शनिवार, 11 मई 2013




लिहिता वाचिता येना | व्यासंग करितां नये |
जड संसार टाकेना | चालीला सर्व सांडूनी || १||
स्वदेश राहिला मागे | विदेश लागला पुढे |
आचार राखणे आधी | स्नान संध्या  हरिकथा || २ ||
अचूक शुध लिहावे | वाचावे नेटके |
साकल्य अर्थ सांगाया | येथा तथ्ये प्रचीतीने || ३ ||
बोलावे न्याय नीतीने | मर्यादा राखणे जनीं |
आभ्यास करावा आधी | ताळबंद पाठांतरे || ४ ||
प्रसंगमान जाणावे | बाणावे बहुतांपरी |
भक्तीभाव असों द्यावा | घालावा भार ईश्वरी || ५ ||
प्रत्यई मागणे भिक्षा | मिळाली न मिळे तरी |
नित्य नूतन हिंडावे | धुंडावे भक्त प्रेमळ || ६ ||
कथा ते करावी आधी | बाधी ते दुराशा नको |
उपाधी उतळावेना | जावे ना उपाधी वैभवाकडे || ७ ||
सर्वत्र लोक शोधावे | बोधावे भक्तीच्या गुणे |
राहावे दुर्बळाचेथे | देवालयी कां नदीतीरी || ८ ||
पर्वती उदकापासी | सनीधनी येकीकडे |
फार येकांत सेवावा | आभ्यास नित्य नुतनु || ९ ||
साहावी शीत उष्णादि | पाहावी रम्यसी स्थळे |
करावे आपण कष्ट | बांधावावी ते हळूहळू || १० ||
वोळखी कराव्या दाटा | येके गई थीरो नये |
वादवेवाद तो खोटा | दाटावा मद मछरू || ११ ||
उद्धट बोलणे खोटे | बोलावी ते मृदोतरें |
नेटकी पाहिजे दीक्षा | रक्षावी भक्ती आदरे || १२ ||
वर्णावी भक्ती देवाची | आदभूत बहुतांपरी |
प्रबंद जाड बोलावे | चालावे लोकमानसें || १३ ||

लिहीता वाचता येत नाही  ,व्यासंग ,अभ्यास करता येत नाही ,जड ,नश्वर असा संसार टाकता येत नाही ,त्यांचा लोभ मनात आहे ,सर्व सोडून चालला आहेस तेव्हा तू कसे वागावेस त्यांचा उपदेश मी करतो  आहे  असे समर्थ म्हणतात .स्वदेश सोडून आता दुस-या देशात म्हणजे दुस-या राज्यात चालला आहेस ,तू सर्वात प्रथम तुझा आचार ,तुझी वागणूक नीट ठेवायला हवीस .स्नान संध्या आणि हरिकथा सांगायला हवीस .अचूक शुध्द लिहायला हवेस .नीट नेटके वाचायला हवेस कारण तुला जे वाचणार आहेस त्यांचा प्रचीतीने अर्थ सांगता आला पाहिजे नीती न्यायाने बोलता येण्यासाठी तुझे ज्ञान तू वाढवायला हवेस .लोक तुला मानायला लागली ,की तू वाटेल तसा वागून चालणार नाही .मार्यादेनेच तुला वागायला हवे .योग्य तो अभ्यास करून ,पाठांतर करून बोलायला हवेस .
प्रसंग काय आहे ते लक्षात घेऊन बोलायला हवे ज्यामुळे तू अनेकांच्या मनात तुझे स्थान निर्माण करशील .जेव्हा तुझ्या मनात भक्तीभाव असेल ,ईश्वराचे अधिष्ठान असेल ,मी कर्ता असे न म्हणता राम कर्ता म्हणशील तेव्हाच तुझे लोकांच्या मनातले स्थान पक्के होईल ..मिळाली आणि मिळाली नाही तरी दररोज भिक्षा माग.दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जा .कुणी प्रेमळ भक्त मिळाले तर त्यांचा शोध घे . नित्य नूतन कथा कर .पण दुराशा मात्र ठेवू नकोस म्हणजे कथेतून धनाची प्राप्ती होईल अशी आशा मात्र ठेवू नकोस कारण महंताला अशी उपाधी ठेवणे बाधक होते .म्हणून उपाधी वैभवाकडे जाऊ नकोस .
सगळीकडे होतकरू लोक शोध .त्यांना भक्तीचा बोध कर .तुझ्या आचरणातून भक्तीचे आचरण कसे करायचे याचा बोध दे. दुर्बलाच्या घरी मुक्काम कर त्याची प्रगती कशी साधता येईल याचा विचार करून त्याला मार्गदर्शन कर .नाहीतर एखाद्या देवालयात किंवा नदीतीरी रहा .एकांतात पर्वतावर ,जळाच्या जवळ रहा .एकांतात राहून चाळणा कर .नित्य नूतन अभ्यास करावा .थंडी ,उन सहन करावे .रम्य ठिकाणे पाहून तेथे रहावे ..रम्य ठिकाणी आपण कष्ट करून नवीन जागा बांधाव्या . खूप ओळखी करून घ्याव्या .पण एकां ठिकाणी राहू नये .नित्य नूतन हिंडावे .वादविवाद करू नये .मद ,मत्सर दाबून टाकावा .उद्धटपणे बोलू नको .मृदू ,नम्र पणे बोल ..दीक्षा देताना नेमकी द्यावी .योग्य प्रकारे प्रबोधन करावे .सर्व गोष्टी करताना भक्ती तुझ्या कृतीतून ,विचारातून दिसावी पांडित्य पूर्ण गीत म्हणावे ,ज्यातून भक्ती प्रगट होईल .लोकांच्या मनाप्रमाणे कृती करावी .


भक्तीज्ञान असो द्यावे | शुध वैराग्य नेटके |
धरावी कीर्तीची द्वारे | तारावी  भाविके बहु || १४ ||
तगावे बहुतां गई | उपाधी नसता बरें |
सद्गुण सार ते द्यावे | नेद्यावे आवगुण ते ||१५ ||
भक्तीस लोक लावाचे |  पावावे पर् पार ते |
उपाधी पाहातां नाही | पाहों जाता उदंडहि || १६||
परंतु सर्व देवाचे | आपले काही नसे |
मनात वावरे देव | देव देव चहुकडे || १७ ||
अत्यंत साक्षपि व्हावे | न व्हावे आळसी कदा |
द्यावया देवाचा लाहो | जायांचे हे म्हणोनिया || १८ ||
मरोनी कीर्ती उरवावी | नुरावावी अपकीर्ती ती |
धन्य धन्य म्हणे लोकू | सक्रीया करितां बरी || १९ ||
पुण्यमार्ग प्रतिष्ठावा | लावावी धर्मवासना |
देवाळयें करावी मोठी | वापी कूप सरोवरे || २० ||
वाटिका वृक्ष लावावे | पुष्पे फळे परोपरी |
कपाटे वरवर टाकीं | भुयेरी विवरे गव्या || २१||
वृंदावने दीपमाळा |धर्मशाळा बहुविधा |
पाई-या वोव-या वोटे | धबकायात्रा हरिकथा || २२ ||
सावधु सकळांगई | न्यायनीती चळों नये |
सकळांसी सौख्य राखावे | वर्तावे ते मनोगते || २३ ||
वैभवे सर्व देवांची | वाद्ये छत्रे परोपरी |
किती म्हणोनि सांगावे | सांभाळावे परोपरी || २४ ||
दास्य ते करावे येसे | या मध्ये घडेल तसे |
देव तो कवी सर्वे | भावार्थ पाहिजे बरा || २५ ||
|| इति श्री फूट योग समास ||

भक्ती ज्ञान तुझ्याकडे असले पाहिजे वैराग्य खरे असावे .ते नैराश्यातून , स्मशान वैराग्य नसावे .खरे वैराग्य असावे .अशा शुध्द वैराग्यातून कीर्तीची दारे उघडतात .त्यातूनच भाविक घडवता येतात .उपाधी नसेल तर टिकून राहता येते .सर्व गुणांचे सार असणारे सद्गुण द्यावे सद्गुण व अवगुणांची लोकांना ओळख करून देउन सद्गुण  अंगी बाणल्यामुळे होणारे फायदेही लोकांना समजावून द्यावे .सद्गुणांच्या प्राप्तीतूनच भक्ती कशी  साकार होते ते आपल्यां आचरणाने लोकांना पटवून द्यावे .महंती एक उपाधीच आहे .पण पहायला गेले तर ती उपाधी नाही जर ती निरपेक्षपणे ते काम तू करशील तर .तू हे काम देवाचे आहे असे समजून केलेस तर ती उपाधी नाही .माझे समजून केलेस तर ती उपाधी आहे .
अत्यंत साक्षेपी म्हणजे प्रयत्न करणारे हवे .आळस कधी करू नये .देवाचा लाभ जर लोकांना करून द्यायचा असेल तर प्रयत्न तर करायलाच हवेत .असे प्रयत्न जर केलेस तर मारून सुध्दा तुझी कीर्ती राहील . आपल्या वागण्याने अपकीर्ती होऊ नये असेच वागावे .तर च लोक तुला धन्य धन्य म्हणतील .त्यासाठी पुण्यमार्ग अनुसरावा .धर्मवासना असू द्यावी .देवालायांचे महत्व वाढवावे . विहिरी ,सरोवरे  बांधावी .बागा तयार कराव्या .त्यात वेली ,व्रुक्ष लावावे ,वेगवेगळी फुलझाडे ,फळझाडे लावावी .वृंदावने ,दीपमाळा बांधाव्या .घाटांना पाय-या बांधाव्या .सर्व अंगांनी सावध असावे .चौफेर नजर असावी .न्याय नीती सोडू नये .सगळ्यांना सौख्य होईल असे वागावे ..सर्वानाचे मनोगत असेल त्याप्रमाणे वागावे .सर्व देवांचे वैभव सांभाळावे ,वाढवावे ,अशा प्रकारे दास्य करावे .