सोमवार, 3 सितंबर 2012
नाम महिमा
शनिवार, 30 जून 2012
समर्थ वेण्णाबाई संवाद
गुरुवार, 21 जून 2012
कल्याण स्वामींचे उत्तर
सोमवार, 7 मई 2012
समर्थ कल्याण संवाद
समर्थ कल्याण संवाद
समर्थ कल्याण संवाद
ऐक बा कल्याणा हित उपदेश |
प्राप्त जाहले रहस्य जे कां तूज ||१ ||
तेथे राही सदा न करी तत्वबोधा |
जनाचिया वादा न प्रवर्ते || 2||
श्रद्धावान पात्र जे भेटती तुज |
त्यांसी सांग गुज श्रीरामाची ||3||
देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी |
तयाचिये कानी स्वप्नी नको ||4||
नको त्या दुष्टासी स्वप्नी सांगू गोष्टी |
पडेल तुझी तुटी श्रीरामाशी ||5||
श्रीरामाशी तुज न हो वेगळीक |
मानावे स्वसुख योगस्थिती ||6||
योगस्थिती आता गुप्त आहे बापा |
नको सांगू अल्पा देह्बुध्दिते ||7||
देहबुद्धीचे प्राणी त्यासी भाषण न करी |
वाया हे वैखरी वेचूं नको ||8||
निमिष्यभरी होउं नको स्वरुपावेगळा |
अंतरशील रामाला जनायोगे ||9||
अनुभवी संताशी करी बा संवाद |
रामदासी बोधू कल्याणाते ||10||
समर्थ कल्याणाला सांगतात की ,कल्याणा ,मी तुझ्या हिताचा उपदेश करतो आहे ,तो ऐक .तुला जे रहस्य माहिती झाले आहे तेथेच तू रहा .लोकांच्या वादामध्ये तू पडू नकोस .
समर्थांनी कल्याण स्वामींना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता .त्यासाठी पुढील ओवीमध्ये समर्थ सूचना करतात : जो श्रध्दावान आहे ,त्याला श्रीरामांचे गुप्त रहस्य सांग .
पण ज्यांची देहबुद्धी वाढलेली असेल पण ज्यांना शब्दज्ञान आहे ,त्यांना काहीही सांगू नकोस कारण त्यांच्यावर खर्च केलेला वेळ वाया जाणारा आहे .तुझा श्रीरामांशी असलेला संपर्क तुटेल ..
श्रीरामाशी तुझी वेगळीक झाली नसताना तुला जे सुख मिळेल ते तू घालवू नकोस .ते तुझ्या साठी योगस्थिती असेल .योग म्हणजे एकत्र येणे .तू आणि श्रीराम यांच्यात जर ऐक्य झाले तर ती स्थिती तुझ्यासाठी असामान्य असेल ,अलौकिक असेल .ही योगस्थिती कोणाला सांगू नको ,कारण ती गुप्त आहे ,कोणाला न कळणारी आहे .सामान्यांना त्यांचा अनुभव न येणारी आहे .म्हणून देहबुद्धीच्या प्राण्यांशी तू बोलू ही नकोस .तुझे बोलणे वाया घालवू नकोस .
एक क्षणभर सुध्दा तू स्वरूपावेगळा होऊ नकोस .सतत सद्वस्तु च्या अनुसंधानात रहा .सद्वस्तूचाच निदिध्यास ठेव . त्याच्या विषयीच श्रवण कर ,त्याचेच मनन कर .असे केले नाहीस तर श्रीरामाला अंतरशील .त्याच्यासाठी काय कर ते तुला सांगतो ,
अनुभवी संताबरोबर संवाद कर सत्संग धरलास वासनांचा क्षय होईल .तू मोक्षाचा अधिकारी होशील .सत्संगाने तुझ्यात भाव भक्ती जागी होईल .सत्संगाने जे श्रवण करशील ते कृतीत आण .सर्वात हितकारी संवाद आहे उगमाचा उगम म्हणजे ब्रह्म ! परब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेचा उगम होतो .मायेचा प्रांत ओलांडून परब्रह्मा पर्यंत पोचायचे असते . हा ब्रह्मविचार गुरु शिष्य ,मुमुक्षु आणि अनुभवी संत यांच्यातच होतो ,ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे
मग तया बोधाचेनि माजे
नाचती संवादसुखाची भोजे
आता एकमेकां घेणे दीजे
बोधचि परी
असे हे गुरुशिष्य ,मुमुक्षु संत हे सर्व एकमेकांना फक्त ज्ञान च देतात ,त्यात दंभ ,अहंकार ,नसतो .तो वादविवादा पासून अलिप्त असतो .म्हणून हे कल्याणा ,तू फक्त संतांशीच संवाद कर .
गुरुवार, 12 अप्रैल 2012
अंतर्भाव समास ६
पूर्वी पडला जो अभ्यास | तोचि अंती निजध्यास |
म्हणोनिया सावकास | नित्यनेम करावा ||१६ ||
जयास ठाईचे न सवे | तयासी न लगे सांगावे |
म्हणोनिया नित्यनेम जीवे | विसंबू नये ||१७ ||
नित्यनेम पूर्वी कथिला | पून्हा पाहिजे सांगितला |
जो मागे निरोपिला | तोचि आता ||१८||
येकाग्र करोनिया मन | अंतरी करावे ध्यान |
सर्व सांग पूजाविधान | प्रत्यही करावे ||१९||
नित्य नेमिला जो जप | त्रिकाळ दर्शनी जो साक्षेप |
आदित्य मारुतीचे रूप | अवलोकावे ||२० ||
हरिकथा निरुपण |प्रत्ययी करावे श्रवण |
हे चि जाणावी खूण |नित्यनेमाची ||२१ ||
अशक्त होऊन प्राणी पडे | तेव्हा नित्य नेम न घडे |
तेणे बळेची नेमाकडे |चित्त द्यावे ||२२ ||
नित्य नेमाचा अभ्यास | नेम चुकता कासावीस |
तोचि लागे निजध्यास |अंतसमई ||२३ ||
अहा देव जप राहिला | मारुती नाही देखिला |
प्राणी योगभ्रष्ट जाला |निजध्यासे ||२४ ||
ऐसा नित्यनेम कैवाडे | मन लागे देवाकडे |
अंतकाळी बळेची घडे |निजध्यास ||२५ ||
वाचा खुंटता अंतर पडे | म्हणोनि अंतरीच जप घडे |
स्वामी आधीच सांकडे | फेडीत गेले ||२६ ||
जे वाल्मीकासी आधार |जे शतकोटीचे सार |
उमेसाहित शंकर |जपे जया ||२७||
जेणे धन्य कासीपुरी | प्राणीमात्रासी उद्धरी |
अंतकाळी पृथ्वीवरी |उच्चार ज्याचा ||२८ ||
तेचि अंतरी धरावे | तेणे चि संकटी तरावे |
कैळासनाथे सदाशिवे | उपाव केला ||२९||
तिस-या समासात समर्थांनी नित्यानेमात मानसपूजा ,जप ,ध्यान ,मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन ,हरिकथेचे श्रवण असे प्रकार सांगितले .नित्यनेम करताना सुरवातीला त्यांचा अभ्यास करावा लागतो .अभ्यास करता करता तो निजध्यास होतो .निजध्यासाची पुढची पायरी आहे आत्मसाक्षात्कार ! म्हणून समर्थ सांगतात की नित्यनेम कधीही मोडू नये .
येथे शिष्यांनी पून्हा नित्यनेमा बद्दल विचारले म्हणून समर्थ पून्हा नित्य नेमाबद्दल सांगतात .ते लक्ष देउन ऐका असे सांगतात .
एकाग्र मन करून अंतरात ध्यान करावे .यथासांग पूजा करावी .ज्या जपाचा नेहमीचा नियम आहे तो नेमाने करावा .मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन घ्यावे .हरिकथा निरुपण नेहमी श्रवण करावे .ह्या सर्व गोष्टी नित्य नेमात येतात असे समर्थ सांगतात .
जेव्हा माणूस अशक्त होऊन अंथरुणाला खीळतो ,तेव्हा नित्यनेम होत नाही .तेव्हा नित्यनेमाकडे बळेने लक्ष द्यावे .म्हणजे मानसपूजा करावी ,मनाने सूर्य व मारुतीचे त्रिकाळ दर्शन घ्यावे , जप तोंडाने करता आला नाही ,तर अंतरी जप करावा .म्हणजे नित्य नेम झाला नाही म्हणून कासाविसी येणार नाही .स्वामींच्या कृपेने ह्या सर्व संकटातून साधक पार पडेल .
जे नाम वाल्मिकींचे सार होते ,जे शतकोटी श्लोक असलेल्या रामायणाचे सार होते ,त्या रामनामाचा शंकर सुध्दा उमेसाहित जप करतात .त्याच रामनामाचा जप अंत काळी शंकर काशीक्षेत्रात माणसाच्या कानात सांगून त्यांचा उध्दार करतात .तेच रामनाम समर्थ अंतरी धरायला सांगतात ,कारण तेच रामनाम संकटातून तरून नेते .म्हणून कैलासपती शंकरांनी नाम काशीत मृत्यूमुखी पडणा-या माणसाच्या कानात सांगण्याचा उपाय केला .
शनिवार, 31 मार्च 2012
अंतर्भाव समास ६
समास ६
शिष्या परम गुह्य ज्ञान | जेणे घडे समाधान |
ऐसे मागे निवेदन | तुज केले ||१ ||
तेचि निरुपण |अभ्यांतरी क्लुप्त होता |
आशंकेसी सर्वथा | उरी नाही ||२ ||
आता असो प्रस्तुत | देहास मांडला अंत |
तेव्हा साधके निवांत |काय धरावे || ३ ||
निरावलंबी चित्त न्यावे | तरी ते राहीना स्वभावे |
आणि ऐक्याच्या नावे | शून्य जाले ||४ ||
निरावलंबीचे साधन | देह असला सावधान |
केले पाहिजे समाधान | संत संगे विवेके ||५ ||
अनुसंधान अंतकाळी | कैसे राहेल ते निर्मळी |
अनुसंधान्मिसे जवळी | मीपण उठे ||६ ||
एवं स्वरूपानुसंधान |अंतकाळी न घडे जाण |
आता करावे ध्यान | सगुण मूर्तीचे ||७ ||
ध्यानासी कारण चित्त | ते चित्त होय दुश्चित्त |
कैसे घडे सावचित्त |ध्यान अंती ||८ ||
आता करावे रामचिंतन | तरी वासना धरी पंचध्यान|
प्रपंची गुंतले मन | ते सुटले पाहिजे ||९ ||
पाडोनी कूपा भीतरी | प्राणी नाना विचार करी ||१० ||
तैसे मन हे गुंतले | वासना विषयी नेले |
वरि वरि नाम स्मरले | त्याचे कोण काज ||११ ||
तरी आता काय करावे |कोण्या उपावे तारावे |
ते चि आता स्वभावे |सांगिजेल ||१२ ||
दीनदयाळ गुरुराव | पूर्वीच सूचला उपाव |
अंती चळे अंतर्भाव | म्हणोनिया ||१३ ||
तरी त्या उपावाची खूण | केली पाहिजे श्रवण |
उपाव रचिला कोण |सद्गुरुनाथे ||१४ ||
ऐका उपायाचे वर्म |दृढ लाविला नित्यनेम |
हाची उपाय परम | अंतसमई ||१५ ||
शिष्या ,तुला मी गुह्य ज्ञान दिले ,तुला समाधान दिले .आता तुझा असा प्रश्न आहे की अंतसमयी साधकाने काय करावे ?ते आता सांगतो
समर्थ म्हणतात निरावलंबी चित्त न्यावे म्हणजे अवलंबन नसणारे जे परम गुह्य परब्रह्म त्याच्याकडे चित्त ठेवावे ..पण ते चित्त तेथे रहात नाही .चित्ताचे वस्तूशी ऐक्य रहात नाही .त्यासाठी देह सावधान असला पाहिजे .संत संग केला पाहिजे .संत संगातून ,श्रवणातून आशंका फिटतात .मन शांत होते ,चित्त समाधान पावते .
पून्हा शिष्य विचारतो ,’अंतकाळी निर्मळी ,म्हणजे परब्र्ह्माशी अनुसंधान कसे राहील ? कारण अनुसंधान करण्याच्या निमित्ताने मी पण वाढते .मग स्वरूपानुसंधान अंतकाळी घडत नाही मग आता काय करावे ? सगुण मूर्तीचे ध्यान करावे .सगुण मूर्तीचे भजन केले तर परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होते .सगुण भजनातून देहबुद्धी आपोआप क्षीण होते .मीपणाचा ,देहबुद्धीचा विसर पडतो .सगुणाच्या निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते .ध्यानाची पराकाष्ठा झाली दिव्य प्रेम निर्माण होते प्रेमाने संपूर्ण आत्मनिवेदन होते .व भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो .
पण ध्यान चित्ताने घडते .चित्त दु:श्चीत्त होते मग ते चित्त सावधान कसे होईल ?
जर रामचिंतन करावे म्हटले तर वासना ध्यानाचा ताबा घेतात .प्रपंचात गुंतलेले मन आता कसे सोडायचे विहिरीमध्ये पडलेला जीव काही विचार केल्याशिवाय ,प्रयत्न केल्याशिवाय बाहेर कसा पडेल ? आता कोणता उपाय सुचला ते समर्थ सांगतात .
त्या उपायाचे एकच वर्म आहे तो म्हणजे नित्यनेम .



