकल्प आहे ,त्यालाच संत नाम म्हणतात .त्यानेच मला उध्दारले आहे असे समर्थ म्हणतात
.नाम अगम्य आहे ,न कळण्यासारखे आहे .जे गोचर होण्यासारखे नाही ,ईंद्रीयांना कळण्यासारखे नाही .ते वेदांना आधार आहे .महेश्वर ,म्हणजेच शंकर नाम जपतात .ॠशी सूर [देव ] .नाम गगना पेक्षा मोठे आहे .नाम अमृताहून गोड आहे नामाने सर्व कोड पुरवले जाते भक्ताला हवे ते मिळते .परमेश्वर भक्तासाठी काहीही करायला तयार होतो .एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रुपाने पाणी भरतो ,,कबीरा घराचे शेले विणतो ,जनीचे दळण दळतो .नाम पृथ्वी प्रमाणे स्थूळ आहे पण ते इतके सूक्ष्म आहे की त्याची खोली पाताळापेक्षा ही खोल आहे .नाम ढिसूळ आहे मेरू पर्वतही  त्याच्या पुढे ठेंगणा वाटतो .नाम इतके निर्मळ आहे ,स्वच्छ आहे की ते नाम घेतले की चित्ताची मलीनता नाहीशी होते .मन शुध्द होते ,पवित्र होते ..त्यामुळेच समर्थांनी नामाला सोज्वळ म्हटले आहे .म्हणूनच केवळ नामच समर्थ रामदास ध्यानी घेतात .

शनिवार, 30 जून 2012

समर्थ वेण्णाबाई संवाद


समर्थ वेण्णाबाई संवाद
नमू वागेश्वरी शारदा सुंदरी |
श्रोता प्रश्न करी वक्तयासी ||१||
वक्तयासी पुसे जीव हा कवण |
शिष्याचे लक्षण सांगा स्वामी ||२||
सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा |
बोलिजे अनात्मा तपो कवण ||३||
कवण प्रपंच कोणे केला संच |
मागुता विसंच कोण करी ||४||
कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या |
कैसे आहे आद्याचे स्वरूप ||५||
स्वरूप ते माय कैची मूळमाया |
ईस चाळावया कोण आहे ||६||
आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य |
समाधान अन्य ते कवण ||७||
कवण जन्मला कोणा मृत्यू आला |
बध्द जाला तो कवण ||८||
कवण जाणता कोणाची ही सत्ता |
मोक्ष हा तत्वता कोण सांगा ||९||
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण |
पंचवीस  प्रेष्ण ऐसे केले ||१०||
वरील २५ प्रश्न वेण्णाबाईंनी समर्थांना विचारले व त्यांची उत्तरे समर्थांनी दिली टी अशी :
नमू वेदमाता नामू त्या अनंता  |
प्रश्न सांगो आता श्रोतयाचे ||१||
श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान |
जया सर्व ज्ञान तोचि शिव  ||२||
शिवपार आत्मा त्यापर परमात्मा  |
बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य ||३||
वाच्य हा प्रपंच माईक जाणावा |
घडामोडी देवापासूनिया ||४||




विषय अविद्या त्यालावी ते त्या विद्या |
निर्विकल्प आद्याचे स्वरूप ||५||
कल्पना हे माया तत्व मूळमाया |
यासी चाळाया चैतन्यापरी ||६||
नकार ते शून्य व्यापक चैतन्य |
ईश्वर अनन्य समाधान ||७||
जीव हा जन्मला जीवा मृत्यू  आला |
बद्धमुक्त झाला तोचि जीव ||८||
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता |
मोक्ष हा तत्वता ईश्वरची ||९||
ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण |
हेची ब्रह्मखूण दास म्हणे ||१०|||
दास म्हणे सर्व मायेचे करणे |
मिथ्यारूपे जाणे अनुभवे||११||
सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा |
उपेक्षू नको गुणवंता अनंता |रघुनायका मागणे हेची आता ||
धीरगंभीर आवाज कानावर पडला आणि वेण्णाबाईला वाटल प्रत्यक्ष मारुतीराय आले आहेत .तिला त्यांची शेपटी दिसली होती .तुंबा भरून दूध मागणा-या समर्थांना दूध मिळाले नाही . दुस-या दिवशी समर्थ पून्हा भिक्षा  मागायला आले ,तेव्हा वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत होत्या .समर्थांनी विचारले ,काय वाचतेस बाळ ? वेण्णा बाई म्हणाल्या ,महाराज एकनाथी भागवत वाचते . समर्थांनी विचारले ,जे वाचतेस ते कळते का ? वेण्णाबाई म्हणाल्या महाराज ,मनाच्या आकाशात शंकांचे तारे उगवतात ,पण कोणाला विचारू ?समर्थ म्हणाले ,तुला असलेल्या शंका मला विचार असे समर्थांनी सांगितल्यावर वेण्णाबाईंनी १० कडव्यात २५ प्रश्न विचारले .त्यांचे प्रश्न असे होते .१ जीव कोण ? २ शिवाचे लक्षण कोणते ? ३ आत्मा कसा असतो ? ४ परमात्मा कोण ?५  अनात्मा म्हणजे कोण ? ६ प्रपंच म्हणजे काय ? त्याचे स्वरूप कसे? ७ सृष्टी कोणी केली ? ८ विद्या म्हणजे काय ? ९ अविद्या म्हणजे काय ? १० परब्रह्माचे स्वरूप कसे आहे ? ११ माया कोणती ? १२ समाधानाचे स्वरूप कोणते ?कोण जन्म घेतो ? १३ मृत्यू कोणाला येतो ? १४ बध्द कोण ?१५ मुक्त कोण ? १६ ज्ञानी कोण ? १७ या जगात कोणाची सत्ता चालते ? १८ मोक्ष म्हणजे काय ? १९ सगुण ब्रह्म म्हणजे काय ? २० निर्गुण ब्रह्म म्हणजे काय ? २१ मूळमाया कशी असते ? २२तिच्यावर कोणाचे नियंत्रण कोणाचे  ? २३ शून्य कसे असते ? २४ चैतन्य कसे असते ? २५ समाधान कोणते ?


या २५ प्रश्नांची समर्थांनी उत्तरे दिली 
जीव  म्हणजे अज्ञान ,[जीव देहात रहातो ,तोच चैतन्य ,तेच प्राणतत्व ,तोच परब्रह्माचा अंश रुपाने देहात राहणारा असतो .तो देहबुद्धीने म्हणजे मी देह आहे या बुद्धीने बांधलेला असतो ,त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे भान नसते ,अज्ञानी अवस्थेत असतो ]
शिव म्हणजे शंकर. अविद्यागुणे बोलिजे जीव | माया गुणे बोलिजे शिव | प्रत्येक देहात असणारा आत्मा म्हणजे जीव .तोच आत्मा जेव्हा ब्रह्मांडाला व्यापतो तेव्हा त्याला शिव म्हणतात .जाणीव ,जगज्जोती या नावांनी सुध्दा तो ओळखता येतो त्याला सर्व ज्ञान असते . शिव म्हणजे ब्रह्मांडाला व्यापणारा ईश्वर ! एकच एक आत्मतत्व सगळीकडे भरून राहिलेले आहे असे जाणणे ,अनुभवणे म्हणजे सर्वद्न्यानी होणे ,शिव होणे .
आत्मा परमात्म वस्तूचा विचार करत असताना समर्थ तीन पाय-या सांगतात १ आपल्या देहात वास करणारा आत्मा २ सर्व विश्वात ,चराचरात वास करणारा अंतरात्मा  ३ विश्वाला पुरून उरणारा परमात्मा . तो स्वयंप्रकाशी असतो,शुध्द ,मुक्त असतो .आनंदस्वरूप असतो ,सर्वव्यापी असतो .शरीराला जिवंत ठेवणारी ,ईंद्रीयांना चेतना देणारी , मनोव्यापारांना प्रेरणा देणारी ,बुद्धीला विचार करायला लावणारी ,जीवपणे सुख दु:खे भोगणारी सतरावी जीवनकळा म्हणजे आत्मा .तोच देहात जीव व ब्रह्मांडात शिव म्हणून रहातो .तो साक्षीभावाने रहातो ,सर्व पहातो .
परमात्मा विश्वाला पुरून उरणारा ,विश्व ,ब्रह्मांड पिंड या सर्वांना व्यापून उरणारा ,त्यापलीकडे असणारा तो परमात्मा .तो आदि ,अनंत ,शाश्वत असतो .तेच आपले मूळ स्वरूप .तो निर्विकार ,निरावयव ,निर्गुण असतो .तेथपर्यंत पोहोचणे हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे
अनात्मा हा शब्द येथे परब्रह्म या अर्थाने आला आहे .म्हणून अनात्मा म्हणजे अनिर्वाच्य म्हटले आहे .माया अनादी आहे म्हणजे अनुर्वाच्य आहे .
प्रपंच म्हणजे पाचांच्या समुदायाचे नियंत्रण पंचज्ञानेंद्रीये ,पंचकर्मेंद्रिये ,पंच प्राण पांच विषय ,पांच तन्मात्रा ,अंत;करण पंचक या सर्वांचा समूह ,त्यांचे  केलेले नियंत्रण . हा प्रपंच ही खरा नसतो .तसेच आपण आपल्या कुटुंबाची जी देखभाल करतो , आपले कुटुंब ,व्यवसाय ,घर ,संपत्ती  यालाही आपण प्रपंच म्हणतो . हा प्रपंच माईक असतो ,म्हणजे अशाश्वत असतो .मायेनेच निर्माण होतो .मायेनेच नष्ट होतो .मायाच आपल्याला प्रपंच भोव-यात अडकवते .
सृष्टी कोणी केली ? परब्रह्माला जे स्फुरण झाले ,त्यातून मूळमाया झाली ,त्यातून गुण उत्पन्न झाले ,पंचमहाभूते निर्माण झाली .अष्टधा प्रकृती निर्माण जाहली .सृष्टी निर्माण झाली .

विद्या म्हणजे काय ? अविद्या म्हणजे अज्ञान ,अविद्येनेच पंचभूतात्मक दृश्य विश्व आपल्याला खरे वाटते ,म्हणजेच देहबुद्धी .मी म्हणजे देह असे वाटते .पण संत संगतीने जीवाची अविद्या कमी होते .
विद्या म्हणजे ज्ञान .ज्ञान असते आपल्या भोवती असलेल्या सृष्टीचे ,शाश्वत अशाश्वताचे ,जेथे नित्यानित्य विवेक असतो ,सारासार विचार असतो .
प्रपंचात पोट भरण्यासाठी जे ज्ञान उपयोगी पडते त्याला विद्या म्हणतात .
परब्रह्माचे स्वरूप निर्विकल्प असते .तेथे कल्पना पोहोचू शकत  नाही .
माया कोणती ? मूळमाया म्हणजे काय ? तिला कोण चालवते ?
आपल्या मनाला वाटणारे सुख दु:ख ,आपल्या मनात येणारे विचार ,आपल्याला होणारा आनंद ही सगळी माया असते .आपल्या मनात उत्पन्न होणारा काम ,क्रोध ,द्वेष, मत्सर ही सगळी मायेचीच रूपे आहेत .ती शाश्वत नसते .तिचा म्हणजे अज्ञानाचा पडदा असतो .तो रामभक्तीने दूर करता येतो .
मूळमाया म्हणजे परब्र्ह्माचीच शक्ती ती परब्रह्माशीच संलग्न असते .ती वायूरूप असते .तिच्यातूनच त्रिगुण ,पंचमहाभूते निर्माण होतात .अष्टधा प्रकृती निर्माण होते .तीच या विश्वाची उत्पत्ती करते .विश्वाची स्थिती व लय ही तिच्यामुळेच होते .
शून्यावस्था म्हणजे मायेचा निरास .माया खरी नाही हे कळते तेव्हा कांहीच उरत नाही  एखादी गोष्ट झाली की आपल्याला सामाधान होते ,पण ते सांगता येत नाही .जशी साखरेची गोडी सांगता येत नाही ,ती अनुभवावी लागते समाधान अनुभवावे लागते .
समाधान तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली देहबुद्धी सोडून ,मी पणा सोडून देउ ,ईश्वराशी अनन्य होऊ ,तेव्हाच समाधान मिळेल .
जन्म घेणे लागे वासनेच्या अंगी जन्म वासना घेते .जेव्हा माणूस मृत्यू पावतो तेव्हा माणसातली प्राणशक्ती देह सोडते ,त्याबरोबर सूक्ष्म देह शरीर सोडतो .तेव्हा वासना वायुरूपात शरीर सोडते व योग्य वेळेला नवीन शरीर धारण करते
प्रत्येक सगुण ,जे जन्माला आले,निर्माण झाले ते मृत्यू पावते .जो दारा व कांचन यांचा विचार करतो ,देहबुद्धीचा असतो तो बध्द असतो जो देहबुद्धी विसरून मी परमात्मस्वरूप आहे असे जाणतो तो मुक्त असतो .ज्ञानी असतो मुख्यत: श्रीगणेश ,जो त्या श्रीगणेशाशी अनन्य होतो ,त्याच्याशी एकरूप होतो तो ज्ञानी .
या जगात सत्ता चालते ती त्या परब्रह्माची ,म्हणजेच श्रीगणेशाची ,त्याच्या शक्तीची म्हणजे शारदेची .
जन्ममृत्यू पासूनि सुटला |या नाव जाणिजे मोक्ष जाला ||
जेची क्षणी अनुग्रह केला |तेचि क्षणी मोक्ष जाला ||
ज्याची जन्म मृत्यू पासून सुटका होते त्याला मोक्ष मिळाला असे म्हणता येते .ज्या क्षणी सद्गुरू सदशिष्याला अनुग्रह देतात त्या क्षणी मोक्ष मिळतो .
सगुण ब्रह्म म्हणजे श्रीराम ,श्रीकृष्ण या सारख्या देवतांच्या मूर्ती .त्यांच्यामध्ये आपण प्रत्यक्ष देवता शक्तीरूपाने अआहे असे मानतो तेव्हा ते सगुण ब्रह्म आहे अशी आपली भावना असते .पंढरीचा विठोबा आपण सगुण ब्रह्माच्या रूपात मानतो .त्या सगुणाच्या आधारि आपल्याला निर्गुण ब्रह्म प्राप्त करून घ्यायचे असते .निर्गुण जे निर्विकार ,निरावयव आहे ,निराकार आहे कल्पनातीत आहे ..या कल्पनातीतात मिळून जायचे असेल सद्गुरुसेवा ,बुद्धी आत्मबुद्धी कडे वळवणे ,मी कर्ता म्हणण्या ऐवजी राम कर्ता असा निश्चय करणे या गोष्टी कराव्या लागतात   
         
  




गुरुवार, 21 जून 2012

कल्याण स्वामींचे उत्तर


कल्याण स्वामींचे उत्तर
सुखरूप जाहलो स्वामी तुमचिया पादसेवे  |
कल्याण माझे जाले रंगलो सोहंभावे ||धृ ||
चित्त ही वृत्ती माझी चैतन्यी मुराली |
संतोष स्वात्मसुख अनुभव किल्ली दिल्ही |
निर्विकल्पी वास जाहला अनुभव बोलूं बोली |
विश्व हें नाही  अवघे श्रीराम स्वरूप पाही ||१||
कनक हे पूर्णपणी नगास ठाव कोठें |
चैतन्य मृत्तिका येसी वाया हे घटमठे |
नाही हा दृश्याभास अनुभव यैसा स्पष्ट |
पूर्ण ब्रह्म सनातन सद्गुरू  येकनिष्ठ ||२||
पावलो धालो देवा तुझिया सेवा बळे |
वेदांत श्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोले |
ते मी स्वयंभ जालो हे शब्द मावळले |
मी तू पण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले ||३||
रामविण वृत्ती माझी आणिक जाये कोठे |
जिकडे तिकडे पाहे श्रीराम माझा भेटे |
कल्याण म्हणे सकळ द्वैत्पण जेथे आटे |
रामदास स्वामी जईं आनंदघन भेटे ||४ ||
स्वामींच्या पादसेवेने मी सुखरूप झालो .मी सोहं भावाने रंगलो .मी तोच आहे या भावाने रंगून गेलो आहे .माझे कल्याण झाले .
माझ्या चित्त वृत्ती चैतन्याशी एकरूप झाल्या .मला आपण संतोष ,स्वात्म सुखाच्या  अनुभवाची किल्ली दिली .स्वात्म सुख म्हणजे आत्मस्वरूपी लीन कसे व्हायचे ते आपण मला शिकवलंत ..निर्विकाल्पचा वास जाहलो .निर्विकल्पात म्हणजे कल्पनाही करता येणार नाही अशा परब्र्ह्माशी लीन कसे व्हायचे ,त्याच्याशी एकरूप कसे व्हायचे ते शिकवले .त्यामुळे मी ब्रह्म पहायला गेलो आणि ब्रह्मची झालो .तिथे काय अनुभव आला ते सांगतो .महाराज ,हे दृश्य विश्व नाहीच ,तेथे सगळीकडे श्रीरामच मला दिसत आहेत .हे माझे अनुभवाचे बोल आहेत .  
हे केवळ कनक आहे ,सोने आहे पण तेथे दागिन्यांना वाव नाही .सर्व एकजिनसी ब्रह्मस्वरूप आहे त्यात भेद नाही .मातीचे घट मठ हे सुध्दा दिसत नाहीत .कारण सर्वत्र चैतन्य आहे .मला बाकी काही दिसत नाही ..नेहमी दिसणारे दृश्य दिसत नाही ,त्यांचा आभासही होत नाही ,कारण सर्वत्र रामरूप दिसते आहे .सनातन ,प्राचीन असणारे पूर्णब्रहम सर्वत्र आहे .याचे कारण सद्गुरुंवरची एकनिष्ठ असणे .सद्गुरूंच्या वचनावर असणारा विश्वास ! 
देवा ,गुरुराया तुमच्या सेवेने मी भरून पावलो .वेदांत ,श्रुती ज्याला निर्विकल्प बोलतात ,,कल्पनेच्या पलीकडील म्हणतात ,ते मी स्वत:च झालो असे शब्दच नाहीसे झाले कारण देव पहाया गेलो आणि देवची होऊनि ठेलो अशी अवस्था माझी झाली आहे .माझे सगळे मी तूपण नाहीसे झाले माझी देहबुद्धी नाहीशी झाली ,आत्मबुद्धी त तिचे परिवर्तन झाले .
रामेविण माझे विचार आणखीन कोठे जात नाही .माझा श्रीराम मला जिकडे तिकडे भेटतो .त्यामुळे कल्याण स्वामी म्हणतात जेथे मी तू पण आटते ,द्वैत नाहीसे होते ,तेथे महाराज आनंदघन परमात्म स्वरूप मला भेटतो