सोमवार, 3 सितंबर 2012

नाम महिमा


नाम महिमा


नाम साराचेही सार | जपाताती थोर थोर |
व्यासादिक मुनेश्वर | नामें तरले भवसिंधू || १ ||
नाम चोखट चोखट | नामे तरले खटनट |
आणि नं लगे खटपट | वेदशास्त्र घोकावे || २ ||
नाम सोलीव सोलीव | जपूं इच्छिताती देव |
मृत्युलोकी जन्म व्हावे | तेणे तरुं भवसिंधू ||३||
नाम उत्तम उत्तम | नामे हरे भवभ्रम |
नामें तरले अधम | उच्चारिता वाचेसी ||४||
नाम ओंकाराचे मूळ |ऐसे कळाले समूळ |
म्हणोनिया सर्वकाळ | रामदास जपतसे ||५||


नाम अमोल्य अमोल्य | नामें नये दुजे तुल्य |
नाम कैवल्य कैवल्य | देव माल उत्धारीले || १||
नाम अगम्य अगोचर | नाम वेदासी आधार |
नाम जपे महेश्वर | ॠषी सुरवरादि करून ||२||
नाम गगनाहूनि वाड | नाम अमृताहूनी गोड |
नामें पुरे सर्व कोड | भवसांकडे दूर होय | |३||
नाम पृथ्वी परीस स्थूळ | खोली पुरे न पाताळ |
नाम ढिसाळ ढिसाळ | मेरू भासे ठेंगणा || ४ ||
नाम निर्मळ निर्मळ |नाम सोज्वळ सोज्वळ |
नाम केवळ केवळ | रामदास ध्यातसे || ५ || 



नाम साराचेही सार आहे .म्हणजे सर्व साधना पध्दतीत  सर्व सामान्यांना सहज शक्य असणारी साधना पध्दती म्हणजे नाम आहे नामाला एक नाम घेण्याशिवाय कोणतेही कष्ट पडत नाहीत .शारीरिक ,मानसिक ,पैशाने कोणत्याच प्रकारे कष्ट न पडता मोक्षाप्रत नाम नेते .या नामाचा महिमा मोठा आहे थोर थोर लोक ,धृव ,अजामेळ ,मीराबाई ,गोपी सर्व नामाने उद्धरून गेले .व्यासांसारखे मुनी सुध्दा नामाने हा संसार रूपी सागर तरून गेले .
नाम चोखट आहे.खरे आहे . त्या नामाने खटनट असलेले अज्ञानासारखे भक्त तरून गेले नाम घेतले की दुसरे काहीच करावे लागत नाही ,वेदशास्त्रांचा अभ्यासही करावा लागत नाही , विद्वत्ता लागत नाही .फक्त भक्तीभावाने नाम घ्यावे लागते .
नाम सोलीव आहे ,पवित्र आहे .ते देवांनाही जपावेसे वाटते .विश्वमाता पार्वतीला सुध्दा श्रीशंकर रामनामाचा महिमा सांगतात .मृत्युलोकी जन्म घेऊन नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा ,असे देवानाही वाटते .
नाम उत्तमच आहे कारण नामाने भवभ्रम नाहीसा होतो .भवभ्रम म्हणजे संसाराचा भ्रम ,मी देह हा भ्रम ,माझी मुले ,माझा व्यवसाय ,माझे घर हा सर्व भ्रम माणसाला असतो तो नाहीसा होतो .नामाने जसे भक्त तारून जातात ,तसे अधम ,दुष्ट सुध्दा तरून जातात .रावण रामाचा द्वेष करत होता  ,पण ध्यानी मनी त्याला रामच दिसत होता .कंसानेही भगवान श्रीकृष्णांची अशीच विरोधी भक्ती केली .तोही उद्धारून गेला .
नाम ओंकाराचे मूळ आहे .प्रथम ब्रह्माला अहं अशी स्फूर्ती झाली .त्या स्फुर्तीला आदिसंकल्प म्हणतात .हा आदिसंकल्प ज्ञानमय ,शक्तीमय ,आनंदमय अमूर्त ,नादमय असतो .त्यालाच उपनिषदे ओंकार किंवा प्रणव म्हणतात .त्यालाच साधूसंत नाम म्हणतात .म्हणून नाम ओंकाराचे मूळ आहे असे समर्थ म्हणतात .म्हणूनच समर्थ ते नाम सदा सर्व काळ जपत असतात .

नाम अमूल्य आहे त्याच्याशी दुस-या कोणत्याही साधनेची तुलना होऊ शकत नाही .ते कैवल्य आहे कैवल्य म्हणजे शुध्द परब्रह्म ! कारण नाम म्हणजे जो ब्रह्माचा आदिसंकल्प आहे ,त्यालाच संत नाम म्हणतात .त्यानेच मला उध्दारले आहे असे समर्थ म्हणतात
.नाम अगम्य आहे ,न कळण्यासारखे आहे .जे गोचर होण्यासारखे नाही ,ईंद्रीयांना कळण्यासारखे नाही .ते वेदांना आधार आहे .महेश्वर ,म्हणजेच शंकर नाम जपतात .ॠशी सूर [देव ] .नाम गगना पेक्षा मोठे आहे .नाम अमृताहून गोड आहे नामाने सर्व कोड पुरवले जाते भक्ताला हवे ते मिळते .परमेश्वर भक्तासाठी काहीही करायला तयार होतो .एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रुपाने पाणी भरतो ,,कबीरा घराचे शेले विणतो ,जनीचे दळण दळतो .नाम पृथ्वी प्रमाणे स्थूळ आहे पण ते इतके सूक्ष्म आहे की त्याची खोली पाताळापेक्षा ही खोल आहे .नाम ढिसूळ आहे मेरू पर्वतही  त्याच्या पुढे ठेंगणा वाटतो .नाम इतके निर्मळ आहे ,स्वच्छ आहे की ते नाम घेतले की चित्ताची मलीनता नाहीशी होते .मन शुध्द होते ,पवित्र होते ..त्यामुळेच समर्थांनी नामाला सोज्वळ म्हटले आहे .म्हणूनच केवळ नामच समर्थ रामदास ध्यानी घेतात .

शनिवार, 30 जून 2012

समर्थ वेण्णाबाई संवाद


समर्थ वेण्णाबाई संवाद
नमू वागेश्वरी शारदा सुंदरी |
श्रोता प्रश्न करी वक्तयासी ||१||
वक्तयासी पुसे जीव हा कवण |
शिष्याचे लक्षण सांगा स्वामी ||२||
सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा |
बोलिजे अनात्मा तपो कवण ||३||
कवण प्रपंच कोणे केला संच |
मागुता विसंच कोण करी ||४||
कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या |
कैसे आहे आद्याचे स्वरूप ||५||
स्वरूप ते माय कैची मूळमाया |
ईस चाळावया कोण आहे ||६||
आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य |
समाधान अन्य ते कवण ||७||
कवण जन्मला कोणा मृत्यू आला |
बध्द जाला तो कवण ||८||
कवण जाणता कोणाची ही सत्ता |
मोक्ष हा तत्वता कोण सांगा ||९||
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण |
पंचवीस  प्रेष्ण ऐसे केले ||१०||
वरील २५ प्रश्न वेण्णाबाईंनी समर्थांना विचारले व त्यांची उत्तरे समर्थांनी दिली टी अशी :
नमू वेदमाता नामू त्या अनंता  |
प्रश्न सांगो आता श्रोतयाचे ||१||
श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान |
जया सर्व ज्ञान तोचि शिव  ||२||
शिवपार आत्मा त्यापर परमात्मा  |
बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य ||३||
वाच्य हा प्रपंच माईक जाणावा |
घडामोडी देवापासूनिया ||४||




विषय अविद्या त्यालावी ते त्या विद्या |
निर्विकल्प आद्याचे स्वरूप ||५||
कल्पना हे माया तत्व मूळमाया |
यासी चाळाया चैतन्यापरी ||६||
नकार ते शून्य व्यापक चैतन्य |
ईश्वर अनन्य समाधान ||७||
जीव हा जन्मला जीवा मृत्यू  आला |
बद्धमुक्त झाला तोचि जीव ||८||
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता |
मोक्ष हा तत्वता ईश्वरची ||९||
ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण |
हेची ब्रह्मखूण दास म्हणे ||१०|||
दास म्हणे सर्व मायेचे करणे |
मिथ्यारूपे जाणे अनुभवे||११||
सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणी देह माझा पडावा |
उपेक्षू नको गुणवंता अनंता |रघुनायका मागणे हेची आता ||
धीरगंभीर आवाज कानावर पडला आणि वेण्णाबाईला वाटल प्रत्यक्ष मारुतीराय आले आहेत .तिला त्यांची शेपटी दिसली होती .तुंबा भरून दूध मागणा-या समर्थांना दूध मिळाले नाही . दुस-या दिवशी समर्थ पून्हा भिक्षा  मागायला आले ,तेव्हा वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत होत्या .समर्थांनी विचारले ,काय वाचतेस बाळ ? वेण्णा बाई म्हणाल्या ,महाराज एकनाथी भागवत वाचते . समर्थांनी विचारले ,जे वाचतेस ते कळते का ? वेण्णाबाई म्हणाल्या महाराज ,मनाच्या आकाशात शंकांचे तारे उगवतात ,पण कोणाला विचारू ?समर्थ म्हणाले ,तुला असलेल्या शंका मला विचार असे समर्थांनी सांगितल्यावर वेण्णाबाईंनी १० कडव्यात २५ प्रश्न विचारले .त्यांचे प्रश्न असे होते .१ जीव कोण ? २ शिवाचे लक्षण कोणते ? ३ आत्मा कसा असतो ? ४ परमात्मा कोण ?५  अनात्मा म्हणजे कोण ? ६ प्रपंच म्हणजे काय ? त्याचे स्वरूप कसे? ७ सृष्टी कोणी केली ? ८ विद्या म्हणजे काय ? ९ अविद्या म्हणजे काय ? १० परब्रह्माचे स्वरूप कसे आहे ? ११ माया कोणती ? १२ समाधानाचे स्वरूप कोणते ?कोण जन्म घेतो ? १३ मृत्यू कोणाला येतो ? १४ बध्द कोण ?१५ मुक्त कोण ? १६ ज्ञानी कोण ? १७ या जगात कोणाची सत्ता चालते ? १८ मोक्ष म्हणजे काय ? १९ सगुण ब्रह्म म्हणजे काय ? २० निर्गुण ब्रह्म म्हणजे काय ? २१ मूळमाया कशी असते ? २२तिच्यावर कोणाचे नियंत्रण कोणाचे  ? २३ शून्य कसे असते ? २४ चैतन्य कसे असते ? २५ समाधान कोणते ?


या २५ प्रश्नांची समर्थांनी उत्तरे दिली 
जीव  म्हणजे अज्ञान ,[जीव देहात रहातो ,तोच चैतन्य ,तेच प्राणतत्व ,तोच परब्रह्माचा अंश रुपाने देहात राहणारा असतो .तो देहबुद्धीने म्हणजे मी देह आहे या बुद्धीने बांधलेला असतो ,त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे भान नसते ,अज्ञानी अवस्थेत असतो ]
शिव म्हणजे शंकर. अविद्यागुणे बोलिजे जीव | माया गुणे बोलिजे शिव | प्रत्येक देहात असणारा आत्मा म्हणजे जीव .तोच आत्मा जेव्हा ब्रह्मांडाला व्यापतो तेव्हा त्याला शिव म्हणतात .जाणीव ,जगज्जोती या नावांनी सुध्दा तो ओळखता येतो त्याला सर्व ज्ञान असते . शिव म्हणजे ब्रह्मांडाला व्यापणारा ईश्वर ! एकच एक आत्मतत्व सगळीकडे भरून राहिलेले आहे असे जाणणे ,अनुभवणे म्हणजे सर्वद्न्यानी होणे ,शिव होणे .
आत्मा परमात्म वस्तूचा विचार करत असताना समर्थ तीन पाय-या सांगतात १ आपल्या देहात वास करणारा आत्मा २ सर्व विश्वात ,चराचरात वास करणारा अंतरात्मा  ३ विश्वाला पुरून उरणारा परमात्मा . तो स्वयंप्रकाशी असतो,शुध्द ,मुक्त असतो .आनंदस्वरूप असतो ,सर्वव्यापी असतो .शरीराला जिवंत ठेवणारी ,ईंद्रीयांना चेतना देणारी , मनोव्यापारांना प्रेरणा देणारी ,बुद्धीला विचार करायला लावणारी ,जीवपणे सुख दु:खे भोगणारी सतरावी जीवनकळा म्हणजे आत्मा .तोच देहात जीव व ब्रह्मांडात शिव म्हणून रहातो .तो साक्षीभावाने रहातो ,सर्व पहातो .
परमात्मा विश्वाला पुरून उरणारा ,विश्व ,ब्रह्मांड पिंड या सर्वांना व्यापून उरणारा ,त्यापलीकडे असणारा तो परमात्मा .तो आदि ,अनंत ,शाश्वत असतो .तेच आपले मूळ स्वरूप .तो निर्विकार ,निरावयव ,निर्गुण असतो .तेथपर्यंत पोहोचणे हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे
अनात्मा हा शब्द येथे परब्रह्म या अर्थाने आला आहे .म्हणून अनात्मा म्हणजे अनिर्वाच्य म्हटले आहे .माया अनादी आहे म्हणजे अनुर्वाच्य आहे .
प्रपंच म्हणजे पाचांच्या समुदायाचे नियंत्रण पंचज्ञानेंद्रीये ,पंचकर्मेंद्रिये ,पंच प्राण पांच विषय ,पांच तन्मात्रा ,अंत;करण पंचक या सर्वांचा समूह ,त्यांचे  केलेले नियंत्रण . हा प्रपंच ही खरा नसतो .तसेच आपण आपल्या कुटुंबाची जी देखभाल करतो , आपले कुटुंब ,व्यवसाय ,घर ,संपत्ती  यालाही आपण प्रपंच म्हणतो . हा प्रपंच माईक असतो ,म्हणजे अशाश्वत असतो .मायेनेच निर्माण होतो .मायेनेच नष्ट होतो .मायाच आपल्याला प्रपंच भोव-यात अडकवते .
सृष्टी कोणी केली ? परब्रह्माला जे स्फुरण झाले ,त्यातून मूळमाया झाली ,त्यातून गुण उत्पन्न झाले ,पंचमहाभूते निर्माण झाली .अष्टधा प्रकृती निर्माण जाहली .सृष्टी निर्माण झाली .

विद्या म्हणजे काय ? अविद्या म्हणजे अज्ञान ,अविद्येनेच पंचभूतात्मक दृश्य विश्व आपल्याला खरे वाटते ,म्हणजेच देहबुद्धी .मी म्हणजे देह असे वाटते .पण संत संगतीने जीवाची अविद्या कमी होते .
विद्या म्हणजे ज्ञान .ज्ञान असते आपल्या भोवती असलेल्या सृष्टीचे ,शाश्वत अशाश्वताचे ,जेथे नित्यानित्य विवेक असतो ,सारासार विचार असतो .
प्रपंचात पोट भरण्यासाठी जे ज्ञान उपयोगी पडते त्याला विद्या म्हणतात .
परब्रह्माचे स्वरूप निर्विकल्प असते .तेथे कल्पना पोहोचू शकत  नाही .
माया कोणती ? मूळमाया म्हणजे काय ? तिला कोण चालवते ?
आपल्या मनाला वाटणारे सुख दु:ख ,आपल्या मनात येणारे विचार ,आपल्याला होणारा आनंद ही सगळी माया असते .आपल्या मनात उत्पन्न होणारा काम ,क्रोध ,द्वेष, मत्सर ही सगळी मायेचीच रूपे आहेत .ती शाश्वत नसते .तिचा म्हणजे अज्ञानाचा पडदा असतो .तो रामभक्तीने दूर करता येतो .
मूळमाया म्हणजे परब्र्ह्माचीच शक्ती ती परब्रह्माशीच संलग्न असते .ती वायूरूप असते .तिच्यातूनच त्रिगुण ,पंचमहाभूते निर्माण होतात .अष्टधा प्रकृती निर्माण होते .तीच या विश्वाची उत्पत्ती करते .विश्वाची स्थिती व लय ही तिच्यामुळेच होते .
शून्यावस्था म्हणजे मायेचा निरास .माया खरी नाही हे कळते तेव्हा कांहीच उरत नाही  एखादी गोष्ट झाली की आपल्याला सामाधान होते ,पण ते सांगता येत नाही .जशी साखरेची गोडी सांगता येत नाही ,ती अनुभवावी लागते समाधान अनुभवावे लागते .
समाधान तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली देहबुद्धी सोडून ,मी पणा सोडून देउ ,ईश्वराशी अनन्य होऊ ,तेव्हाच समाधान मिळेल .
जन्म घेणे लागे वासनेच्या अंगी जन्म वासना घेते .जेव्हा माणूस मृत्यू पावतो तेव्हा माणसातली प्राणशक्ती देह सोडते ,त्याबरोबर सूक्ष्म देह शरीर सोडतो .तेव्हा वासना वायुरूपात शरीर सोडते व योग्य वेळेला नवीन शरीर धारण करते
प्रत्येक सगुण ,जे जन्माला आले,निर्माण झाले ते मृत्यू पावते .जो दारा व कांचन यांचा विचार करतो ,देहबुद्धीचा असतो तो बध्द असतो जो देहबुद्धी विसरून मी परमात्मस्वरूप आहे असे जाणतो तो मुक्त असतो .ज्ञानी असतो मुख्यत: श्रीगणेश ,जो त्या श्रीगणेशाशी अनन्य होतो ,त्याच्याशी एकरूप होतो तो ज्ञानी .
या जगात सत्ता चालते ती त्या परब्रह्माची ,म्हणजेच श्रीगणेशाची ,त्याच्या शक्तीची म्हणजे शारदेची .
जन्ममृत्यू पासूनि सुटला |या नाव जाणिजे मोक्ष जाला ||
जेची क्षणी अनुग्रह केला |तेचि क्षणी मोक्ष जाला ||
ज्याची जन्म मृत्यू पासून सुटका होते त्याला मोक्ष मिळाला असे म्हणता येते .ज्या क्षणी सद्गुरू सदशिष्याला अनुग्रह देतात त्या क्षणी मोक्ष मिळतो .
सगुण ब्रह्म म्हणजे श्रीराम ,श्रीकृष्ण या सारख्या देवतांच्या मूर्ती .त्यांच्यामध्ये आपण प्रत्यक्ष देवता शक्तीरूपाने अआहे असे मानतो तेव्हा ते सगुण ब्रह्म आहे अशी आपली भावना असते .पंढरीचा विठोबा आपण सगुण ब्रह्माच्या रूपात मानतो .त्या सगुणाच्या आधारि आपल्याला निर्गुण ब्रह्म प्राप्त करून घ्यायचे असते .निर्गुण जे निर्विकार ,निरावयव आहे ,निराकार आहे कल्पनातीत आहे ..या कल्पनातीतात मिळून जायचे असेल सद्गुरुसेवा ,बुद्धी आत्मबुद्धी कडे वळवणे ,मी कर्ता म्हणण्या ऐवजी राम कर्ता असा निश्चय करणे या गोष्टी कराव्या लागतात   
         
  




गुरुवार, 21 जून 2012

कल्याण स्वामींचे उत्तर


कल्याण स्वामींचे उत्तर
सुखरूप जाहलो स्वामी तुमचिया पादसेवे  |
कल्याण माझे जाले रंगलो सोहंभावे ||धृ ||
चित्त ही वृत्ती माझी चैतन्यी मुराली |
संतोष स्वात्मसुख अनुभव किल्ली दिल्ही |
निर्विकल्पी वास जाहला अनुभव बोलूं बोली |
विश्व हें नाही  अवघे श्रीराम स्वरूप पाही ||१||
कनक हे पूर्णपणी नगास ठाव कोठें |
चैतन्य मृत्तिका येसी वाया हे घटमठे |
नाही हा दृश्याभास अनुभव यैसा स्पष्ट |
पूर्ण ब्रह्म सनातन सद्गुरू  येकनिष्ठ ||२||
पावलो धालो देवा तुझिया सेवा बळे |
वेदांत श्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोले |
ते मी स्वयंभ जालो हे शब्द मावळले |
मी तू पण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले ||३||
रामविण वृत्ती माझी आणिक जाये कोठे |
जिकडे तिकडे पाहे श्रीराम माझा भेटे |
कल्याण म्हणे सकळ द्वैत्पण जेथे आटे |
रामदास स्वामी जईं आनंदघन भेटे ||४ ||
स्वामींच्या पादसेवेने मी सुखरूप झालो .मी सोहं भावाने रंगलो .मी तोच आहे या भावाने रंगून गेलो आहे .माझे कल्याण झाले .
माझ्या चित्त वृत्ती चैतन्याशी एकरूप झाल्या .मला आपण संतोष ,स्वात्म सुखाच्या  अनुभवाची किल्ली दिली .स्वात्म सुख म्हणजे आत्मस्वरूपी लीन कसे व्हायचे ते आपण मला शिकवलंत ..निर्विकाल्पचा वास जाहलो .निर्विकल्पात म्हणजे कल्पनाही करता येणार नाही अशा परब्र्ह्माशी लीन कसे व्हायचे ,त्याच्याशी एकरूप कसे व्हायचे ते शिकवले .त्यामुळे मी ब्रह्म पहायला गेलो आणि ब्रह्मची झालो .तिथे काय अनुभव आला ते सांगतो .महाराज ,हे दृश्य विश्व नाहीच ,तेथे सगळीकडे श्रीरामच मला दिसत आहेत .हे माझे अनुभवाचे बोल आहेत .  
हे केवळ कनक आहे ,सोने आहे पण तेथे दागिन्यांना वाव नाही .सर्व एकजिनसी ब्रह्मस्वरूप आहे त्यात भेद नाही .मातीचे घट मठ हे सुध्दा दिसत नाहीत .कारण सर्वत्र चैतन्य आहे .मला बाकी काही दिसत नाही ..नेहमी दिसणारे दृश्य दिसत नाही ,त्यांचा आभासही होत नाही ,कारण सर्वत्र रामरूप दिसते आहे .सनातन ,प्राचीन असणारे पूर्णब्रहम सर्वत्र आहे .याचे कारण सद्गुरुंवरची एकनिष्ठ असणे .सद्गुरूंच्या वचनावर असणारा विश्वास ! 
देवा ,गुरुराया तुमच्या सेवेने मी भरून पावलो .वेदांत ,श्रुती ज्याला निर्विकल्प बोलतात ,,कल्पनेच्या पलीकडील म्हणतात ,ते मी स्वत:च झालो असे शब्दच नाहीसे झाले कारण देव पहाया गेलो आणि देवची होऊनि ठेलो अशी अवस्था माझी झाली आहे .माझे सगळे मी तूपण नाहीसे झाले माझी देहबुद्धी नाहीशी झाली ,आत्मबुद्धी त तिचे परिवर्तन झाले .
रामेविण माझे विचार आणखीन कोठे जात नाही .माझा श्रीराम मला जिकडे तिकडे भेटतो .त्यामुळे कल्याण स्वामी म्हणतात जेथे मी तू पण आटते ,द्वैत नाहीसे होते ,तेथे महाराज आनंदघन परमात्म स्वरूप मला भेटतो

सोमवार, 7 मई 2012

समर्थ कल्याण संवाद



                                                                   
समर्थ कल्याण संवाद




सांग बा कल्याणा तुझी स्थिती मज आता |
कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा ||धृ ||
उपदेशिले ज्ञान ते तुझे अंतरी आले |
भेदबुद्धी सर्वही गेली संशय मावळले |
देहे स्मृतीचा लोप जाला कोण मी कळले |
ऐसा प्रत्यय जाला की नाही ते सांग ये वेळे ||१||
स्वप्न अवस्था निरसुनि बोध जागृत जाले की |
भजनमुद्रा भक्ती कळा निज वोळखिले की |
सद्गुरू महिमा ऐसे जाणूनी सुरती भोगिले की |
मोहो जाउनी निजस्मृती प्रतीती बाणली की ||२||
वृत्ती निश्चळ होती किंवा चंचळ हे जाली |
पाहुनी स्वरुपालागी तटस्थ होऊनि का इतुक्या |
माजी येक प्रत्यय सांग ये वेळी ||३||
ते देह की आत्मा होय कोण मज सांग |
बध्द मुक्त कोण कोणा वासनेचा भोग |
कैशी स्थिती पाहुनी सेविसी श्रीरंग |
रामदासी प्रश्न केला निज अभंग ||४||


समर्थ कल्याणाला विचारतात ,कल्याणा ,तुझी स्थिती आता कशी आहे ते तू मला सांग .तू रघुनाथा बरोबर कोणत्या योगाने ,कोणत्या मार्गाने ऐक्य साधलेस ?
तुला ज्या ज्ञानाचा उपदेश केला ,ते तुझ्या अंतरात साठले का ?
मी तू हा तुझ्यातला भेद नाहीसा झाला का ? तुझे सगळे संशय मावळले का ? तुझी देहबुद्धी नाहीशी होऊन तुझ्या देहबुद्धीचा म्हणजे मी देह आहे या बुद्धीचा लोप झाला का ? मी कोण हे तुझे तुला कळले का ? मी म्हणजे चैतन्य ,मी म्हणजे आत्मा आसा तुला प्रत्यय आला का ? मला सांग तुला प्रत्यय आला का ? .
स्वप्न अवस्था म्हणजे अज्ञानावस्था निरसन होऊन तुझा बोध जागृत झाला का ?भजन मुद्रा ,भक्ती या सगळ्या गोष्टी तू ओळखल्यास का ?तू सद्गुरुंचा महिमा जाणलास का ? तुझा मोह नाहीसा होऊन तुझी निजस्मृती म्हणजे तुझी स्वरूपस्थिती तुझ्या मनात बाणली का ?
तू स्वरूपाला तटस्थ होऊन पाहिलस तेव्हाचा एक तरी अनुभव मला सांग .मला सांग की तू देह आहेस की आत्मा तू बध्द आहेस की मुक्त ,की तुझ्या वासनेचा भोग आहे ?तू कशा स्थितीत ,बध्द ,मुक्त की वासना युक्त स्थितीने श्रीरंग भगवंत पाहिलेस ? असा प्रश्न समर्थ रामदास कल्याण स्वामींना विचारतात
















समर्थ कल्याण संवाद

                                                     
                                                             समर्थ कल्याण संवाद



ऐक बा कल्याणा हित उपदेश |
प्राप्त जाहले रहस्य जे कां तूज ||१ ||
तेथे राही सदा न करी तत्वबोधा |
जनाचिया वादा न प्रवर्ते || 2||
श्रद्धावान पात्र जे भेटती तुज |
त्यांसी सांग गुज श्रीरामाची ||3||
देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी |
तयाचिये कानी स्वप्नी नको ||4||
नको त्या दुष्टासी स्वप्नी सांगू गोष्टी |
पडेल तुझी तुटी श्रीरामाशी ||5||
श्रीरामाशी तुज न हो वेगळीक |
मानावे स्वसुख योगस्थिती ||6||
योगस्थिती आता गुप्त आहे बापा |
नको सांगू अल्पा देह्बुध्दिते ||7||
देहबुद्धीचे प्राणी त्यासी भाषण न करी |
वाया हे वैखरी वेचूं नको ||8||
निमिष्यभरी होउं नको स्वरुपावेगळा |
अंतरशील रामाला जनायोगे ||9||
अनुभवी संताशी करी बा संवाद |
रामदासी बोधू कल्याणाते ||10||

समर्थ कल्याणाला सांगतात की ,कल्याणा ,मी तुझ्या हिताचा उपदेश करतो आहे ,तो ऐक .तुला जे रहस्य माहिती झाले आहे तेथेच तू रहा .लोकांच्या वादामध्ये तू पडू नकोस .


समर्थांनी कल्याण स्वामींना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता .त्यासाठी पुढील ओवीमध्ये समर्थ सूचना करतात : जो श्रध्दावान आहे ,त्याला श्रीरामांचे गुप्त रहस्य सांग .


पण ज्यांची देहबुद्धी वाढलेली असेल पण ज्यांना शब्दज्ञान आहे ,त्यांना काहीही सांगू नकोस कारण त्यांच्यावर खर्च केलेला वेळ वाया जाणारा आहे .तुझा श्रीरामांशी असलेला संपर्क तुटेल ..


श्रीरामाशी तुझी वेगळीक झाली नसताना तुला जे सुख मिळेल ते तू घालवू नकोस .ते तुझ्या साठी योगस्थिती असेल .योग म्हणजे एकत्र येणे .तू आणि श्रीराम यांच्यात जर ऐक्य झाले तर ती स्थिती तुझ्यासाठी असामान्य असेल ,अलौकिक असेल .ही योगस्थिती कोणाला सांगू नको ,कारण ती गुप्त आहे ,कोणाला न कळणारी आहे .सामान्यांना त्यांचा अनुभव न येणारी आहे .म्हणून देहबुद्धीच्या प्राण्यांशी तू बोलू ही नकोस .तुझे बोलणे वाया घालवू नकोस .


एक क्षणभर सुध्दा तू स्वरूपावेगळा होऊ नकोस .सतत सद्वस्तु च्या अनुसंधानात रहा .सद्वस्तूचाच निदिध्यास ठेव . त्याच्या विषयीच श्रवण कर ,त्याचेच मनन कर .असे केले नाहीस तर श्रीरामाला अंतरशील .त्याच्यासाठी काय कर ते तुला सांगतो ,


अनुभवी संताबरोबर संवाद कर सत्संग धरलास वासनांचा क्षय होईल .तू मोक्षाचा अधिकारी होशील .सत्संगाने तुझ्यात भाव भक्ती जागी होईल .सत्संगाने जे श्रवण करशील ते कृतीत आण .सर्वात हितकारी संवाद आहे उगमाचा उगम म्हणजे ब्रह्म ! परब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेचा उगम होतो .मायेचा प्रांत ओलांडून परब्रह्मा पर्यंत पोचायचे असते . हा ब्रह्मविचार गुरु शिष्य ,मुमुक्षु आणि अनुभवी संत यांच्यातच होतो ,ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे


मग तया बोधाचेनि माजे
नाचती संवादसुखाची भोजे
आता एकमेकां घेणे दीजे
बोधचि परी


असे हे गुरुशिष्य ,मुमुक्षु संत हे सर्व एकमेकांना फक्त ज्ञान च देतात ,त्यात दंभ ,अहंकार ,नसतो .तो वादविवादा पासून अलिप्त असतो .म्हणून हे कल्याणा ,तू फक्त संतांशीच संवाद कर .









































गुरुवार, 12 अप्रैल 2012

अंतर्भाव समास ६

पूर्वी पडला जो अभ्यास | तोचि अंती निजध्यास |

म्हणोनिया सावकास | नित्यनेम करावा ||१६ ||

जयास ठाईचे न सवे | तयासी न लगे सांगावे |

म्हणोनिया नित्यनेम जीवे | विसंबू नये ||१७ ||

नित्यनेम पूर्वी कथिला | पून्हा पाहिजे सांगितला |

जो मागे निरोपिला | तोचि आता ||१८||

येकाग्र करोनिया मन | अंतरी करावे ध्यान |

सर्व सांग पूजाविधान | प्रत्यही करावे ||१९||

नित्य नेमिला जो जप | त्रिकाळ दर्शनी जो साक्षेप |

आदित्य मारुतीचे रूप | अवलोकावे ||२० ||

हरिकथा निरुपण |प्रत्ययी करावे श्रवण |

हे चि जाणावी खूण |नित्यनेमाची ||२१ ||

अशक्त होऊन प्राणी पडे | तेव्हा नित्य नेम न घडे |

तेणे बळेची नेमाकडे |चित्त द्यावे ||२२ ||

नित्य नेमाचा अभ्यास | नेम चुकता कासावीस |

तोचि लागे निजध्यास |अंतसमई ||२३ ||

अहा देव जप राहिला | मारुती नाही देखिला |

प्राणी योगभ्रष्ट जाला |निजध्यासे ||२४ ||

ऐसा नित्यनेम कैवाडे | मन लागे देवाकडे |

अंतकाळी बळेची घडे |निजध्यास ||२५ ||

वाचा खुंटता अंतर पडे | म्हणोनि अंतरीच जप घडे |

स्वामी आधीच सांकडे | फेडीत गेले ||२६ ||

जे वाल्मीकासी आधार |जे शतकोटीचे सार |

उमेसाहित शंकर |जपे जया ||२७||

जेणे धन्य कासीपुरी | प्राणीमात्रासी उद्धरी |

अंतकाळी पृथ्वीवरी |उच्चार ज्याचा ||२८ ||

तेचि अंतरी धरावे | तेणे चि संकटी तरावे |

कैळासनाथे सदाशिवे | उपाव केला ||२९||

तिस-या समासात समर्थांनी नित्यानेमात मानसपूजा ,जप ,ध्यान ,मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन ,हरिकथेचे श्रवण असे प्रकार सांगितले .नित्यनेम करताना सुरवातीला त्यांचा अभ्यास करावा लागतो .अभ्यास करता करता तो निजध्यास होतो .निजध्यासाची पुढची पायरी आहे आत्मसाक्षात्कार ! म्हणून समर्थ सांगतात की नित्यनेम कधीही मोडू नये .

येथे शिष्यांनी पून्हा नित्यनेमा बद्दल विचारले म्हणून समर्थ पून्हा नित्य नेमाबद्दल सांगतात .ते लक्ष देउन ऐका असे सांगतात .

एकाग्र मन करून अंतरात ध्यान करावे .यथासांग पूजा करावी .ज्या जपाचा नेहमीचा नियम आहे तो नेमाने करावा .मारुती व सूर्याचे त्रिकाळ दर्शन घ्यावे .हरिकथा निरुपण नेहमी श्रवण करावे .ह्या सर्व गोष्टी नित्य नेमात येतात असे समर्थ सांगतात .

जेव्हा माणूस अशक्त होऊन अंथरुणाला खीळतो ,तेव्हा नित्यनेम होत नाही .तेव्हा नित्यनेमाकडे बळेने लक्ष द्यावे .म्हणजे मानसपूजा करावी ,मनाने सूर्य व मारुतीचे त्रिकाळ दर्शन घ्यावे , जप तोंडाने करता आला नाही ,तर अंतरी जप करावा .म्हणजे नित्य नेम झाला नाही म्हणून कासाविसी येणार नाही .स्वामींच्या कृपेने ह्या सर्व संकटातून साधक पार पडेल .

जे नाम वाल्मिकींचे सार होते ,जे शतकोटी श्लोक असलेल्या रामायणाचे सार होते ,त्या रामनामाचा शंकर सुध्दा उमेसाहित जप करतात .त्याच रामनामाचा जप अंत काळी शंकर काशीक्षेत्रात माणसाच्या कानात सांगून त्यांचा उध्दार करतात .तेच रामनाम समर्थ अंतरी धरायला सांगतात ,कारण तेच रामनाम संकटातून तरून नेते .म्हणून कैलासपती शंकरांनी नाम काशीत मृत्यूमुखी पडणा-या माणसाच्या कानात सांगण्याचा उपाय केला .

शनिवार, 31 मार्च 2012

अंतर्भाव समास ६

समास ६

शिष्या परम गुह्य ज्ञान | जेणे घडे समाधान |

ऐसे मागे निवेदन | तुज केले ||१ ||

तेचि निरुपण |अभ्यांतरी क्लुप्त होता |

आशंकेसी सर्वथा | उरी नाही ||२ ||

आता असो प्रस्तुत | देहास मांडला अंत |

तेव्हा साधके निवांत |काय धरावे || ३ ||

निरावलंबी चित्त न्यावे | तरी ते राहीना स्वभावे |

आणि ऐक्याच्या नावे | शून्य जाले ||४ ||

निरावलंबीचे साधन | देह असला सावधान |

केले पाहिजे समाधान | संत संगे विवेके ||५ ||

अनुसंधान अंतकाळी | कैसे राहेल ते निर्मळी |

अनुसंधान्मिसे जवळी | मीपण उठे ||६ ||

एवं स्वरूपानुसंधान |अंतकाळी न घडे जाण |

आता करावे ध्यान | सगुण मूर्तीचे ||७ ||

ध्यानासी कारण चित्त | ते चित्त होय दुश्चित्त |

कैसे घडे सावचित्त |ध्यान अंती ||८ ||

आता करावे रामचिंतन | तरी वासना धरी पंचध्यान|

प्रपंची गुंतले मन | ते सुटले पाहिजे ||९ ||

पाडोनी कूपा भीतरी | प्राणी नाना विचार करी ||१० ||

तैसे मन हे गुंतले | वासना विषयी नेले |

वरि वरि नाम स्मरले | त्याचे कोण काज ||११ ||

तरी आता काय करावे |कोण्या उपावे तारावे |

ते चि आता स्वभावे |सांगिजेल ||१२ ||

दीनदयाळ गुरुराव | पूर्वीच सूचला उपाव |

अंती चळे अंतर्भाव | म्हणोनिया ||१३ ||

तरी त्या उपावाची खूण | केली पाहिजे श्रवण |

उपाव रचिला कोण |सद्गुरुनाथे ||१४ ||

ऐका उपायाचे वर्म |दृढ लाविला नित्यनेम |

हाची उपाय परम | अंतसमई ||१५ ||

शिष्या ,तुला मी गुह्य ज्ञान दिले ,तुला समाधान दिले .आता तुझा असा प्रश्न आहे की अंतसमयी साधकाने काय करावे ?ते आता सांगतो

समर्थ म्हणतात निरावलंबी चित्त न्यावे म्हणजे अवलंबन नसणारे जे परम गुह्य परब्रह्म त्याच्याकडे चित्त ठेवावे ..पण ते चित्त तेथे रहात नाही .चित्ताचे वस्तूशी ऐक्य रहात नाही .त्यासाठी देह सावधान असला पाहिजे .संत संग केला पाहिजे .संत संगातून ,श्रवणातून आशंका फिटतात .मन शांत होते ,चित्त समाधान पावते .

पून्हा शिष्य विचारतो ,अंतकाळी निर्मळी ,म्हणजे परब्र्ह्माशी अनुसंधान कसे राहील ? कारण अनुसंधान करण्याच्या निमित्ताने मी पण वाढते .मग स्वरूपानुसंधान अंतकाळी घडत नाही मग आता काय करावे ? सगुण मूर्तीचे ध्यान करावे .सगुण मूर्तीचे भजन केले तर परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होते .सगुण भजनातून देहबुद्धी आपोआप क्षीण होते .मीपणाचा ,देहबुद्धीचा विसर पडतो .सगुणाच्या निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते .ध्यानाची पराकाष्ठा झाली दिव्य प्रेम निर्माण होते प्रेमाने संपूर्ण आत्मनिवेदन होते .व भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो .

पण ध्यान चित्ताने घडते .चित्त दु:श्चीत्त होते मग ते चित्त सावधान कसे होईल ?

जर रामचिंतन करावे म्हटले तर वासना ध्यानाचा ताबा घेतात .प्रपंचात गुंतलेले मन आता कसे सोडायचे विहिरीमध्ये पडलेला जीव काही विचार केल्याशिवाय ,प्रयत्न केल्याशिवाय बाहेर कसा पडेल ? आता कोणता उपाय सुचला ते समर्थ सांगतात .

त्या उपायाचे एकच वर्म आहे तो म्हणजे नित्यनेम .