गुरुवार, 21 जून 2012
कल्याण स्वामींचे उत्तर
सोमवार, 7 मई 2012
समर्थ कल्याण संवाद
समर्थ कल्याण संवाद
समर्थ कल्याण संवाद
ऐक बा कल्याणा हित उपदेश |
प्राप्त जाहले रहस्य जे कां तूज ||१ ||
तेथे राही सदा न करी तत्वबोधा |
जनाचिया वादा न प्रवर्ते || 2||
श्रद्धावान पात्र जे भेटती तुज |
त्यांसी सांग गुज श्रीरामाची ||3||
देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी |
तयाचिये कानी स्वप्नी नको ||4||
नको त्या दुष्टासी स्वप्नी सांगू गोष्टी |
पडेल तुझी तुटी श्रीरामाशी ||5||
श्रीरामाशी तुज न हो वेगळीक |
मानावे स्वसुख योगस्थिती ||6||
योगस्थिती आता गुप्त आहे बापा |
नको सांगू अल्पा देह्बुध्दिते ||7||
देहबुद्धीचे प्राणी त्यासी भाषण न करी |
वाया हे वैखरी वेचूं नको ||8||
निमिष्यभरी होउं नको स्वरुपावेगळा |
अंतरशील रामाला जनायोगे ||9||
अनुभवी संताशी करी बा संवाद |
रामदासी बोधू कल्याणाते ||10||
समर्थ कल्याणाला सांगतात की ,कल्याणा ,मी तुझ्या हिताचा उपदेश करतो आहे ,तो ऐक .तुला जे रहस्य माहिती झाले आहे तेथेच तू रहा .लोकांच्या वादामध्ये तू पडू नकोस .
समर्थांनी कल्याण स्वामींना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता .त्यासाठी पुढील ओवीमध्ये समर्थ सूचना करतात : जो श्रध्दावान आहे ,त्याला श्रीरामांचे गुप्त रहस्य सांग .
पण ज्यांची देहबुद्धी वाढलेली असेल पण ज्यांना शब्दज्ञान आहे ,त्यांना काहीही सांगू नकोस कारण त्यांच्यावर खर्च केलेला वेळ वाया जाणारा आहे .तुझा श्रीरामांशी असलेला संपर्क तुटेल ..
श्रीरामाशी तुझी वेगळीक झाली नसताना तुला जे सुख मिळेल ते तू घालवू नकोस .ते तुझ्या साठी योगस्थिती असेल .योग म्हणजे एकत्र येणे .तू आणि श्रीराम यांच्यात जर ऐक्य झाले तर ती स्थिती तुझ्यासाठी असामान्य असेल ,अलौकिक असेल .ही योगस्थिती कोणाला सांगू नको ,कारण ती गुप्त आहे ,कोणाला न कळणारी आहे .सामान्यांना त्यांचा अनुभव न येणारी आहे .म्हणून देहबुद्धीच्या प्राण्यांशी तू बोलू ही नकोस .तुझे बोलणे वाया घालवू नकोस .
एक क्षणभर सुध्दा तू स्वरूपावेगळा होऊ नकोस .सतत सद्वस्तु च्या अनुसंधानात रहा .सद्वस्तूचाच निदिध्यास ठेव . त्याच्या विषयीच श्रवण कर ,त्याचेच मनन कर .असे केले नाहीस तर श्रीरामाला अंतरशील .त्याच्यासाठी काय कर ते तुला सांगतो ,
अनुभवी संताबरोबर संवाद कर सत्संग धरलास वासनांचा क्षय होईल .तू मोक्षाचा अधिकारी होशील .सत्संगाने तुझ्यात भाव भक्ती जागी होईल .सत्संगाने जे श्रवण करशील ते कृतीत आण .सर्वात हितकारी संवाद आहे उगमाचा उगम म्हणजे ब्रह्म ! परब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेचा उगम होतो .मायेचा प्रांत ओलांडून परब्रह्मा पर्यंत पोचायचे असते . हा ब्रह्मविचार गुरु शिष्य ,मुमुक्षु आणि अनुभवी संत यांच्यातच होतो ,ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे
मग तया बोधाचेनि माजे
नाचती संवादसुखाची भोजे
आता एकमेकां घेणे दीजे
बोधचि परी
असे हे गुरुशिष्य ,मुमुक्षु संत हे सर्व एकमेकांना फक्त ज्ञान च देतात ,त्यात दंभ ,अहंकार ,नसतो .तो वादविवादा पासून अलिप्त असतो .म्हणून हे कल्याणा ,तू फक्त संतांशीच संवाद कर .
गुरुवार, 12 अप्रैल 2012
अंतर्भाव समास ६
पूर्वी पडला जो अभ्यास | तोचि अंती निजध्यास |
म्हणोनिया सावकास | नित्यनेम करावा ||१६ ||
जयास ठाईचे न सवे | तयासी न लगे सांगावे |
म्हणोनिया नित्यनेम जीवे | विसंबू नये ||१७ ||
नित्यनेम पूर्वी कथिला | पून्हा पाहिजे सांगितला |
जो मागे निरोपिला | तोचि आता ||१८||
येकाग्र करोनिया मन | अंतरी करावे ध्यान |
सर्व सांग पूजाविधान | प्रत्यही करावे ||१९||
नित्य नेमिला जो जप | त्रिकाळ दर्शनी जो साक्षेप |
आदित्य मारुतीचे रूप | अवलोकावे ||२० ||
हरिकथा निरुपण |प्रत्ययी करावे श्रवण |
हे चि जाणावी खूण |नित्यनेमाची ||२१ ||
अशक्त होऊन प्राणी पडे | तेव्हा नित्य नेम न घडे |
तेणे बळेची नेमाकडे |चित्त द्यावे ||२२ ||
नित्य नेमाचा अभ्यास | नेम चुकता कासावीस |
तोचि लागे निजध्यास |अंतसमई ||२३ ||
अहा देव जप राहिला | मारुती नाही देखिला |
प्राणी योगभ्रष्ट जाला |निजध्यासे ||२४ ||
ऐसा नित्यनेम कैवाडे | मन लागे देवाकडे |
अंतकाळी बळेची घडे |निजध्यास ||२५ ||
वाचा खुंटता अंतर पडे | म्हणोनि अंतरीच जप घडे |
स्वामी आधीच सांकडे | फेडीत गेले ||२६ ||
जे वाल्मीकासी आधार |जे शतकोटीचे सार |
उमेसाहित शंकर |जपे जया ||२७||
जेणे धन्य कासीपुरी | प्राणीमात्रासी उद्धरी |
अंतकाळी पृथ्वीवरी |उच्चार ज्याचा ||२८ ||
तेचि अंतरी धरावे | तेणे चि संकटी तरावे |
कैळासनाथे सदाशिवे | उपाव केला ||२९||
तिस-या समासात समर्थांनी नित्यानेमात मानसपूजा ,जप ,ध्यान ,मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन ,हरिकथेचे श्रवण असे प्रकार सांगितले .नित्यनेम करताना सुरवातीला त्यांचा अभ्यास करावा लागतो .अभ्यास करता करता तो निजध्यास होतो .निजध्यासाची पुढची पायरी आहे आत्मसाक्षात्कार ! म्हणून समर्थ सांगतात की नित्यनेम कधीही मोडू नये .
येथे शिष्यांनी पून्हा नित्यनेमा बद्दल विचारले म्हणून समर्थ पून्हा नित्य नेमाबद्दल सांगतात .ते लक्ष देउन ऐका असे सांगतात .
एकाग्र मन करून अंतरात ध्यान करावे .यथासांग पूजा करावी .ज्या जपाचा नेहमीचा नियम आहे तो नेमाने करावा .मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन घ्यावे .हरिकथा निरुपण नेहमी श्रवण करावे .ह्या सर्व गोष्टी नित्य नेमात येतात असे समर्थ सांगतात .
जेव्हा माणूस अशक्त होऊन अंथरुणाला खीळतो ,तेव्हा नित्यनेम होत नाही .तेव्हा नित्यनेमाकडे बळेने लक्ष द्यावे .म्हणजे मानसपूजा करावी ,मनाने सूर्य व मारुतीचे त्रिकाळ दर्शन घ्यावे , जप तोंडाने करता आला नाही ,तर अंतरी जप करावा .म्हणजे नित्य नेम झाला नाही म्हणून कासाविसी येणार नाही .स्वामींच्या कृपेने ह्या सर्व संकटातून साधक पार पडेल .
जे नाम वाल्मिकींचे सार होते ,जे शतकोटी श्लोक असलेल्या रामायणाचे सार होते ,त्या रामनामाचा शंकर सुध्दा उमेसाहित जप करतात .त्याच रामनामाचा जप अंत काळी शंकर काशीक्षेत्रात माणसाच्या कानात सांगून त्यांचा उध्दार करतात .तेच रामनाम समर्थ अंतरी धरायला सांगतात ,कारण तेच रामनाम संकटातून तरून नेते .म्हणून कैलासपती शंकरांनी नाम काशीत मृत्यूमुखी पडणा-या माणसाच्या कानात सांगण्याचा उपाय केला .
शनिवार, 31 मार्च 2012
अंतर्भाव समास ६
समास ६
शिष्या परम गुह्य ज्ञान | जेणे घडे समाधान |
ऐसे मागे निवेदन | तुज केले ||१ ||
तेचि निरुपण |अभ्यांतरी क्लुप्त होता |
आशंकेसी सर्वथा | उरी नाही ||२ ||
आता असो प्रस्तुत | देहास मांडला अंत |
तेव्हा साधके निवांत |काय धरावे || ३ ||
निरावलंबी चित्त न्यावे | तरी ते राहीना स्वभावे |
आणि ऐक्याच्या नावे | शून्य जाले ||४ ||
निरावलंबीचे साधन | देह असला सावधान |
केले पाहिजे समाधान | संत संगे विवेके ||५ ||
अनुसंधान अंतकाळी | कैसे राहेल ते निर्मळी |
अनुसंधान्मिसे जवळी | मीपण उठे ||६ ||
एवं स्वरूपानुसंधान |अंतकाळी न घडे जाण |
आता करावे ध्यान | सगुण मूर्तीचे ||७ ||
ध्यानासी कारण चित्त | ते चित्त होय दुश्चित्त |
कैसे घडे सावचित्त |ध्यान अंती ||८ ||
आता करावे रामचिंतन | तरी वासना धरी पंचध्यान|
प्रपंची गुंतले मन | ते सुटले पाहिजे ||९ ||
पाडोनी कूपा भीतरी | प्राणी नाना विचार करी ||१० ||
तैसे मन हे गुंतले | वासना विषयी नेले |
वरि वरि नाम स्मरले | त्याचे कोण काज ||११ ||
तरी आता काय करावे |कोण्या उपावे तारावे |
ते चि आता स्वभावे |सांगिजेल ||१२ ||
दीनदयाळ गुरुराव | पूर्वीच सूचला उपाव |
अंती चळे अंतर्भाव | म्हणोनिया ||१३ ||
तरी त्या उपावाची खूण | केली पाहिजे श्रवण |
उपाव रचिला कोण |सद्गुरुनाथे ||१४ ||
ऐका उपायाचे वर्म |दृढ लाविला नित्यनेम |
हाची उपाय परम | अंतसमई ||१५ ||
शिष्या ,तुला मी गुह्य ज्ञान दिले ,तुला समाधान दिले .आता तुझा असा प्रश्न आहे की अंतसमयी साधकाने काय करावे ?ते आता सांगतो
समर्थ म्हणतात निरावलंबी चित्त न्यावे म्हणजे अवलंबन नसणारे जे परम गुह्य परब्रह्म त्याच्याकडे चित्त ठेवावे ..पण ते चित्त तेथे रहात नाही .चित्ताचे वस्तूशी ऐक्य रहात नाही .त्यासाठी देह सावधान असला पाहिजे .संत संग केला पाहिजे .संत संगातून ,श्रवणातून आशंका फिटतात .मन शांत होते ,चित्त समाधान पावते .
पून्हा शिष्य विचारतो ,’अंतकाळी निर्मळी ,म्हणजे परब्र्ह्माशी अनुसंधान कसे राहील ? कारण अनुसंधान करण्याच्या निमित्ताने मी पण वाढते .मग स्वरूपानुसंधान अंतकाळी घडत नाही मग आता काय करावे ? सगुण मूर्तीचे ध्यान करावे .सगुण मूर्तीचे भजन केले तर परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होते .सगुण भजनातून देहबुद्धी आपोआप क्षीण होते .मीपणाचा ,देहबुद्धीचा विसर पडतो .सगुणाच्या निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते .ध्यानाची पराकाष्ठा झाली दिव्य प्रेम निर्माण होते प्रेमाने संपूर्ण आत्मनिवेदन होते .व भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो .
पण ध्यान चित्ताने घडते .चित्त दु:श्चीत्त होते मग ते चित्त सावधान कसे होईल ?
जर रामचिंतन करावे म्हटले तर वासना ध्यानाचा ताबा घेतात .प्रपंचात गुंतलेले मन आता कसे सोडायचे विहिरीमध्ये पडलेला जीव काही विचार केल्याशिवाय ,प्रयत्न केल्याशिवाय बाहेर कसा पडेल ? आता कोणता उपाय सुचला ते समर्थ सांगतात .
त्या उपायाचे एकच वर्म आहे तो म्हणजे नित्यनेम .
शुक्रवार, 27 मई 2011
अंतर्भाव समास ५

अंतर्भाव
समास ५
ऐक शिष्या सावधान | येकाग्र करुनिया मन |
तुवां पुसिले अनुसंधान \ अंत समयीचे ||१||
तरी अंत कोणासी आला | कोण मृत्याते पावला |
हा तुवां विचार केला |पाहिजे आता ||२||
अंत आत्म्याच्या माथा | हे तो न घडे सर्वथा |
सस्वरूपी मरणाची वार्ता | बोलोंचि नये | |३||
स्वरूपी तो अंत नाही | येथे पाहणे न लगे काही |
मृगजळाच्या डोही | बुडो चि नको ||४ ||
आतां मृत्य देहासी घडे | तरी ते अचेतन बापुडे |
शवास मृत्यू न घडे | कदा कल्पांती ||५||
आता मृत्य कोठे आहे | बरे शोधूनि पाहे |
शिष्य विस्मित होऊनि राहे | क्षण येक निवांत ||६||
मग पाहे स्वामीकडे | म्हणे हा देह कैसा पडे |
चालविता कोणीकडे | निघोनी गेला ||७ ||
देह चालवितो कोण | हे मज सांगावी खूण |
येरू म्हणे हा प्राण | पंचकरूप ||८||
प्राणास कोणाची सत्ता | येरू म्हणे स्वरूप सत्ता |
सत्ता रूपे तत्वता | माया जाण ||९||
मायेची माईक स्थिती | ऐसे सर्वत्र बोलती |
माया पाहातां आदी अंती | कोठेची नाही ||१०||
अज्ञानासी भ्रांति आली |तेणे दृष्टी तरळली |
तेणे गुणे आडळली | नस्ती च माया ||११||
शिष्या होई सावचित्त | मायेचा जो शुध्द प्रांत |
तोचि चौदेहाचा अंत | सद्गुरू बोधे ||१२||
चत्वार देहाच्या अंती | उरली शुध्द स्वरूप स्थिती |
तेणे गुणे तुझी प्राप्ती |तुजसी झाली ||१३||
जन्मला चि नाही अनंत | तयास कैचा येईल अंत |
आदि अंती निवांत | तो चि तू आप घा ||१४ ||
स्वामी म्हणती शिष्यासी |आता संदेह धरिसी |
तरी श्रीमुखावरी खासी | निश्चयेसी ||१५ ||
देह्बुध्दिचेनी बळे |शुध्द ज्ञान ते झांकोळे |
भ्रांती हृदयी प्रबळे | संदेह रूप ||१६ ||
म्हणोनि देहातीत ते सुख | त्याचा करावा विवेक |
तेणे गुणे अविवेक |बाधू न शके ||१७ ||
तुटले संशयाचे मूळ |फिटले भ्रांतीचे पडळ |
तयास अंत केवळ | मूर्खपणे भ्रांती ||१८ ||
जे जन्मलेची नाही |त्यासी मृत्यू चिंतीसी कायी |
मृगजळाचा डोही |बुडोची नको ||१९||
मनाचा करूनी जयो |याचा करावा निश्चयो |
दृढ निश्चये अंत समयो |होऊनि गेला ||२० ||
आदि करूनी देहबुद्धी | देह टाकीला प्रारब्धी |
आपण देहाचा संबंधी | मुळीच नाही ||२१ ||
अस्ते करुनी वाव |नस्त्याचा पुसूनी ठाव |
देहातीत अंतर्भाव |अस्ते खुणेने असावे ||२२ ||
हे समाधान उत्तम | अस्तेपणाचे जे वर्म |
देहबुद्धीचे कर्म |तुटो जाणे ||२३ ||
आता तुटली आशंका | मार्ग फुटला विवेका |
अद्वैत बोधे रंका राज्यपद ||२४||
तंव शिष्ये आक्षेपिले |आता स्वामी दृढ झाले |
तरी हे ऐसे चि बाणले |पाहिजे की ||२५ ||
निरूपणी वृत्ती गळे |शुध्द ज्ञान प्रबळे |
उठोनी जाता स्वयेची मावळे | वृत्ती मागुती ||२६ ||
सांगा यासी काय करू | मज सर्वथा न धरे धीरू |
ऐका सावध विचारू | पुढिलीये समासी ||२७ ||
शिष्याने समर्थांना करुणेने प्रश्न विचारला की मी कोणाचे अनुसंधान अंतसमयी
समर्थ उत्तर देतात :
हे शिष्या ,एकाग्रतेने ऐक .अंतसमयी अनुसंधान कसे ठेवू असे तू विचारतो आहेस .तू
विचार कर अंत कोणाचा झाला ? मृत्यू कोण पावला ? तुला आत्म्याचा अंत वाटत
असेल तर अरे ,आत्म्याचा अंत होत नसतो आत्मा स्वरूप रूप असतो त्याचा कधीच
अंत होत नाही .स्वरूपाचा अंत ही कल्पना करणे म्हणजे मृगजळाच्या मागे लागण्या
सारखे आहे .,खोटी आहे .
मृत्यू देहाला आहे असे मानावे तर ते गरीब बिचारे अचेतन आहे .त्यामुळे शवाला मृत्यू
झाला असे मानणे योग्य होणार नाही .मग आता मृत्यू कोणाला होतो ,तो कोठे असतो
ते शोधून पहा . हे ऐकल्यावर शिष्य आश्चर्य चकित होऊन एक क्षण पहात राहिला
.मग समर्थांना विचारतो ,आत्म्याला मृत्यू नाही ,देहाला मृत्यू नाही ,मग हा देह का
पडतो ? त्याला चालवणारा कोठे निघून जातो ? हा देह कोण चालवतो तो कसा
असतो ?त्याची खूण कृपा करून महाराज ,मला सांगावी .
एक जण म्हणतो ,हा प्राण पंचक रूप आहे शरीरात पंचप्राण आहेत .या प्राणांवर
कोणाची सत्ता असते ? एक जण म्हणतो ‘स्वरूप सत्ता ‘ स्वरूपाची सत्ता म्हणजे
मायेची सत्ता .माया स्वरूपाची शक्ती .तिचीच सत्ता सर्वत्र चालते .तिच्या सत्तेनेच हे
विश्व चालते .परंतु माया मायिक आहे असे सर्व म्हणतात .कारण ती आपल्याला
दिसत नाही .पण तिचे परिणाम मात्र दिसतात .
अज्ञानी माणसाला भ्रम होतो .त्याची दृष्टी तरळते ,तिला योग्य दिसत नाही त्यामुळे
तिला नसलेली माया आढळते .
परब्रह्माला जे पहिले स्फुरण झाले ,मी एक आहे ,अनेक व्हावे ‘ तीच शुध्द माया .ही
माया जशी माणसाला अज्ञानात भरकट ठेवते ,तसे त्याला शुध्द आत्मस्वरूपाकडे ही
नेते .
हे शिष्या ,सावध हो ,तू मायेचे शुध्द स्वरूप स्थिती पाहिलीस तर तुला या चार देहाचा
निरास करता येईल जेव्हा तू या चारही देहांच्या पलीकडे जाशील तेव्हा तू स्वरूप
स्थितीला जाशील .तेव्हा तुला तुझी प्राप्ती होईल .म्हणजे स्वरूप स्थिती हेच तुझे खरे
रूप आहे .हे सर्व तुला सद्गुरूंच्या बोधामृतानेच कळणे शक्य होईल .
तू स्वरूपात लीन होशील .तुला तुझी स्थिती प्राप्त होईल आणि मग तू अनादी अनंत
अजन्मा असे स्वस्वरूप होशील .मग तुला जन्म आणि मृत्यू कसा असेल ? तो
विश्वाच्या आधीही होता ,नंतरही असणार आहे त्यामुळे त्याला अंत नाही तू
स्वस्वरूपात विलीन झाल्यामुळे तूही स्वस्वरूपच होशील मग तुला अंत कसा ? तुला
जन्म कसा ? तू अजन्माच आहेस .तू अनादी अनंत आहेस .आता तुला काही शंका
आहे का ? आता तू शंका घेतलीस तर मात्र थोबाडीत मारून घेण्याची अवस्था तुझी
होईल .
सदेह ,शंका घेतलीस तर तुझी देहबुद्धी वाढेल .तू स्वस्वरूप आहेस हे तुला झालेले
शुध्द ज्ञान झाकोळून जाईल .तुझ्या मनात भ्रम उत्पन्न होईल .तुझ्या स्वस्वरूपाच्या
ज्ञानाला अज्ञानाने झाकून टाकायला नको असेल तर तू विवेक कर .देहबुद्धी सोडून
देहातीत होण्यात जे सूख आहे त्याचा विवेक कर .तसे केलेस तर अविवेक तुझ्यावर
काही परिणाम करू शकणार नाही .
देहातीत म्हणजे मी देह आहे हा विचार न करता मी आत्मा आहे ,मला सुख दु:ख
नाही ,मला राग लोभ नाही ,असा विवेक केला तर तुला कोणतेही दु:ख ,कोणतीही
भावना बाधू शकणार नाही .कोणताही संशय तुला बाहू शकणार नाही .तुझा सगळा
भ्रम नाहीसा होईल .तुझ्या स्वस्वरूपाला अंत आहे हा भ्रम नाहीसा होईल .
त्यामुळे हे शिष्या ,तू अनादी अनंत अजन्मा असल्यामुळे तुला जन्मही नाही ,मृत्युही
नाही .तू तुझ्या जन्म मृत्युची खुळी कल्पना करू नकोस .मृगजळाच्या मागे धावू
नकोस .
मनाशी हे पक्के ठरवं ,की तू स्वस्वरूपच आहेस .दृढ निश्चय कर की तुला जन्म
मृत्यू नाही .देहबुद्धी सोड ,या स्थूल देहाला प्रारब्धावर सोडून दे .तुझा आणि या स्थूल
देहाचा काही संबध नाही याचा दृढ निश्चय कर .मी आत्मा आहे या आहे पणाचा भाव
वाढवं आणि मी देह नाही हा नाही पणाचा भाव वाढवं .असे केलेस तर तुझे समाधान
तुला देहबुद्धी वाढवू देणार नाही .
आता तुझी शंका फिटली .विवेक अंगी रुजला .या अद्वैत बोधाने भिका-याला ही
राजपद मिळते .
यावर शिष्य म्हणतो ,महाराज ,मला अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली पण हे ज्ञान अंगी
बाणले पाहिजे ..निरुपण ऐकताना वृत्ती पसरत नाहीत .ताब्यात असतात .शुध्द
ज्ञानाचा अंमल असतो .पण निरुपण संपले की पून्हा ये रे माझ्या मागल्या अशी गत
होते .,याला काय करू ? महाराज ,मला आता धीर निघत नाही .कृपा करून मला
मार्गदर्शन करा .
सोमवार, 11 अप्रैल 2011
अंतर्भाव समास ४
अंतर्भाव
समास ४
सिद्ध होउनि बैसला | दृष्टी नाणी साधनाला |
सादर अशन शयानाला | अत्यादरे करुनी ||१||
ऐसा जो विषयासक्त | अत्यंत विषई आसक्त |
सिद्धपणे आपुला घात |तेणे केला ||२||
जो सिध्दांचा मस्तकमणी |माहांतापासी शूळपाणी |
तो हि आसक्त श्रवणी | जपध्यान पूजेसी ||३||
अखंड वाचे रामनाम |अनुष्ठाता हि परम |
ज्ञान वैराग्य संपन्न |सामर्थ्य सिंधू ||४||
तो हि म्हणे मी साधक | तेथे मानव बापुडे रंक |
सिद्धपणाचे कौतुक |केवीं घडे ||५||
म्हणौनी साधनेसी जो सिद्ध |तोचि ज्ञाता परम शुध्द |
येर ते जाणावे अबध्द | अप्रमाण ||६||
साधनेवीण बाष्कळता |ते चि जाणावी बद्धता |
तेणे घडे अनर्गळता | आसक्ती रूपे ||७||
मन सुखावले जिकडे | आंग टाकले तिकडे |
साधन उपाय नावडे | अंतरापासूनि ||८||
चित्ती विषयाची आस |साधन म्हणता उपजे त्रास |
नेम धरिता कासावीस |परम वाटे ||९||
दृढ देहाची आसक्ती |तेथे कैची पां विरक्ती |
विरक्ती वीण भक्ती | केवी घडे ||१०||
ऐक गा शिष्या टिळकां | नेम नाही ज्या साधका |
तयासी अंती धोका |नेमस्त आहे ||११||
तवं शिष्ये केली विनंती |अंशी मती तेचि गती |
ऐसे सर्वत्र बोलती |तरी मी काये करू ||१२ ||
अंती कोण अनुसंधान |कोठे ठेवावे हे मन |
कैसे राहे समाधान |तये समयी ||१३ ||
अंत समयो येईल कैसा | हा तो न कळे भर्वसा |
प्राप्त होईल कोण दशा | हे तो श्रुत नाही ||१४||
ऐसी आशंका घेतली मने | शिष्य बोले करुणा वचने |
याचे उत्तर श्रोते जाने | सावध परिसावे ||१५||
एक जण सिद्ध झाला पण त्याने साधन करायचे असते या कडे दुर्लक्ष केले .अत्यंत आवडीने त्याने झोप आणि खाणे पिणे करायला सुरुवात केली .असा तो विषयासक्त झाला .सिद्ध असूनही साधन न केल्यामुळे त्याने घात करवून घेतला .
जो सिध्दांचा मुकुट मणी आहे,,महा तप करणा-या मध्ये श्रेष्ठ असणारे शंकर ,त्यांनाही श्रवण करण्यात आसक्ती आहे .,जप ध्यान करण्यात आसक्ती आहे .
ते अखंड राम नामाचा जप करतात .सतत अनुष्ठाने करतात .ज्ञान ,वैराग्य ,सामर्थ्याने युक्त असलेले शंकर ही स्वत:ला साधक म्हणवतात .मग आपण तर क्षुद्र मानव ! आपल्या सिद्धपणाचे कौतुक कोणाला सांगणार ?
म्हणून साधना करण्याची ज्याची तयारी असते तोच खरा शुध्द असतो .बाकीचे सगळे अबध्द म्हणजे बध्द असतात .साधने शिवाय जे राहू शकतात ते बद्धच असतात .बद्ध्तेने आसक्ती येते आणि अध:पतन होते .बध्दतेने मनाला ,शरीराला जिकडे सुख वाटेल ,तिकडे अंग टाकले जाते म्हणजे मन वैषयिक गोष्टींकडे आकर्षिले जाते . मना पासून साधन आवडत नाही .चित्तात विषयांची ईच्छा असते .साधन करायला आवडत नाही .कोणताही नेम नित्यनेमाने करता येत नाही नित्य नेम करण्यास कासाविशी होते .याचे कारण देहाची दृढ आसक्ती असते .त्यामुळे त्याच्या जवळ विरक्ती सुध्दा रहात नाही .विरक्ती नाही म्हणजे भक्ती पण रहात नाही
म्हणून हे शिष्या ऐक .ज्याच्या कडे नित्य नेम नाही ,त्याला अंती धोका असतो .
असे सांगितल्यावर शिष्य म्हणतो जशी मती तशी गती असे सगळे म्हणतात तर मग मी काय करू ?शेवटी कोणाचे अनुसंधान ठेवू ? हे मन कोठे लावावे ? अंतकाळी मनाचे समाधान राहण्यासाठी काय करू ? अंतकाळ कसा येईल ?हे कळत नाही .कोणती दशा प्राप्त होईल ते कळत नाही
अशी शंका श्रोत्याने घेतली शिष्याने करुणेने प्रश्न विचारला .त्याचे गुरु उत्तर देत आहेत .ते सावध चित्ताने ऐकावे .


