मंगलवार, 12 अक्तूबर 2010

शिवथर घळीची सवायी

काय वानू शिवथर ग्रामी । जेथे पातले समर्थ स्वामी ।
स्फुरणा लागी योग्य भूमी । देखोनिया स्थिरावले । । १
सवे लेखकू योगिराज । मायभूमीला चढला साज ।
निर्माण झाले ग्रंथराज । शोभे नामे दासबोध । । २
मनालागी केला बोध । आपला आपण घ्यावा शोध ।
आवरावा काम क्रोध । दीक्षा महान बोलले । । ३
गुरु कृपेचिने जाणे । पुण्य भूमीचे दर्शने ।
उल्हासिल्या अंत :करणे । सीता वंदी पुन : पुन : । । ४
या शिवथर घळीचे महत्त्व काय वर्णन करू ?इथे समर्थ रामदास येऊन राहिले .दासबोध हा ग्रंथ लिहिण्यासाठी स्फुरण होण्यासाठी निवांत ,सुंदर ,निसर्ग सौंदर्याने युक्त अशी योग्य भूमी त्यांना मीळाली .तेथे दासबोध ग्रंथाची रचना करण्याचे निश्चित केले .त्यांच्या बरोबर लेखनिक म्हणून कल्याण स्वामी दौत ,लेखणी घेऊन ग्रंथ लिहिण्यास तत्पर होते ।
दासबोध ग्रंथात समर्थांनी साधकांना मनाला बोध करायला सांगितले आहे .मी कोण आहे याचा शोध घेणे हे मानवी जन्माचे उत्तम ध्येय आहे .ते कसे साधायाचे तेही समर्थांनी या ग्रंथात सांगितले आहे .त्याची दीक्षाच समर्थांनी या ग्रंथात दिली आहे .कवयित्री सीता म्हणते की या पुण्य भूमीच्या दर्शनाने माझे अंत :करण आनंदित झाले आहे .मी पुन्हा पुन्हा या स्थानाला वंदन करते .